( समरप्रसंग )

महाभीषणं ताण्डवं संविधित्सुम्
ज्वलल्लोचनं कर्कशं गर्जयन्तम्
महीं शीर्णशैलां भृशं कम्पयन्तम्
प्रभुं भीमरूपं हरं तं नमामि ॥१॥
कृष्णा त्वदीय महिला विलसे अपार
त्याचा कधीं जडमती न पवेल पार
आलों तटा - निकट मी गुरूच्या कृपेनें
आतां कृतार्थ करणें मज चक्रपाणें ॥२॥
काय तरी हे रणभूमीवर
करिती प्रलया ताण्डव सागर
लाटा भीषण उठती ना या
सजल्या सेना युद्ध कराया ॥३॥
रथी महारथ अतिरथ तैसे
वीरश्रीचे वल्लभ जैसे
पराक्रमाचे प्रदीप्त पर्वत
मारुं मरूं वा घृति ही निश्चित ॥४॥
कल्पघनासम कभिन्न काळे
महाकाय गज औत मिळले
घोडदळाची पा य द ळा ची
कुणी करावी गणती साची ॥५॥
झेपावति की अग्निज्वाला
कालीच्या वा जिभा कराला
तळपाव्या वा विजा तशी तीं
दिसती खङ्गें वीरा हातीं ॥६॥
मुकुट भटांचे कळस रथांचे कवचें गजगण्डांचीं
अशीं चमकती कीं भासतसे रचिनें त्यजिली प्राची ॥७॥
भीष्म पितामह कुरू - सेनानी
यद्रथ मंडित सित छत्रांनीं
द्रोण कर्ण  कृप अश्वत्थामा
कौरव खल तो शकुनी मामा ॥८॥
यु धि ष्ठि रा नें द्रु प द सु ता सी
नेमियला अधिपति सेनेसी
भीम सात्यकी दो पक्षावर
उणें वारण्या पार्थ धनुर्धर ॥९॥
संमुख झाल्या परस्परांना
समरोत्सुक त्या उभयहि सेना
पांचजन्य फुंकीत रमाधव
घोषें त्या बहु भ्याले कौरव ॥१०॥
पांडव वाजविती निज शंखा
घोर रणाचा गर्जे डंका
कुरुसैन्यें ही शिंगतुतारी
नादविती दम घेउन भारी ॥११॥
प्रतिपक्षावर वार कराया वीर भुजा स्फुरताती
हिसके देती अश्व लगामा चरणें उकरित माती ॥१२॥
वी पाहती वाट खुणेसी
त्यजिलें धर्मे तो स्वरथासी
चालत येई कुरू सैन्यातें
बघती सारे विस्मित चित्तें ॥१३॥
विकार नाना विचार नाना
बोध न होई इतर जनांनां
परी जाणिलें जगन्निवासें
पार्थ - सारथी प्रसन्न हासें ॥१४॥
भीष्म पदावर ठेवुन माथा
म्हणे युधिष्ठिर जोडून हातां
ताता मजसी क्षमा असावी
गंहिवरला तों वीर तपस्वी ॥१५॥
हुंगुनिया शिर पंडुसुताचें
वदे पितामह वत्सल वाचें
नीतीचें तूं वत्सा भूषण
‘ विजयीभव ’ जा सुखें करी रण ॥१६॥
द्रोणाचार्या वंदन करितां प्रसन्न वदले तेही
“ शिष्यवरा कर्तव्य सुखें कर रोष मनीं मम नाहीं ” ॥१७॥
बसे रथीं येऊन युधिष्ठिर
शिंग खुणेचें झालें सत्वर
त्वेषानें मग भिडल्या सेना
प्रेरी माधव विजय - ह्यांना ॥१८॥
तोंड लागलें घोर रणासी
लढती योद्धे समरावेशीं
गदा तोमरें परीघ शस्त्र
खणखणतीं, सुटली बहु असें ॥१९॥
अमुं वधिष्ये, अमुं हनिष्ये
दिसती मंडल सतत धनुष्यें
बाणांचें छत होत नभासी
भंगवें न तें रविकिरणासी ॥२०॥
फुटती कवचें जणुं का हंड्या
उडती रक्तांच्या चिळकंड्या
कोसळताती वीर महीवर
झंझावातें जैसे तरुवर ॥२१॥
प्रातःकालीं संध्यावंदन करुनी जे रण जुंपें
सूर्य मावळे तों चाले तें भूमंडळ थरकापें ॥२२॥
एक दिनीं कुरुराजवचानीं
चढले कोपा भीष्म चिडोनी
दिसे वृद्ध तो, पर सैन्यासी
जसा मतंगज केळवनासी ॥२३॥
नित - मंडल - धनु वर्षतसे शर
शवें साचली सर्व महीवर
तदा हरीनें रथ विजयाचा
भीष्मावर घातियला साचा ॥२४॥
आज न ये परि उपयोगा तें
जर्जर हो अर्जुन शरधातें
रक्तें फुलला तो पळसासम
पडला मूर्च्छित होउनिया श्रम ॥२५॥
मागें पाही पदनतवत्सल
रथीं धनंजय विकीर्ण कुंतल
भिजला पुरता निजरूधिराहीं
हृदय हरीचें विदीर्ण होई ॥२६॥
सावध होत न बघतांअर्जुन आला क्रोध हरीतें
निज प्रतिज्ञा विसरून घेई चक्रसुदर्शन हातें ॥२७॥
“ प्राण तुझा मी घेतों भीष्मा
सहाय्य होसी कसा अधर्मा
वधिलासी मम भक्त सखा हा
खल कपट्यांच्या गुंतुन मोहा ॥२८॥
वाचिव पाहूं हे शठ कौरव ”
धावे गर्जुन असे रमाधव
लाल जाहले क्रोधें लोचन
फिरे गरगरा करी सुदर्शन ॥२९॥
पाहुन ऐसा रथांगपाणी
भीष्माच्या ये नयना पाणी
हात जोडिले त्यजुन चप निज
म्हणे “ मार ये मला अधोक्षज ॥३०॥
भक्त तुला प्रिय तुझ्याहुनी ही
हे दावियलें मी या ठायीं
कारण झालों तव कीर्तीसी
काय हवें याहुन महीसीं ॥३१॥
तुझ्या करानें मरण येत हें भाग्य थोर बहु माझें
ये प्रभु चालिव तुझें सुदर्शन कारण मोक्ष सुखा जें ॥३२॥
हर्षित भीष्में वाकविलें शिर
सावध झाला तोच वीरवर
बघुन सुदर्शन करीं हरीचे
उंचबळे मन भक्तवराचें ॥३३॥
दासासाठीं काय दयाळा
बाध आणिसी निजवचनाला
भूषण तुज परि दूषण आम्हां
हो मागं हो मेघश्यामा ॥३४॥
मिठी घालुन पदकमलासी
करी याचना भक्त हरीसी
पुनः सारथी हो यदुराया
तुझ्या कृपें मी अजय रणीं या ॥३५॥
शतगुण झाली उरीं धडाडी
प्रखर तीक्ष्ण शर अविरत सोडी
सतेज वज्रें जसा पुरंदर
ध्वज भीष्माचां पडे महीवर ॥३६॥
पांडव सेना विजयी झाली सरले कौरव मागें
कसा पराभव होइल सांगा करिं धरतां श्रीरंगें ॥३७॥
चढे विक्रमा प्रतिदिन अर्जुन
युद्ध वृकोदर करी विलक्षण
स्रुवे म्हणा त्याचिया भुजांना
निवडुन देई हवी कुरूंना ॥३८॥
सुयोधनाचे अनेक भाऊ
तयें घातिले काळां खाऊं
पद घातां खालींच तयाच्या
होत चिंधड्या किती भटांच्या ॥३९॥
नवव्या दिवशीं अराक्रमाची
शर्थ जाहली पंडुसुतांची
येत अवकळा कुरुसेनेला
वदे सुयोधन मग भीष्माला ॥४०॥
“ तुम्ही, अजोबा ! ज्या सेनेचे
नायक व्हावें दैन्य तियेचें
जयें जिंकिलें भार्गवरामा
भाता तो कां होत रिकामा ॥४१॥
अर्ध्यावरती सैन्य निमें मम
अजुन धरुं मी किती वदा दम
वाढतसे यश मम शत्रूंचे
बल सरले कां भगद्भुजांचें ॥४२॥
वाटतसे मज मनापासुनी युद्ध न करितां तुम्ही
पंडुसुतांचें प्रेम आपणा नावडता आहे मी ॥४३॥
व्यर्थ ठेविला भाव तुम्हावर
मित्र खरा मम कर्ण धनुर्धर
तुमचे ठायीं तो जर होता
कधींच मत्प्रिय साधुन देता ॥४४॥
विषण्ण झालें भीष्म मनांतें
दुर्जनसेवा विफला होते
वेदती धरिता गंधर्वानें
काय लाविले दिवे वृषाने ॥४५॥
गोग्रहणाच्या समयीं राजा
कामा ये का जिवलग तूझा
कितिदां कथिलें तुजसी मी कीं
अजिंक्य अर्जुन असे त्रिकोकीं ॥४६॥
परमात्मा सारथी तयाचा
कोण पुढें मग टिकेल साचा
तयें दीधलें अनला खांडव
स्वयें विरोधी असुनी वासव ॥४७॥
चुकार झालों मी न परंतू
तरी वाहसी मूढा किंतू
दुराग्रही मतिमंदा पुढतीं
ज्ञानें सर्वहि परि लटपटती ॥४८॥
दैवकुणाला टळे, प्रतिज्ञा ऐक नृपा मम आतां
अपांडवी भू करिन उद्यां वा भोगिन मी तनुपाता ॥४९॥
वृत्त सर्व हें गुप्तचरांनी
युधिष्ठिरा कथियलें त्वरेनीं
अनाथ झालों गमे तयासी
शोकाकुल मग वदे हरीसी ॥५०॥
“ तूंच एक हरि आशा माझी
पार आटलें जीवन आजी
उद्यां बरी गत नच विजयाची
सर्वनाश मम हृदया जाची ” ॥५१॥
परी शांतवन करी रमावर
“ धीर न सोडी असा युधिष्ठिर
रक्षण करण्या पंडुसुतांचें
सडे करिन मी निजरक्ताचे ॥५२॥
सुलभ इंद्र यम जिंकायासे
अजिंक्य परि गांगेय रणासी
तरी प्रतिज्ञा पितामहाची
अन्यार्थे मी घडविन साची ॥५३॥
थोरवंद्य हा सुत गंगेचा साथी परि दुष्टासी
शठ दुर्योधन दुर्जन यानें घातियला पाठीसी ॥५४॥
पाप वाढवी पुण्यात्मा हे
अतां उपेक्षा उचिता नोहे
पापा कारण, पुण्य नसे तें
पुण्यास्तव ना पातक होतें ॥५५॥
तप पावन वस्तुतः सुमंगल
जईं वाढवी दैत्यांचें बल
भयद तेंच मग विनाश्य होतें
भीष्म असे हा तसाच येथें ” ॥५६॥
येत रमावर भीष्म - निवासी
रक्षकास पटवून खुणेसी
सवें घेउनी पांचाली ते
म्हणे “ करी वंदन वडिलातें ” ॥५७॥
नयन धरोनी अर्धोन्मीलित
मृगाजिनावरतीं ध्यान स्थित
वृद्ध असे तो प्रसन्नचित्तें
अवलोकी हृदयस्थ हरीतें ॥५८॥
चंद्रासम त्या महात्मतेजें
शिबिरहि मंगल धवल विराजे
सती दौपदी जवळी येउन
करी तयासी सकंप वंदन ॥५९॥
कंकण - रव ऐकुन भीष्में दिधला सहज शुभाशी
स्थिर राहो सौभाग्य मुली तव भोग सदासुखराशी ॥६०॥
वदे सती पावेन कधीं मी
वर हा या, वा पुढच्या जन्मीं ”
भीष्म पाहती उघडुन डोळे
म्हणती “ या जन्मांतच वाळे ” ॥६१॥
त्वरित मिळे फळ संतवचांचें
स्वार्थ शिवे ना मना जयांचे
“ एकटी न आली मुली तूं
कुठें सखा तव खगपतिकेतू ॥६२॥
कृपा जयाची सदा तुम्हांवर
जशी पिलावर घाली पांखर
मती जयाची होउन नौका
तुम्हास तारी टाळून धोका ॥६३॥
उभा असे तो ऐकुन दारीं
विनवी मग “ ये आंत मुरारी
करीत होतों ज्याचें चिंतन
धन्य मला तें झाले दर्शन ” ॥६४॥
चरणीं भावें ठेवुन मस्तक वदती “ हे श्रीमूर्ति
विराटरूपें मागेचीं तूं हरिली जीवनशक्ति ॥६५॥
लीला नट तूं करिशी कौतुक
मीही मोक्षा असे समुत्सुक
पुढें करी रे रणीं शिखंडी
विजया हातीं मम तनु खंडी ॥६६॥
त्यक्तशस्त्र शरणागत नारी
भीतावर मी कर न उगारी
परी अर्जुनाविण दुसर्‍याचे
शर देहीं नच शिरावयाचे ॥६७॥
कृपा जयावर करी पिनाकी
ईश्वर तुजसम यद्रथ हाकी
निवातकवचा वधिलें ज्यानें
मज मारावें त्या कृष्णाने ॥६८॥
देई भीष्मा दृढ आलिंगन
प्रेम भरें वदले यदुनंदन
पावनकीर्ती तव अजरामर
उद्धरील नित जनांस भूवर ॥६९॥
दुसरे दिवशीं रण - भूमीवर युद्ध होत घनघोर
कृतांत काळासम भासे तो क्रुद्ध भीश्म रणधीर ॥७०॥
अपूर्व शरलागह्व तें त्यांचें
चक्राकृति धनु सदैव नाचे
बाण कधी घे केव्हां जोडी
कदा कळेना रिपुवर सोडी ॥७१॥
प्रवाह वाहे सतत शरांचा
शक्य नसे प्रतिकार तयाचा
अर्जुन हो मग पुढें त्वरेंसी
प्रथम शरा टाकीत पदासी ॥७२॥
शिरीं बाण फेकीत पितामह
तोंच शिखंडी येतपुढें अह
आवरिला कर बघता त्यासी
वर्षे अर्जुन खरशरराशी ॥७३॥
विह्वल होउन त्या आघातें
कोसळला कीं भीष्म महीतें
थांबवून परि जयघोषासी
दुःखित पांडव नमिती त्यासी ॥७४॥
तीक्ष्ण शरांच्या पर्यंकासी स्थितधी शांत असे तो
करीत अर्जुन उसें शरांचें मुनिगण भीष्मा स्तवितो ॥७५॥
द्रोण जाहले मग सेनानी
घोर मांडिलें युद्ध तयांनी
तिसरे दिवशीं चक्रव्यूहा
माम्डुन म्हणती भेद्य नसे हा ॥७६॥
अभिमन्यू परि हरिचा भाचा
करी लीलया भेद तयाचा
जसा सतांचा बोल अनुभवी
अल्पहि संशयगणास उडवी ॥७७॥
सान वयीं तो वीर धनुर्धर
कोमल तनु मदनासम सुंदर
असह्य झाला तरी कुरुंते
अवलंबुन नच तेज वयातें ॥७८॥
अंती मिळुनी सहा जणांनीं
वधिला अर्जुनसुत अधमांनी
देत जयद्रथ लाथ शवासीं
चीड तयानें ये विजयासी ॥७९॥
अधमाधम खल रावण साचा
अपमान न तरि होत शवाचा
पवित्र माझा बाळ सुकोमल
पाय लावितो तया कसा खल ॥८०॥
अपार होउन शोक म्हणे तो उद्यां प्रदोषापूर्वीं
वधिन जयद्रथ नातरि भक्षिन अग्निकाष्ठ दुर्दैवी ॥८१॥
जयद्रथासी रक्षायातें
द्रोण कर्ण कृप कौरव होतें
परी हरीनें अपूर्व युक्तीं
विफला केली रिपुजनशक्ति ॥८२॥
मरे दुःशलाधव, कुरूराजा
म्हणे “ अंत कां बघतां माझा
द्रोणा तुम्हा इष्ट मनानी
मला वधावें पंडुसुतांनी ” ॥८३॥
“ दुर्दैवें तव फिरली बुद्धि
पाप कधें कां जाइल सिद्धी
द्रोण म्हणे मी आज तुझ्यास्तव
लढेन रात्रीं राहिन ना लव ॥८४॥
अंधारीं बहु घोर निशा ती
द्रोण पणा लावी निजशक्ति
कृष्ण वदे मग घटोत्कचासी
विशेष बल दैत्यास निशेंसी ॥८५॥
दाखिव पाहूं तुझा पराक्रम मायावी अनिवार
जर्जर व्हावे कौरव सारे तुज वरतीं मम भार ॥८६॥
माता चित्तीं स्मरुन हिंडिंबा
भीमात्मज निर्मीत अचंबा
गुप्तपणानें कुरु सैन्यासी
ओती वरुनी पर्वत राशी ॥८७॥
उलथुन पाडी गजघोड्यांना
भिरकावी रथ लाथ रथींना
काड्यांसम मोडीत धनुष्यें
काय करावें इथें मनुष्यें ॥८८॥
व्याकुळ झाली कैरवसेना
उपाय कांहीं कुणा सुचेना
कर्णासी मग म्हणे सुयोधन
तूंच वाचवी आतां यांतुन ॥८९॥
अमोघ शक्ती वासवदत्ता
बाळगिशी तूं अर्जुनघाता
तीच टाक या घटोत्कचावर
भाग न हा मेल्याविण सत्वर ॥९०॥
अधिरथनंदन मग निरूपायें जपुन ठेविली शक्ति
मंत्रुन  टाकी निशाचरावर धूप पडे त्या घातीं ॥९१॥
म्हणे मुरारी हर्षित चित्तें
आतां भय ना भक्तवरातें
कर्ण खरा हा आजच मेला
धीर जयाचा फार खलला ॥९२॥
उभ्या उभ्याची रणांत घेती
वीर निशीं त्या लव विश्रांती
चंद्रकला उगवता प्रभातीं
रणार्नवा ये पुनरपि भरती ॥९३॥
अंधसुतानें कोपविलेले
द्रोण तदा दावानल झाले
जों जों पुढती येइल कोणी
जीर्ण तरूसा जात जळोनी ॥९४॥
चाड न उरली नयनीतीची
आचार्या त्या समयीं साची
अस्त्रें नव्हती ज्ञात जयांना
टाकुन अस्त्रें वधिती त्यांना ॥९५॥
दीन असे घायाळ भीत हा हें न पाहिलें त्यांनीं
सर्व सारखे मरणा जैसे, लढती क्रूरपणानीं ॥९६॥
म्हणे हरी “ दुर्धर म्हातारा
शोक हाच या वरी उतारा
‘ मेला माझा पुत्र, असे जर
कळेल या हतबल होई तर ” ॥९७॥
गज नावानें अश्वत्थामा
त्यास वधाया कथिलें भीमा
आणि करविली थोर हकाटी
धर्मा सांगे मग जगजेठी ॥९८॥
‘ खराच मेला स्तु का माझा ’
द्रोण असंशय पुसेल राजा
मेला म्हणुनी सांग तयातें
धर्म म्हणे हें शक्य न मातें ॥९९॥
आजवरी मम अनृतां वाणी
शिवली नाही रथांगपाणी
जीभ कशी मग अतां विटाळूं
तीहि गुरू वधण्यास दयाळू ॥१००॥
“ सूक्ष्म रूप सत्याचे धर्मा कसें कळेंना तूंतें
सूज्ञ शोधिती सदैव अंतर मूर्ख भुले कवचातें ॥१०१॥
जेणें साधे जीवांचें हित
म्हणती ज्ञाते सत्य तयाप्रत
या मायामय विश्वाठायीं
वस्तुस्थितिचें महत्व कायी ॥१०२॥
गो वि प्रां सीं र क्षा या तें
वदतां कांहीं अनृत न होतें
सर्वनाश हा ओढवल्यावर
असत्यतेचा दोष न तिळभर ॥१०३॥
खोटें वदतां स्वार्थ घडाया
दूषण त्यासी लागत राया
खल नाशास्तव युद्ध असे हें
अन्यायी हा दोर्णहि अहे ॥१०४॥
सत्य बोलणें हा मम बाणा
या गर्वें नाशिसी प्रजांना
कीर्ती व्हावी स्वार्थ न कां हा ?
युधिष्ठिरा त्यज या दुर्मोहा ॥१०५॥
“ बरें ” म्हणोनी कथी गुरूसी “ अश्वत्थामा मेला
“ कुंजर वा नर हें न कळे परि ” राजा हळुच म्हणाला ॥१०६॥
आत्मवंचना येथ परंतु
तीच जाहली दोषा हेतू
अधर फिरे जो रथ राजाचा
तोच टेकला महीस साचा ॥१०७॥
पुत्रशोक जाहला गुरूसी
गात्रें पडली ढिली विशेषीं
द्रुपदसुतानें खङ्गें सत्वर
वृद्धाचें त्या उडवियलें शिर ॥१०८॥
धृष्टद्युम्ना बहु धिःकारुन
दुःख गुरूचे करीत अर्जुन
शांतविले श्री हरिनें त्यासी
हाहा उडली कुरू सैन्यासी ॥१०९॥
कर्णा करुनी सेनानायक
एक खरा तूं मम हितचिंतक
म्हणे अंधसुत त्या दोघांनीं
अहितचि मम चिंतिलें मनानी ॥११०॥
“ राजा चिंता सोड ” म्हणे वृष “ पहा वीरता माझी
कृष्णार्जुन जरि सहस्र आले वधिन तयां शरराजीं ॥१११॥
सुयोधनें मग करूनी विनंती
कर्णा दिधला शल्य सारथी
भिडला येउन वेगें विजया
म्हणे क्षणीं मी मिळवीन जया ॥११२॥
तुल्यबली ते वीर परस्पर
लढतां जमले व्योमीं सुरवर
टणत्कार ऐकुन धनूंचे
स्तंभित झाले दिग्गज साचे ॥११३॥
कर्ण भयंकर सर्पमुखीं शर
सोडी लक्षुन विजयाचें उरे
पार्थसारथी कुशल न सीमा
बसवुन अश्वा चुकवी नेमा ॥११४॥
कर्ण चिडे या पराभवानें
तों रथचक्रा गिळिलें भूनें
अस्त्रांचा ना आठव होई
शल्य तयांतुन टोचित राही ॥११५॥
चाक उचलण्या वंची स्वबला थांब म्हणे कृष्णासी
निःशस्त्रावर बाण न टाकी रक्षी निज धर्मासी ॥११६॥
कृष्ण म्हणे मग त्या उपहासुन
“ धर्म आज तुज सुचला कोठुन
सुप्त पांडवां जतु - सदनासीं
जाळाया जो सहाय्य होसी ॥११७॥
धर्म न सुचला कपटद्यूतीं
सभेंत नेली बळे सती ती
विटंबिता तिज खल दुःशासन
नीचा दिधलें तूं प्रोत्साहन ॥११८॥
अभिमन्यूचा मम बाळाचा
घात मिळुन तूं केला साचा
अशस्त्र होता तो वधतांना
धर्म तदा कां वच सुचला ना ? ॥११९॥
धर्म आठवे नीचा व्यसनीं
ठोकरिलें ज्या पूर्वीं चरणीं
धर्म राखितों सदैव आम्ही
तूंही बडबड कर न रिकामी ॥१२०॥
सोड अर्जुना बाण तीव्रतम अवसर हा साधावा
दुष्टांचा वध करण्यासाठीं संशय कधि न धरावा ” ॥१२१॥
गांडीवाचा गुण आकर्णा
ओढुन सोडी शर वर कर्णा
मस्तक तुटुनी पडलें भूवर
दुःखें लपवी वदन दिवाकर ॥१२२॥
पांडव सेना जयजयकारें
गर्जे अंबर घुमलें सारें
अनाथ झाले अगदीं कौरव
दुर्योधन परि निराश ना लव ॥१२३॥
शल्या नेमी तो सेनेवर
अमर असें कीं अशा दुर्धर
द्रोण भीष्म वृष हे हतविक्रम
शल्य तिथें करणार पराक्रम ॥१२४॥
धर्मा हातें शल्य निमाला
खल दुःशासन भीमें वधिला
हात माखिले तद्रक्तानीं
द्रुपदसुतेची घाली वेणी ॥१२५॥
सरोवरीं लपला दुर्योधन बाहुन त्या बाहेरी
म्हणे वृकोदर लाव प्रणासी दुष्टा शक्ती सारी ॥१२६॥
पाहूं जिंकित कोण अतां पण
भव्य गदा मम फांसा भीषण
द्यूत युद्ध हें चल या ठायीं
दुर्योधन उचलीत गदाही ॥१२७॥
हलधर तो ये तेथें अवचित
बघे शिष्य निज युद्धा उद्यत
म्हणे पुढें मम युद्ध करावे
नियमकुणीही नच मोडावे ॥१२८॥
सतताभ्यासें चपल सुयोधन
लोखंडाचा पुतळा कल्पुन
भीम त्या सवें बारा वर्षे
गदायुद्ध तो करी अमर्षें ॥१२९॥
पुष्ट भीम तो बलिष्ठ देहीं
घावाची त्या क्षिती न कांहीं
सरती फिरती घेती मंडल
घाव हाणिती लावुनियां बळ ॥१३०॥
परस्परा मारिती तडाका
जसे मतंगज घेती धडका
पर्वत जणु पंख न तुटलेल
स्थल कलहासी प्रवृत्त झाले ॥१३१॥
अग्निज्वाला उठे गदांतुन
वीज जशी का घन मेघांतुन
गर्जे भीषण कोसळती गिरि
अचला भूमी गडबडली तरि ॥१३२॥
पाहुनियां श्रीकृष्णें कोणी आटोपत ना कवणा
अंक आपुलो थोपटुनी लव भीमा दिधलें स्मरणा ॥१३३॥
जाणुन तें मग भीमें, भारी -
घाव घातिला दुष्ट शरीरीं
उसळी मारी तों मांड्यावर
बसला झाला चुरा खरोखर ॥१३४॥
भूवर दुर्योधन कोसळला
राग येत परि बलरामाला
मांड्या फोडिन अशी प्रतिज्ञा
सांगुन माधव निववी सुज्ञा ॥१३५॥
द्रोण - सुताच्या अधम कृतींतुन
वांचवीत निजभक्त दयाघन
पांडव झाले विजयी समरीं
सहर्ष आले परतुन शिबिरीं ॥१३६॥
वदे अर्जुना श्री मधुसूदन
“ उतर खालतीं प्रथम रथांतुन
वानरराया जा स्वस्थानीं ”
पार्थ वचें या विस्मय मानी ॥१३७॥
भुभुः कार करूनी कपि गेला त्यजिला रथ भगवंतें
असंभाव्य भडकल्या तोंच की ज्वाला स्पंदन भंवते ॥१३८॥
क्षणांत झाले भस्म तयाचें
भयें च्कित मन सकल जनांचें
धर्म्रा अतिनम्रपणेंसी
पुसे “ काय हें वद हृषिकेशी ॥१३९॥
गुरू द्रोण नी भीष्म पितामह
यांचें अस्त्रे प्रदीप्त दुःसह
प्रतिकार न कीं उचित तयांचा
झाला असता नाश जगाचा ॥१४०॥
अप्रतिकारें अर्जुन - जीवित
तृणसम जळुनी जातें निश्चित
परि हनुमंतें तसेंच मीही
आवरिलीं ती आत्मबलाहीं ॥१४१॥
युद्ध संपता जाई कपिवर
म्हणुन अर्जुना प्रथम महीवर
उतराया मी कथिलें आजी
पार जाहली कार्ये माझी ॥१४२॥
ऐकताच ही गिरा विनतजनपूरित - काम हरीची
उर भरूनी ये, घेई अर्जुन, शिरीं धूळ चरणांची ॥१४३॥
चुंबन घेई पदकमलांचें
‘ तुझ्या प्रभावे फल विजयाचें
गर्व मला लव पराक्रमाचा
तो अनलीं या जळला साचा ॥१४४॥
कृपा करीं रे मेघश्यामल
चित्त ना व्हावें विकारचंचल
जें जें कांहीं घडलें हातुन
सर्व असो तें तुला समर्पण ॥१४५॥
करूनी वारासार रणीची
वाट धरियली गज नगराची
धृतराष्ट्राच्या भेटी साठीं
पंडुसुतांनीं सह जगजेठीं ॥१४६॥
पंडुकुमारां आलिंगाया
अंध आपुल्या पसरी बाह्या
वरिवरि बघतां वाटे प्रेमी
श्रीहरि परि सर्वातर्यंमी ॥१४७॥
भीमा वरती राग तयाचा जाणुन हें कृष्णानें
पुतळ केला पुढें लोहमय चुरिलें त्या चुलत्यानें ॥१४८॥
वदे मुरारे धृतराष्ट्रासी
झी कृती ही, फळली तुजसी
न्यायी पांडव, राग न ठेवी
आपुलीच तीं मुले गणावीं ॥१४९॥
धृतराष्ट्राची वदली भार्या
“ तूं प्रेरक मम कूलक्षया या
वंश तुझा हरि तुझे समोरी
निमे असाची ” हसे मुरारी ॥१५०॥
“ शाप सुखे दे मज गांधारी
दुःख मला नच मी अविकारी
तुझ्या मुलांचें अघोर पातक
अंती झाले तयांस घातक ॥१५१॥
सज्जन आहे धर्म युधिष्ठिर
तो न तुम्हासी येइल अंतर
तुम्हीच त्यागी वडिलां ठायीं
शुभ चिंतावें त्याचें हृदयीं ॥१५२॥
सूज्ञपणें मग धृतराष्ट्रानें
धर्म उरीं धरिला प्रेमानें
निज भक्ताचें प्रिय संपादन
ईशाते या अवघड कोठुन ॥१५३॥
रक्षी वेद, धरीत मंदर गिरी, काढीवरी मेदिनीं
दैत्या फाडित, व्यापिलें त्रिभुवना ज्यानें त्रिपादीं क्षणीं
राजांचा मद नाशिला, दशमुखा संहारिलें, मागुती
झाला अर्जुन सारथी महितला तोची प्रभु श्रीपती ॥१५४॥

‘ समरप्रसंग ’ नांवाचा सतरावा सर्ग समाप्त

लेखनकाल :-
आश्विन शके १८७१

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel