मी बरीच वर्षे मनोरुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी म्हणून, मनोरुग्णाच्या सहवासांत घलविली आहेत.  ' मनोरुग्ण ' हा सर्वसामान्यजनांना विनोदाचा विषय असतो. हे एक कटू सत्य आहे. मनोरुग्णाकडे बघण्याचा मनोरंजनात्मक दृष्टीकोण सर्वसामान्यामध्ये आढळून येतो. तुम्ही वेड्याच्या सहवासांत आहात, तुम्हाला कोणता त्रास होतो कां ?  तुम्हाला त्याची भिती वाटते कां ? ते दगड मारतात कां ?  गाणी म्हणतात कां ? नाचतात कां, ते नाचत असताना करमणूक होत असेल ना ?  त्यांची असंबद्ध भाषा ऐकून तुम्हाला गम्मत वाटत असेल नाही का ? कुणी स्वतःला श्रीमंत समजत तर कुणी अधीकारी वा नेता समजून तशा पद्धतीने हातवारे करुन बोलत असेल ? कुणी रडत असेल तर कुणी हसत असेल ? कुणी तासंतास एकाच ठिकाणी हलचाल न करता बसलेला असेल ?  कुणी अंगावरचे कपडे काढून फेकून देत असेल नाही का  ? कितीतरी वैचित्रपूर्ण वागण्याचे नमुने दिसत असतील ना ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारुन माहीती घेणारे अनेक भेटतात. आम्हाला पण एकदा मेंटल हॉस्पिटल बघावयाचे आहे. मिळेल कां त्यासाठी परवानगी ? इत्यादी. ह्या सर्व चौकश्यामध्ये जे दिसून येते ती केवल करमणूक, विनोद, मनोरंजनाची भावना. बंदीस्त झालेल्या प्राणी वा पक्षांच्या संग्रहालयाप्रमाणे.

त्यांचा काय दोष ?   

दुर्दैवैने आणि नशीबाने त्यांच्यावर  ' मनोरुग्ण ' ?  होण्याची पाळी आणली आहे. नियतीच्या खेळाला बळी पडलेली ही मंडळी आहेत. ह्यांचा ह्यात काय दोष असेल ? गुन्हा असेल ? हे एक निसर्गालाच माहीत. कारण कुणीही मनोरुग्ण होऊ शकतो. कदाचित् सभोवतालच्या परिस्थितीमुळे मानसिक संतूलन बिघडलेल्या व्यक्तीला, ती परिस्थिती हानीकारक म्हणून बोट दाखविता येईल व तो योग्य प्रकारे सामना करु न शकल्यामुळे दोष देता येईल. परंतु कित्येक मनोरुग्णाच्या माहीतीनुसार त्याच्या जन्माच्या वेळची परिस्थिती, आई वडीलातील वा अनुवंशीक दुर्गुण, रक्तातील गुणदोष इत्यादी प्रामुख्याने कारणीभुत असलेले दिसतात. त्यावेळी ह्या रुग्णाबद्दल एक वेगळीच भावना येते की, ह्यात त्या रुग्णाचा स्वतःचा कोणता गुन्हा की ज्यामुळे त्याच्या नशिबी  'मनोरुग्ण' होण्याचे आले आहे. ?  परंतु सामान्य माणसे मनोरुग्णाच्या, त्यांच्या मनोरुग्ण होण्याच्या कारणमिमांसेविषयी, परिस्थितीविषयी कुणीही फारसे खोलांत जाऊन तसदी घेत नाही. खरे म्हणजे त्यावर होणाऱ्या नैसर्गिक कोपाबद्दल कुणीही सहानुभूतीने विचार करीत असल्याचे दिसून आले नाही.

अर्थात ज्याच्या नात्यागोत्यामधली व्यक्ती मनोरुग्ण असेल व त्याना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रितीने मनोरुग्णाचा मानसिक वा शारीरिक त्रास होतो, त्यांची मात्र मनोरुग्णाकडे बघण्याची द्दष्टी निराळी असते. ज्याचे ' जळते त्यानाच कळते ' ह्या उक्ती प्रमाणे ते मनोरुग्णाकडे सहनुभूतीने बघतात. त्यांच्याविषयी चौकशी करतात. अशा रुग्णाच्या उपचारासाठी व आरोग्यासाठी ते उत्सुक असतात. ह्यात शंकाच नाही.

आजकाल बऱ्याच सामाजिक संस्था, समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती निरनीराळ्या सामाजीक समस्यांकडे आपली शक्ती, कौश्यल्याचा वापर आणि सहानुभूती व्यक्त करतात. जसे कुटूंब कल्याण, बाल कल्याण, वृद्धाश्रम, अंध व्यक्ती, अपंग, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, एड्स विषयी जाण निर्माण करणे, स्त्रियांवरील अत्याचार, इत्यदी समस्यांचा सामाजीक संस्था अभ्यास करुन त्याबद्दल निरनीराळ्या प्रचार माध्यमाद्वारे सर्व नागरिकांना त्याची माहीती देतात. चर्चासत्र होऊन सहानुभूतीपूर्वक मदत करतात. मात्र दुर्दैवाने अशा पद्धतीने मनोरुग्णाबद्दल लोकजागृती करण्याचे प्रयत्न क्वचितच दिसून येतात.                   

सहानुभीतीची गरज.

ज्या कुटूंबात दुर्दैवाने एखादा मनोरुग्ण असेल, त्याचा त्या कुटूंबाला त्रास तर होतोच. परंतु सर्व शेजारी पण त्याच्या विषयी त्रस्त झाल्याची भावना व्यक्त करतात. त्याला कुणाचीच सहानुभूती मिळत नाही. अशा मनोरुग्णास कसेही करुन त्या वातावरणातून काढून मनोरुग्णालयांत दाखल करण्याचा प्रचत्न होतो. ह्याचा अर्थ त्या मनोरुग्णाच्या विक्षिप्त वागण्याकडे दुर्लक्ष करुन त्याला घरीच ठेवावे असे नाही. परंतु त्याच्या आजाराकडे इतर आजारा प्रमाणे बघीतले जात नाही. एक ब्याद म्हणून समजले जाते. शिवाय अशा मनोरुग्णाला मनोरुग्णालयांत दाखल केले की, संबंधित नातेवाईकापैकी बहूतेक मंडळी त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात. त्याच्या भेटीस येण्याचे टाळतात. तो बरा होत असेल व त्याला घरी नेण्यास सांगीतले तरी कित्येकजण ते टाळतात असे दिसते. मनोरुग्णास उपेक्षित वागणूक दिल्याचे जाणवते. ह्या प्रक्रियेमध्ये कोणतीही सामाजिक संस्था भाग घेऊन मनोरुग्णाच्या पुनर्वसनाकडे फारसे लक्ष देत असल्याचे दिसून येत नाही. हे चित्र निश्चितच निराशजनक आहे.

मनोरुग्णाचे प्रकार      

मनोरुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे रोगी आलेले दिसतात. १) कांही रोगी येतात. उपचारानी बरे होतात व पुन्हा समाजात कार्याकत होतात. २) कांही रोगी अल्पकाळासाठी बाहेर चांगले राहू शकतात. परंतु पुन्हा आपले मानसिक संतुलन बिघडल्यामुळे मनोरुग्णालयांत येतात. ठराविक काळानंतर त्यांचे येणे जाणे चालूच असते. ३)  तिसऱ्या प्रकारातील रुग्णामध्ये बुद्धीची वा मेंदूची जन्मापासूनच परिपूर्णता नसते. आजच्या घडीला असलेल्या उपचारपद्धती त्यांच्यात मुळीच सुधारणा करु शकत नाही. असे मनोरुग्ण हे मनोरुग्णालयांत वर्षानुवर्षे जगत असलेले दिसतात. ह्या वर्गामध्ये असलेल्या रुग्णाची संख्यापण बरीच आहे. कित्येकजण तर २०ते ३५ वर्षे ह्या रुग्णालयांत आहेत. कुणी तरी त्यांना येथे आणून सोडले. कुणाही त्याना बघण्यासाठी येत नाही. त्याना आणताना दिलेल्या पत्यावर कुणीही मिळत नाही. कित्येकजण वेडे, अज्ञानी, न बोलणारे, रस्त्यावर पडलेले, अशा कितीतरी वेगवेगळ्या परिस्थीतीत, लहान वयांत पोलिसानी आणलेले, रुग्ण आहेत की ज्यांचा ठावठिकाणा नाही. मग त्याना कोण बघणार. त्याना कुणाकडे सोडले जाणार. ही सर्वजण मंडळी गरीब आहेत म्हणून नव्हे, तर ते मनोरुग्ण आहेत म्हणून. आज तरी अशा असंख्य रुग्णाना सरकार आसरा देत आहे. येथे मानसिक रोगतज्ञ आहेत. वैद्यकीय मंडळी आहेत. परिचारक वा परिचारीका, आणि इतर सेवक मंडळी आहेत.

सारेजण आपल्या शक्ति व कर्तव्यानुसार  काळजी घेतात. त्या सर्व मनोरुग्णाना जगवितात. म्हणूनच आज कांहीजण ३० वर्षापेक्षाही जास्त काळ मनोरुग्णालयांत रुग्ण म्हणून जीवन जगत आहेत. त्यांच्या शारीरिक प्रकृतीची, खाण्यापिण्याची, इतर नैसर्गिक विधींची काळजी घेतली जाते. आणि म्हणून हे रुग्ण जीवन जगत आहेत.

भयानक वातावरण   

मी येथे उल्लेख करीत असलेल्या माझ्या विचाराला प्रथम समजा. ते खो़डण्यापूर्वी, टिकात्मक दृष्टीकोण घेण्यापूर्वी,  सहानुभूती, भूतदया इत्यादी उच्यप्रतीच्या मुल्याधिष्टीत भावनिक विचार करण्यापूर्वी त्यांच्या जीवनाचा अभ्यास करा.  त्या विरोधक व्यक्तीनी मला प्रत्यक्ष भेटून मनोरुग्णालयातील त्या मनोरुग्णाच्या सहवासांत अल्पसा काळ घालवून स्वतः हे जाणून घेऊन मगच माझा विचार योग्य आहे कां हे ठरवावे. मी हे त्या रुग्णाबद्दल बोलतो ज्यांची परिस्थिती जनावरापेक्षाही वाईट आहे. त्याना फक्त मानव म्हणावे लागते कारण ते माणूस म्हणून जन्मले आहेत. त्यांच्यात बुद्धीचा भाग मुळीच नसल्याप्रमाणे असतो. त्याना भावना विचार इत्यादी असतात हे समजण्यापलीकडचे असते. कित्येकजणाना तर पाणी पाजावे लागते. जेवण चक्क भरवावे लागते. पाणी वा जेवण जरी समोर ठेवले तरी ते घेणार नाहीत. दिले तर ते सांडून देतील. अंगावर कपडे ठेवणार नाहीत. कुठेही संडास लघवी करतील. सारे शरीर बरबटून घेतील. जनावराप्रमाणे दुसरा रोगी ते चाटेलही. कोठेही ओकतील. झोपतील. बैल म्हशींच्या गोठ्यांत चांगले वातावरण अशू शकेल, इतके भयानक वातावरण ह्या रोग्यांच्या सहवासांत असते. ह्याचा अर्थ त्यांच्याकडे मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असेल असे नाही. अशा रोग्यासाठी चार चार कर्मचारी एका एका वॉर्डत असतात.  रोग्याना खाऊ-जेऊ घातले जाते. नियमित वेळवर पाणी दिले जाते. स्वच्छता राखली जाते. स्नान घातले जाते. कपडे बदलले जातात. ज्याप्रमाणे आई आपल्या लहान मुलाचे सर्व कांही करते,त्याप्रमामेच येथील कर्मचारी रुग्णासाठी सर्व ते करीत असतात. येथे रुग्णाच्या शारिरीक वाढीचा प्रश्नच उदभवत नाही. परंतु ते मेंदूच्या विकारांनी त्रस्त आहेत. एक कधीही बरी न होणारी नैसर्गिक व्याधी. ते आहेत तसेच जगणार. एका कष्टमय, भयानक विकलांग परिस्थितीमध्ये जीवन कंठणार. फक्त अन्न-पाणी मिळते म्हणून जगणार. ह्या पलीकडे कोणतेही सत्य द्दष्टीक्षेपांत नाही.

( पुढे येथे दिलेला ही सत्य घटना १९७५ च्या सुमाराची. हा एक स्वानुभव. कदाचित् आज तो बारकू नॉट नोन जीवंत नसेलही. माहीत नाही. परंतु आजही असे कित्येक दुर्भाग्यपूर्ण रुग्ण तेथे आढळतील. त्यांच्यासाठी - - - - - )

३ ठाणे मनोरुग्णालय, हॉस्पिटलचा वार्ड नंबर १२ मध्ये वैद्यकीय आधीकारी म्हणून काम बघत होतो. जवळ जवळ ४०/४२ वॉर्डस असलेले हे प्रचंड रुग्णालय. पुरुष आणि स्त्री असे दोन विभाग आहेत. तेथे आजच्या   ( १९७५ ) घडीला १८०० ते २००० रुग्णांची काळजी घेतली जाते.एक अतिशय रोमांचकारी व वेगळेच जग ह्या वातावरणात असल्याची जाणीव येवू लागते. आपण मृत्यु लोकातली माणसे. ज्यानी स्वर्ग व नर्क बघीतलेला नसतो. फक्त काल्पनीक रंगविलेले चित्र डोळ्यासमोर आणले जाते. प्रत्यक्ष स्थिती कशी असेल हे अनुभवाशिवाय कसे समजणार ?   मनोरुग्ण यांच्या कथाच सामान्य माणसे वाचतात, वा ऐकतात. त्यांच्या व्यथा मात्र बहूतेकांना अपरिचीत असतात. आपल्याच निर्माण केल्या गेलेल्या जगातील एक वेगळेच असे हे मनोरग्णालयाचे वातावरण. सर्व सामान्य लोकानांच काय, वैद्यकीय व्यवसातील इतर शाखामधल्या कित्येकानाही ह्या वातावरणाची मुळीच जाणीव नसते. फक्त जे मनोविकारतज्ञ असतील अथवा तेथील वातावरणांत जे आपला काळ व्यवसाय, नोकरी ह्या निमित्त्याने घालवित असतील त्यानाच ह्याची खरी जाणीव  येणार.

एका रुग्णाची फाईल माझ्या समोर वार्ड इनचार्जने आणली. तक्रार होती की त्या पेशंटचे वजन मागील महीन्याच्या तुलनेंत कमी होत चालले आहे. मी उठून त्या पेशंटकडे गेलो. वार्डमध्ये तो मान खाली घालून सतरंजीवर बसला होता. कोणत्याही हलचाली करीत नव्हता. अंगावर कपडे नव्हते. वार्डातील कर्मचारी व नर्सींग स्टाफकडून प्रथम त्याची माहीती घेतली. तो असाच तासंतास बसून असतो. अंगामध्यें घातलेले कपडे काढून टाकतो. फाडून टाकतो. अंगावर कपडे ठेवीत नाही. हालचाल फार क्वचित् करतो. त्याला दोघानी उचलून जरी चालविले तरी तो चालत नाही. परंतु त्याचे हातपाय धडधाकट आहे. संडास लघवी तो जेथे बसला, तेथेच व केंव्हाही करतो. त्यातच लोळतो. त्याला स्वतःला स्वच्छतेची मुळीच जाणीव नाही. त्याला प्रत्येक वेळी स्वच्छ करुन वेगळ्याजागी बसवावे लागते. जेथे बसतो तेथेच थुंकतो. कित्येक वेळा त्याचे वागणे किळसवाणे वाटते. तिच थुंकी चाटतो, वा विष्ठापण तोंडात घालतो. सारे वर्णन अंगाला शहारे आणणारे होते. त्याला स्वच्छ ठेवण्याची कर्मचाऱ्यांची कसरतच असते. त्याला बोलता येत नाही. कोणत्याही अवाजांचे ध्वनी काढता येत नाहीत. त्याच प्रमाणे आपले बोललेले कांहींच कळत नाही. त्याला खुणा देखील समजत नाहीत. खाण्यापिण्याची त्याला मुळीच जाण नाही. भरविले तरच खातो. किंवा पाणी पाजले तर पितो. परंतु त्याच्याजवळ पाण्याचा ग्लास ठेवला किंवा जेवण्याचे ताट ठेवले तरी तो स्वतः ते घेत नाही. खाण्यापिण्याच्या क्रिया नैसर्गिक परंतु त्याच्यात उत्स्फूर्ता नाही.  त्याला वयाच्या १४ व्या वर्षी ह्या रुग्णालयांत दाखल केले होते. रस्त्यावर वेडेपणाच्या हलचाली बघून पोलीसांनी त्याला मनोरुग्णालयांत आणले होते.                                                      

त्याचा त्याच वेळी कोणताही ठाव ठिकाणा माहीत नव्हता. त्याच्या पालकाची वा नातेसंबधाची माहीती उपलब्ध नव्हती. छोटीशी बुटकी अंगकाठी म्हणून व ठाव ठिकाणा माहीत नसल्यामुळे नॉट नोन अर्थात् बारकू नॉटनोन  ह्या नावाने तो ओळखला जाई. त्यावेळच्या मनोविकार तज्ञाच्या वैद्यकीय टिपणी बघितल्या. बारकू नॉटनोन ह्यारुग्णाचे निदान त्यावेळी मिक्रोकिफँली विथ मेंटल रिटारडेशन ( Microcephaly  with mental retardation ) अशी नोंद केलेली होती.  त्या नंतर निरनिराळ्या काळामध्ये पुन्हा त्याची तपासणी होऊन, मानसिक रोगासंबंधीचे अहवाल वाचण्यात आले. बऱ्याच मनोविकार तज्ञाच्या टिपणी होत्या. परंतु त्यांच्या निदनामध्ये कोणताच फरक आढळला नाही. हे मेंदूमधले अपंगत्व आहे. जन्मतःच त्याचा मेंदू लहान आकाराचा होता. निसर्गमध्येच तो अविकसीत होता. त्याच्या वाढीला कोणत्या तरी कारणानी पायबंद पडला होता. जसे नारळाच्या आकाराऐवजी मोसंबीच्या अकाराचा असावा, असे समजण्यास पुरेसे आहे. आणि ह्याच त्याच्या वाढ न झालेल्या मेंदूमुळे त्याचे सर्व ज्ञानेद्रिय संकूचित् राहीले. मेंदूमधली ही उपजत न्युनता कधीही न भरुन येणारे अपंगत्व होते. दुर्दैवाने हेच त्याच्या नशिबी आले होते. लहान आकाराच्या मेंदूमुळे त्याचे ज्ञानमय कार्य जरी खंडीत झाले, तरी त्याच्या शरीरामधले इतर अवयव एकदम तन्दुरस्त होते. ते त्यांच्या पद्धतीने कार्यारत होते. त्याना लागणारे जीवन पदार्थ जसे हवा, पाणी, अन्न, व इतर घटक पदार्थ सतत मिळत गेल्यामुळे त्याच्या शरीराची वाढ व्यवस्थित आणि सामान्यपणे होत चालली होती. त्याचे शरीर ६० वर्षापेक्षा ज्यास्त वर्षे जगत होते.  नॉट नोन बारकूची केस पेपर फाईल, मोठी जाडजूड झालेली होती. इतक्या वर्षाच्या त्याच्या रुग्णालयातील वास्तव्यांत त्याच्या वजनाचे चढउतार दिसले. त्याच प्रमाणे थंडीताप, जुलाबवान्त्या, शारीरिक इजा,

४ काविळ, सर्दीखोकला इत्यादी वैद्यकीय आधिकाऱ्याच्या नोंदी व त्यावरील इलाज दिसून आले. परंतु सर्व ठिकाणी Subjective Observations ह्याचीच नोंद होती. जे तपासांत डॉक्टराना दिसले वा कळले त्याच बाबी तेथे होत्या. कोणत्याच ठिकाणी  Objective नोंदी अर्थात रुग्णाचे पोट दुखणे, हात पाय कंबर दुखणे, सांध्ये दुखणे, चक्कर वाटणे अशा तक्रारी ज्या रोगी व्यक्त करतात त्यांच्या कोणत्याच नोंदी त्यात नव्हत्या. आणि तसे असण्याची मुळीच शक्यता नव्हती. कारण तो रोगी हे विकार वा तक्रारी करण्यास असमर्थ होता. त्याचा अर्थ त्याच्या रुग्णालयातील वास्तव्यात त्या वरील वेदना झाल्या नसतील असे मुळीच नाही. त्या फक्त कळू शकल्या नाही एवढेच. त्या व्यक्त केल्या गेल्या नव्हत्या. फक्त सहन केल्या गेल्या. एखाद्या मुक्या जनावराप्रमाणे.

वैद्यकीय अधिकारी ह्या नात्याने ह्या रुग्णालयामध्ये अशा प्रकारच्या बऱ्याच केसेस नित्य बघण्यांत येत होत्या. परंतु आज ह्या नॉटनोन बारकूने, मनामध्ये तुफान निर्माण केले होते.

जवळ जवळ सारे आयुष्य तो येथेच पडून होता. कोणी दिली ही जन्मठेप त्याला ? त्यांत बारकुचा दोष कोणता ? तो जन्मतः मेंदूने अपंग होता. निसर्गाने लादलेले दुर्दैव. आणि त्याला आम्ही जगवित त्याच्या आयुष्याची दोरी मजबुत करीत होतो.त्याचे तडफडणारे आयुष्य, हाल अपेष्टापूर्ण जीवन केवळ बघत राहणे हेच आमच्या हातचे होते. मनोविकार म्हणून त्याला असे कोणतेच औषध दिले जात नव्हते. कारण त्याची आता गरज नव्हती.                                                         

त्याचे वजन एक किलो कां कमी झाले ? ह्याचे आम्हास वरिष्ठांना उत्तर द्यावे लागत होते. त्याला म्हणजे त्याच्या शरीराला कोणतीही उणीव सहन केली जात नव्हती. त्याचे खाणे पिणे ह्याकडे पूर्ण लक्ष देऊन, त्याच्या शरीरवाढीसाठी त्याच्या धडाला कसे धडधाकट ठेवले जाईल, हे बघणे येथील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांचे कर्तव्य होते. ते पार पाडण्याची सर्वजण कसरत करीत होते.

प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा मुलभूत हक्क आपल्या राज्य घटनेने दिलेला आहे. आणि हा हक्क सुजाण वा अजाण ह्या सर्व जीवंत मानवी व्यक्तीसाठी आहे. ज्या व्यक्ती अजाण शुशू, बालक, मनोरुग्ण वा कोणत्याही कारणाने पिडीत असतील तर त्यांना त्यांच्या जगण्यासाठी इतर व्यक्ती, कुटूंबे, समाज, अथवा शासन यांनी मदत केली पाहीजे. प्रत्येक व्यक्ती ही राष्ट्राची संपत्ती समजली गेली आहे. तीचे रक्षण झालेच पाहीजे.   

कोणत्याही कारणास्तव त्याचे जीवन हिरावून घेण्याचा कुणासही अधिकार नाही. ढोबळमानाने व्यक्त केला गेलेला हा विचार आहे. आणि त्यांत मिळालेल्या जीवनाचे महत्व जाणले गेले आहे. ज्याना जीवन देता येत नाही त्याना ते हिरावून घेण्याचा मुळीच अधिकार मिळू शकत नाही. जीवन मिळते फक्त निर्सगाकडून, ईश्वराकडून तेंव्हां त्या मिळालेल्या अनमोल ठेव्याला जपण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहीजे. यांत दुमत नाही.             

केंव्हा केंव्हा हेच मिळालेले जीवन जगणे असह्य होते. सहन करण्याच्या मर्यादेच्या बाहेर जाते. अशावेळी ती व्यक्ती आत्महत्या करुन ते जीवन संपवू इच्छीते. कित्येक त्यांत यशस्वी होतात देखील. अथवा अयशस्वी होतात. आत्महत्याची प्रक्रिया हा मोठा विषय असून त्यावर वरेच कांही व्यक्त करता येईल. आत्महत्या चुक का बरोबर हे वातावरण,परिस्थीती आणि त्या ठराविक व्यक्तींचे स्वभाव ह्यावरच अवलंबून असेल.  सर्वोच्या न्यायालयाच्या एका निकालानुसार आत्महत्येस प्रवृत्त झालेल्या व्यक्तीना सहानुभूतीची, जाणून घेण्याची खरी गरज असते. न की शिक्षेची.  राष्ट्राच्या समाजाच्या परिस्थीतीनुसार धारणेनुसार कायदे केले जातात. बदलत्या काळानुसार  आणि गरजेनुसार त्या मुल्ल्यांमध्ये बदल केलेली बरीच उदाहरणे अस्तित्वांत आहेत. नैसर्गिक अथवा ईश्वरी कलाकृती, ह्या अत्यंत कुशलतेने केलेल्या आणि सर्व अंगानी परिपूर्ण असतात. त्यात दोष निर्माण होण्याचा प्रश्नच नसतो. तोच जीवन देतो. त्यामुळे त्यात कोणतीही कमतरता राहण्याचे कारणच नाही. आज जो कांही दोष दिसतो, जे न्युन वाटते, अथवा विकारमय वाटते ते केवळ मानव निर्मीत आहे. जीवनाच्या निर्मीतीनंतर त्याच्या निरंतर कार्यांरत राहण्यासाठी जे महत्वाचे घटक पदार्थ, जसे हवा, पाणी, अन्न इत्यादी हे त्यानेच निर्माण केले. परंतु मानवाने ह्या साऱ्याचे विक्षीप्त रुपांतरण सुरु केले. ह्य़ाच दुषीतपणाचा त्या जीवनावर विपरीत परीणाम होऊ लागला. ह्यामुळेच निसर्गातूनच अपंगत्व निर्माण होऊ लागले. कोण जिम्मेवार आहे त्या दुर्दैवी व्यक्तीसाठी? ज्यांचे मेंदू जन्मतः अपंग आहेत. शरीरामधल्या अवयवांचे कार्य व्यवस्थीत पार पाडण्यास असर्मथ आहेत.  मनुष्य जीवन देऊ शकत नाही. हे सत्य आहे.

५ परंतु जीवनाला उध्वस्त करण्याचा त्याला काय अधिकार? आणि जर त्याने चूक केली असेल तर ती दुरुस्त करणे, निस्तरणे हे त्याचेच कर्तव्य नव्हे काय ?                                                 

मानवाच्या प्रायोगिक महत्वाकांक्षेमुळे जर जीवनाचे एवदे अंग प्रगतीपथावर चाललेले दिसत असले तरी त्याच्या प्रयत्न्यांच्या मार्गावर होणाऱ्या इतर समांतर हानीकडे तो डोळेझाक करुन दुर्लक्ष करणार, हे चुक आहे.    थोड्याच वर्षापूर्वी म्हणजे १९५५ च्या सुमारास थ्यालाडोमाईड ही औषधी एका रोगासाठी अत्यंत उपयुक्त म्हणून शोधली गेली. परंतु अल्प काळांत असे दिसून आले की गरोदर स्त्रियामध्ये ह्याचे विपरीत परिणाम होत आहेत. त्यांची नवजांत बालके अपंग जन्मु लागली. अशा अपंग बालकांची संख्या जवळ जवळ चार हजारावर गेली.  डब्व्लू. एच. ओ. ( World health organization ) आणि इंग्लंडमधील आरोग्यखाते हादरुन गेले. सरकारने त्या औषधाच्या उत्पादन, वितरण व वापर यांवर त्वरीत बंदी घातली. कित्येक औषधाचा इतिहास अशाच प्रकारे सिद्ध झालेला आहे.  त्याची उपयुक्तता एका अंगानी खूपच वाटली. परंतु त्याचे इतर दुष्परीणाम शरीरावर होऊन शेवटी ती हानीकरक असल्याचे जाणऊन बंद करण्यांत आली. ह्या प्रयोगाचे मानवी शरीरावर दुरोगामी परिणाम होत आहेत. रक्त दोषांची मालीकाच निर्माण होऊन, मानवी आरोग्याचा पायाच खचला जात आहे. ह्याला फक्त मानवी हस्तक्षेपच जबाबदार आहे. निसर्गाच्या व्यवस्थेला धक्का देत, जेंव्हा मानव पूढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे, तेंव्हा निर्माण होणाऱ्या समस्याना तोड देणे, मार्ग काढणे, हे त्याचेच कर्तव्य ठरते. मीच अर्थात तो मानव त्या दुर्दैवी व्यक्तीच्या अपंगाला कारणीभूत असेल तर त्याच्या हाल अपेष्टा या पासून सुटकेसाठी मीच त्याला मान्यता देणे हे शहाणपणाचे, सांमज्याचे ठरणार नाही कां ? अपंगत्व हे जर मानव निर्मीत परिस्थितीचे फळ असेल तर अशा फळास सडत ठेवीत प्रत्येकापूढे प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापेक्षा ते नष्टकरणे, केंव्हाही विचारवंताचे लक्षण असेल. दया मरण हाच ह्यावरचा सुजाण उपाय. निरनिराळ्या तज्ञाकडून ह्यावर अभ्यास व विचार व्हावा. केवळ भावनेचा व तर्काचा येथे विचार नसावा. ज्या वेळी ह्या विषयावर अभ्यास व्हावा म्हटले जाते, त्याचा अर्थ केवळ पुस्तकी ज्ञान, मासिके वृतपत्रे ह्यामधील माहीतीचे संकलन वा संपादन असे सिमीत असू नये. अशा प्रकारच्या रोगपिढीत अनेक रोग्यांशी सतत संपर्क ठेऊन, त्यांच्यातील असहाय्यतेला समजले पाहीजे. त्यांच्या सहवासांत बराच काळ राहून , त्यांच्या अव्यक्त दुखाःच्या जाणीवेशी भावनीक जवळगी केली पाहीजे. त्याचे तडफडणारे जीवन खऱ्या अर्थाने समजून घेतले पाहीजे. जाणून घेतले पाहीजे. अनुभवून घेतले पाहीजे. तेंव्हाच तुम्ही व्यक्त करणारे विचार हे योग्य आहेत कां ?  हे तुम्हालाच कळेल.       

भूत दया, अहिंसा ह्या महान शब्दाचे महत्व प्रत्येक मानव, ज्याला भावनेचा थोडासा जरी ओलावा असेल त्याला नक्कीच समजते. परंतु असे म्हणतात की प्रत्येकाच्या लक्ष्मण रेखा असतात. ज्या त्याची मर्यादा वा हद्द सूचित करतात. ज्या जीवाच्या वाचण्यामुळे त्याचे भले होण्या ऐवजी, जर कुणी त्याचे अप्रत्यक्षपणे, अजाणतेणे, जन्मभर हाल हाल करणार असेल, तडफडत जीवन जगण्यास भाग पाडत असेल, तर ही भूतदया अज्ञानातून जन्मली असेच म्हटले जाईल.  

कित्येक तथाकथीत पंडीत, अभ्यासक, तत्वज्ञानी, आपापल्या घरांत बसून, एयर कंडीशनरुम मध्ये बसून, लेखणीच्या जोरावर, शब्दांच्या खेळावर, तर्कज्ञानावर, भाष्य करीत असतात. प्रत्यक्ष परिस्थितीची अशाना जास्त जवळीक नसते. मात्र ते  कोणत्याही विषयाला प्रसंगाला ईच्छीत विचाराप्रमाणे वाकविणारे असे असतात. ते आपल्या विचारांप्रमाणेच करणार. हा कदाचित् अहिंसा, भूतदया अशा महामंत्राचा दुरोपयोग असेल असे माझे प्रांजळ मत आहे.    ह्या महान ज्ञानी पंडीतांची मी मनापासून कदर करतो. अभिवादन करतो. त्याच क्षणी त्यानी सत्य परंतु एका कठोर व परिस्थितीचा एकरुप होऊन अभ्यास करावा. त्यानी दयामरण ह्या विषयासाठी लेखणी हाती घ्यावी.

असा एक अनुभव आहे की कुणाचे जीवन रोका, नष्ट करा, ह्या प्रक्रियेचा शाब्दीक अर्थ घेतला जातो. कुणाला मारणे ही बाब भारतीय संस्कृतीला झेपणारी नाही. आपण सहीष्णू आहोत. विशेषकरुन ज्या ठिकाणी अनेक पंथ, विचारधारा ह्या जोमाने कार्यारत आहेत. कुटूंब नियेजन ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी, जो विचार  पूढे आला त्यांत लहान मर्यादित कुटूंब सुखी कुटूंब ह्याच्या संकल्पनेला चालना दिली गेली.  अपत्य ही ईश्वरी देण, ह्या विचाराने त्याला खूप विरोध झाला. त्याच्या कार्यक्रमामध्ये बिजांकूर न होऊ देणे, गर्भाला रोकणे, प्राथमिक अवस्थेत ते काढून टाकणे, गरज पडल्यास शस्त्रक्रिया करणे, इत्यादी अनेक उपाय

६ सुचविले गेले. सुरवातीस खुप विरोध झाला. परंतु आता बहूतेकजण त्याला मान्यता देऊ लागले आहे. कारण त्याना सत्य परिस्थितीची जाणीव येऊ लागली.  

दया मरण ह्याचा अर्थ त्या व्यक्तीला मारुन टाकणे ह्या भयावह समजूतीत घेऊ नये. त्या दुर्दैवी व्यक्तीची, त्याच्या अनैसर्गिक कष्टदायी जीवन जगण्याच्या परिस्थितीतून सन्मानपूर्वक सोडवणूक करणे. त्याला कसलाही शारिरीक त्रास होणार नाही, ह्याची काळजी घेणे. हे अत्यंत गरजेचे असेल. कायदाचा मसुदा हे त्या क्षेत्रातील तज्ञ विचार करुन त्याची रुपरेखा मांडतील. दयामरण हा विचार, त्यासाठी कायद्याची चौकट, हे तज्ञाचेच काम असेल.              

आजच्या घडीला तो नॉटनोन बारकु कोठे असेल कांहीच ज्ञात नाही. एक मात्र आजही सत्य आहे की अशा अवस्थेमधील, अशाप्रकारच्या रोगाने पिडीत आजही अनेक अनेक बारकू नॉट नोन प्रतीक्षा यादीत असतील. जे की अशा कित्येक मनोविकार रुग्णालयांत खिचपत, तडफडत, हालअपेष्टा सहन करीत जीवन कंठीत असतील.  

ईश्वर जर त्या रोग्याना बुद्धी देण्यास त्याच्याच नैसर्गिक नियमामुळे अडचणीत असेल, तर त्याच्यावरचा उपाय काढण्यास मानवाला योग्य बुद्धी द्यावी ही प्रार्थना.    

केवळ भोग भोगणे हेच जीवन

जेंव्हा असल्या संपूर्ण वाया गेलेल्या रुग्णांना वा बऱ्या होऊ न शकणाऱ्या रुग्णाकडे बघीतले जाते तेंव्हा विचार पडतो की, ह्यांचे जीवन कशासाठी ? हे केवळ मनुष्य आहेत म्हणून ? त्याना कायद्याने कुणी मारु शकत नाही म्हणून ? नरकवास भोगणाऱ्या ह्या मानवाकडे वेगळ्या भुमिकेतून कुणी बघणार नाही कां ? त्यांच्या पोटांत दुखत असेल, त्यांना असंख्य वेदना होत असतील, तर कळण्यास मार्ग नाही. ते आपले दुःख व्यक्त करण्यास पूर्णपणे असमर्थ आहेत. केवळ भोगणे हेच त्यांच्या नशीबी आलेले दिसते. एक अत्यंत असमाधानी, भयावह, आणि ज्याची उकल करण्याची शक्ती कुणांत नाही, अशी ही परिस्थिती. त्यांच्या ह्या नर्क यातना त्यांच्या मृत्युमुळेच सुटलेल्या आम्ही बघतो.    

स्वतंत्र यंत्रणा असावी

आपण सारी सुसंकृत, शिक्षित आणि समाज मुल्यांची जाण असलेली माणसे आहोत. ह्या अशा दुर्दैवी व्यक्तीसाठी दयामरण  हेच आजच्या घडीला उत्तर आहे. त्याचा प्रत्येकाने विचार करावा. सरकारने अशा दुर्दैवी जीवांची सुटका भूतदया ह्या जाणिवेमधून करावी. अशासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा असावी. ज्यामध्ये मानसोपचार तज्ञ, उच्य न्यायालयाचे न्यायाधीश, पोलीस अधिकारी, प्रतिष्ठीत बुद्धीवादी नागरीक, समाजसेवक इत्यादींचा समावेश असावा. सर्वानी स्वतंत्रपणे अभ्यास करुन आपला अहवाल सादर करावा. दयामरण मान्य करण्याचे त्यानुसार ठरवावे. केवळ विरोधासाठी विरोध करु नये. असा खऱ्या दुर्दैवी व्यक्तीची मुक्तता ही त्यांच्या आत्म्याला मुक्त केल्या सारखे ठरेल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel