‘भोजू, चित्रा सापडली तरच आता बरे दिवस येतील. माझे भाग्य चित्राशी जणू जोडलेले आहे. ती जन्मली व आम्हाला  ऊर्जितकाळ आला. मुले वाचू लागली. कोठे आहे चित्रा? कधी भेटेल? आज नोकरी गेली. बेकार झालो. उद्या काय होणार? कोठे आता थांबणार संकटांची ही गाडी? येऊ लागली की लागोपाठ येतात. नोकरीत आजपर्यंत कोणी नाव नाही ठेवले मला! परंतु
आज मी नालायक ठरलो. लक्षच लागत नाही. आठवणच राहात नाही. सुचत नाही. काय करू मी? भोजू, मला वेड लागेल असे वाटते! सारखी चित्रा डोळ्यांसमोर येते.’

‘धनी, सारे चांगले होईल. धीर नका सोडू.’

‘परंतु वेड लागणार नाही धनी.’

‘परंतु मला कबूल कर. तू नाही ना सोडून जाणार? सध्या आम्हाला साडेसाती आली आहे. तू नको हो सोडून जाऊ. भोजू, आमच्याजवळ पैसेही’ फार नाहीत. मी लाचलुचपत घेतली नाही. जो कोणी मदत मागेल त्याला नाही म्हटले नाही. कितीतरी शेतक-यांना मी पैसे दिले. त्यांच्या लग्नाला दिले. अरे त्यांचेच पैसे. मी उपकार केले असे नाही मी म्हणत. हिला एक चार दागिने केले तेवढेच. उद्या मी वेडा झालो तर कसे व्हायचे? मुलांचे शिक्षण कसे व्हायचे? भोजू, तू यांना सोडू नको हो. कबूल कर.’

‘नाही हो सोडणार. काही कमी पडू देणार नाही. माझे तिकडे माझ्या मुलखात घरदार आहे. थोजी शेती आहे. वेळ आली तर ते मी विकीन, परंतु सांभाळीन सर्वांना. तुम्ही काळजी करू नका. परंतु सारे चांगलेच होईल. काळजी नका करू. चित्राताई भेटतील. त्यांचे यजमान भेटतील.’

घरात आता आनंद नव्हता. सारी सचिंत होती. सीताबाई रडत बसत. बळवंतराव भ्रमिष्टासारखे करीत. श्यामू, रामू, दामू आईजवळ बसत. त्या मुलांना रडू येई.

‘आई बाबा कधी होतील बरे?’ श्यामू विचारी.

‘चित्राताई आली तर बरे होतील.’ ती सांगे.

‘आम्ही जाऊ का शोधायला?’ ती मुले विचारीत.

‘तुम्ही लहान आहात रे.’ ती म्हणे.

‘सीतेला शोधायला वानरसुद्धा गेले. आम्ही तर माणसे.’ श्यामू म्हणे.

‘अरे ते वानर नव्हते. ते देव होते. मारूती म्हणजे का साधे माकड?’ तुम्ही शाळेत जात जा. परिक्षेत पास व्हा हो बाळांनो. जातील हे दिवस उगी. रडू नका. आणि बाहेर कोणी काही विचारले तर फार बोलत नका जाऊ. समजले ना?’ सीताबाई सांगायच्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel