जेंव्हा ठरले गावी जाणे       हूर हूर होती  मनी
बराच काळ गेला होता      आयुष्यातील निघुनी
काय तेथे असेल आता          सारे गेले बदलूनी
काळाच्या प्रवाहामध्ये        राहिल कसे टिकूनी
चकित झालो बघुनी         सारे जेथल्या तेथे
उणीवता न जाणली      क्षणभर देखील मानते
बालपणातील सवंगडी     जमली अवती भवती
गतकाळातील आनंदी क्षण    पुनरपि उजळती
आंबे चिंचा पाडीत होतो        झाडावरती चढुनी
आज मिळाला तोच आनंद    झाडा खालती बसूनी
मळ्यामधली मजा लुटली      नाचूनी गाऊनी
विहिरीमधल्या पाण्यात      मनसोक्त ते डुबूनी
ऐकल्या होत्या कथा परींच्या     तन्मयतेने बसूनी
आज सांगे त्याच कथा मी     काका मुलांचे बनुनी
वाडा सांगे इतिहास सारा    पूर्वज जगले कसे
भव्य खिंडारी उमटले होते    कर्तृत्वाचे ठसे
बापू, आबा, मामा, काका,     मामी वाहिनी जमती
कमी न पडली तसूभरही       प्रेमामधली नाती
मीही बदललो, गांवहीं बदलले     काळाच्या ओघांत
आनंद मात्र तो तसाच होता     पूर्णेच्या परिसरांत
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel