तो म्हणतो,  ‘जी गोष्ट अमेरिकेतील प्रत्येक शहर व प्रत्येक नगर यांना अधिकच यथार्थतेने लागू आहे.’ कदाचित न्यायाधीस लिंडसे याचे लिहिणे थोडे अतिशयोक्तूपूर्ण असेल व परिस्थिती इतकी बिघडली असेल, असे मानलेच पाहीजे असे नाही. असे नाही;  तर विवाहित स्त्रीचे प्रियकर असलेच पाहिजेत असे त्यांना वाटते ! लैंगिक स्वैरतेची आवश्यकता आहे. ते एक कर्तव्यच आहे, असेही म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे !  सामाजिक निर्बंध स्त्रियांपुरते तेवढे असतात व पुरुषांना मात्र मोकळीक असते, ही गोष्ट मान्य करायला स्त्रिया तयार नाहीत. स्त्रियांनाही मोकळीक का नको ? ही स्त्रियांवरची बंधने कितीही पक्षपाताची असली, अन्यायाची असली, तरी ती बंधने झुगारुन देणे कठीण आहे व धोक्याचेही आहे. स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे आहे. वैवाहिक बंधनापासून मोकळीक पाहिजे आहे. मातृत्वाची जबाबदारी त्यांना नको आहे. पुष्कळशा चुणचुणीत व तरतरीत अशा तरुणींची ही अशी महत्त्वाकांक्षा आहे. काडीमोड वाढत आहेत. मुलांची आईबापांमध्ये ढकलाढकली चालली आहे. आणि हे आई-बाप आपापल्या वकिलांमार्फत एकमेकांशी बोलणे, चालणे करीत असतात.

स्त्री-पुरुषांच्या या संबंधात चार भिन्न अशी मते प्रदर्शिली जातात. नियतीवादी म्हणतात, की आपण पूर्वापार पद्धतीनेच पुढे जाणे बरे. प्रेमहीन विवाह जर वाईट असेल, तर विवाहहीन प्रेम केवळ पृथ्वीवरील नरकच होय. प्रेमाचा प्रकाश असला, तरी जेथे धार्मिक विधी नाही तो विवाह गर्हृयच  होय. आणि प्रेमाचा गंध नसलेलाही विवाह जर तो धार्मिक असेल तर तो स्तुत्य होय.

आदर्शवादी म्हणतात की, ज्या अर्थी जग हे बदलत असते, त्या अर्थी कोणतीही स्मृती सार्वकालीन असणे शक्य नाही. बदलत्या काळाबरोबर नियम व विधीही बदलले पाहिजेत. केवळ उच्च ध्येयांच्या शिखरावर दृष्टी खिळवण्यात अर्थ नाही. व्यवहाराच्या भूमीवर उतरुन आपण पाहिले पाहिजे आणि व्यावहारिक जगात एकदा आले म्हणजे मोठी मोठी तत्त्वे व प्रत्यक्ष आचार यांच्यात किती विसंगती असते ते दिसून येईल. आपली जी सनातन मते आहेत, जी पूर्वापार चालत आलेली विचारसरणी आहे, त्यामुळे पुष्कळशा स्त्रियांना खरा विषयानंद भोगणे दुरापास्त झाले आहे. त्यांना लैंगिक भूक नीट शमविता येत नाही. त्यांना समाधान लाभत नाही. उदाहरणार्थः ग्रेट बिटन घेऊ. ग्रेट ब्रिटनमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या वीस लक्षांनी अधिक आहे. धर्मावरची श्रद्धा कमी होत असल्यामुळे स्त्रियांची ही जादा संख्या निरनिराळ्या धार्मिक संस्था, मठ वगैरे आपल्यात मिळवून घेऊ शकत नाहीत. मग या स्त्रियांचे काय करायचे ? अशा परिस्थितीत एका पुरुषाला एकच बायको असावी अस जर आपण म्हणू, तर बाकीच्या स्त्रियांनी का ब्रह्मचर्य पाळायचे ? परंतु सक्तीचे ब्रह्मचर्य याला काहीच अर्थ नाही. जुन्या रुढींना ज्यांचे बळी पडतात, त्यांना वैषयिक सुखांना आपण आचवावे असे मनातून वाटत असते का ? नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel