प्रत्येक माणुस सुखाच्या शोधात आहे आणि कुणालाच ते सुख मिळताना दिसत नाही! असे का होत असेल? माणसाची सुखाची कल्पना चुकतेय? की सुखाच्या शोधाची दिशा चुकतेय? की सुख ही प्रत्यक्षात कुठेच अस्तित्वात नसलेली केवळ एक रम्य कल्पना आहे? असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात पिंगा घालू लागतात. अशावेळी मला डॉ. अल्बर्ट एलिस यांनी मांडलेले सुखाचे सिद्धांत अधिक महत्वाचे वाटतात.

डॉ. अल्बर्ट एलिस हे जगातील नामांकित मानसोपचारतज्ज्ञ व मानसशास्त्रज्ञ आहेत. मी इयत्ता अकरावीत असताना यांच्याच मांडणीचा उपयोग करून आयुष्यात प्रथमच " व्यक्तिमत्व विकास" ही संकल्पना समजून घेतली होती. त्याचा मला स्वतःला घडविण्यात खूप चांगला उपयोग झाला. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy ) हा डॉ. अल्बर्ट यांचा मनाच्या संबंधातील सर्वात महत्वाचा शोध आहे. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता. या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती . भावनेच्या आहारी न जाता तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला. त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले. त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत:

१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात, तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो आणि त्या घटनाक्रमाचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात. त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले  आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो.

२) माणसाला वाटणारी भीती ही  कोणत्याही गोष्टीची नसून ती त्याच्याच मनात दडलेल्या भीती या संकल्पनेची असते. ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्षात भीतीदायक नसते, परंतु आपण ती करायला गेल्यास नक्कीच काहीतरी भीतीदायक घडणार असे आपल्याला वाटत असते. पण ती गोष्ट केल्यानंतर लक्षात येते कि असे काही घडलेच नाही. म्हणजेच भीती ही काल्पनिक असते.

३) निराशा येणे ही मनाची स्थिती खरी नसून ती स्वतःविषयीच्या अवाजवी अपेक्षांमुळे तुम्ही स्वतःच निर्माण करता. जगातली दुसरी कोणतीही व्यक्ती `तुम्हाला निराश करू शकत नाही. तुम्ही स्वतःच तसे वाटून घेता.

४) यश आणि अपयश या दोनच पारड्यांमध्ये  स्वतःचे आयुष्य तोलू नका. तुमचे यश हे दुसऱ्या कुणासाठीतरी अपयश असू शकते. तसेच तुमचे अपयश हे कुणाचेतरी  यश असू शकते. त्यामुळे कधीच स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका.

५) जग काय म्हणेल हा विचार खोटा आहे. प्रत्यक्षात कुणालाही काहीही बोलायला वेळ नसतो. आणि जर कुणी काही बोलत असेलच तर ते मनापर्यंत झिरपू  द्यायचे कि कानांवरूनच परतवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे. कोणी काहीही बोलले तरी जर तुमचा तुमच्या कृतीवर विश्वास असेल तर तुम्ही कायम आनंदी राहू शकता.

६) अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही तर स्वतःला कस्पटासमान लेखणे आहे. स्वतःचे अस्तित्व, आपले कुटुंबातील स्थान, समाजातील स्थान यांची जर पक्की जाणीव असेल तर तुमचे कोणावाचून काहीही अडत नाही. दुसर्यांवर प्रेम जरूर करा पण त्या आधी स्वतःवर प्रेम करा.

७) स्वतःला तुम्ही जसे आहात तसे स्वीकारा. आपल्या अपयशाकडे फक्त त्या घटनेपुरतेच पहा. संपूर्ण आयुष्याचे अपयश म्हणून पाहू नका. कारण आयुष्य अजून संपलेले नाही. दुसऱ्यांच्या चूका तर तुम्ही नेहमीच माफ करता. कधीकधी स्वतःच्या चूका सुद्धा माफ करा. जर तुम्ही स्वतःला स्वीकारलेत तरच जग तुम्हाला स्वीकारेल.

८) नैतिक आणि अनैतिक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलतात. त्यामुळे स्वतः मूल्यमापन करून स्वतःच्या नैतिकतेच्या चौकटी आखा. दुसऱ्यांच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नका .

९) शारीरिक व्याधींशी सामना करताना बऱ्याचदा मानसिक संतुलन सांभाळणे कठीण जाते. अशा वेळी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहायला शिका. कोणतेही दुखणे माझ्या शरीराला इजा पोहोचवू शकते, परंतु मनाला नाही. हा विचार करा. मानसिक संतुलन हे आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी खूप महत्वाचे असते .

१०) दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांवर आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर तुमचा ताबा असू शकत नाही. माणूस आपल्याला हवे तसे जगाने बदलावे म्हणून जीवाचा आटापिटा करत राहतो. परंतु प्रत्यक्षात ज्या गोष्टींवर तुमचा ताबाच नाही त्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही. तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता. वाईट घटना घडल्याच का? असा विचार करत बसणे कुणाच्याही फायद्याचे नसते. उलट यानंतर पुढे काय करायचे याचा तर्कसंगत बुद्धीने विचार करणे गरजेचे असते. तसंच अमुक एक व्यक्ती अशी का वागली? याचा फार विचार न करता तुम्ही कसे वागायचे हे ठरवा.

११) कोणताही मनुष्य स्वतःचे त्रासदायक विचार आमुलाग्रपणे बदलवू शकतो. फक्त बदलण्याची गरज आहे ही जाणीव स्वतःला होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ आहे. कारण विचारांच्या बदलांना तुमचे स्वतःचेच विचार आड येत असतात. एक एक नकारात्मक विचार दूर करून त्याजागी सकारात्मक विचाराचे रोपण करावे लागते. परंतु एकदा मनातली अडगळ दूर केल्यावर ती पुन्हा तुमच्याकडे परतत नाही.

१२) वैयक्तिक मालकी हक्क हा फक्त भौतिक गोष्टींना लागू होतो, मानसिक नाही. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीवर हक्क सांगता तेव्हा फक्त त्याच्या शरीरावर हक्क सांगता. त्याच्या मनावर आणि भावनांवर तुम्ही हक्क सांगू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असते.

प्रत्येक माणसाने आपले दैनंदिन जीवन जगताना उपरोक्त सिद्धांत काटेकोरपणे अंमलात आणले तर आपणास उच्चतम मानसिक स्थैर्य मिळते. आपण आनंदानुभवाची अनुभूती घेवू शकतो. जीवनातले खरे सुख हेच असते!

© अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel