लहानपणापासून प्रकाश तसा मोह, मायेपासून विरक्तच होता. चैनीच्या वस्तू, ऐश्वर्य, पैसा, प्रसिद्धी या सर्व गोष्टींचा त्याला कधीच मोह नव्हता. धन-संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तो ज्ञानाला अधिक महत्व देणारा होता. पोटापाण्यासाठी धडपड करायला शिकविणारी, सतत एकमेकांशी स्पर्धा करायला शिकवणारी आणि फक्त पैसा मिळवण्याचे मध्यम असलेली शिक्षणपद्धती त्याच्या मनाला न पटणारी होती. अशा प्रकारचे शिक्षण त्याच्यासाठी जणू एक खेळच होता. त्यामुळे त्याने कधी मन लावून शिक्षण घेतलेच नाही. परीक्षा तोंडावर आल्या की, जेमतेम अभ्यास करून साठ-सत्तर गुण मिळवायचे. त्याला फक्त एवढेच माहित होते. म्हणून भरपूर गुण मिळवून शाळेत किंवा कॉलेजमध्ये नंबर वगैरे काढण्याच्या, तो कधी भानगडीतच पडला नाही. शिक्षणातील यशाच्या सहाय्याने माणसाची बुद्धिमत्ता मोजली जावी, हे त्याला न पटणारे होते. त्यामुळे शैक्षणिक पुस्तके वाचणे सोडून तो त्याव्यतिरिक्त ज्ञान देणारी इतर पुस्तके वाचण्यात आपला बराचसा वेळ घालवत असे. लहानपणी त्याला चित्रकला, हस्तकला, शिल्पकला आणि नृत्याची आवड होती. पण शालेय शिक्षण संपताच त्याच्या ह्या कलेच्या आवडी मागे पडू लागल्या. त्यानंतर मित्रांबरोबर फिरणे, मौजमजा करणे, चित्रपट बघणे, संगीत ऐकणे, पुस्तके वाचणे आणि ध्यानधारणा करणे या गोष्टींमध्ये त्याचा बराचसा वेळ जाऊ लागला. वसंतला प्रकाशच्या अशा वागण्याची चिंता वाटत असे. त्याची मोठी मुलगी रिया ही लहानपणापासूनच मतिमंद असल्याने तिच्याकडून तो काहीच अपेक्षा ठेवू शकत नव्हता. पण निदान प्रकाशने तरी जीवनाकडे गांभीर्याने पाहावे. उच्च शिक्षण घेऊन, आपले चांगले भविष्य निर्माण करावे, असे त्याला नेहमीच वाटत असे. प्रकाशच्या अशा मुक्तपणे वागण्यामुळे, त्याला आपल्या भवितव्याची काहीच पर्वा नाही, असे वसंतला वाटत असे. त्यामुळे त्याच्यात आणि वसंतामध्ये सतत लहान-सहन वाद होत असत.

कॉलेजमध्ये असताना, प्रकाश नेहमीच त्याच्या मित्रांबरोबर वेळ घालवत असे. एरवी फारशी कोणाचीही पर्वा न करता, आपल्याच विश्वात सदैव विचारमग्न असणारा प्रकाश त्याच्या मित्रांच्या सानिध्यात मात्र दिलखुलासपणे वागे. त्याची विनोदी वृत्ती, त्याचा हजरजवाबीपणा आणि त्याचे सर्वांपेक्षा वेगळे असे व्यक्तिमत्व या सर्व गोष्टींमुळे तो ज्यावेळी त्या मुलांमध्ये नसे, त्यावेळी त्याची कमतरता त्यांना नेहमीच जाणवत असे. पण ह्या सर्व गोष्टी करत असताना, त्याच्या वयातील इतर मुलामुलींप्रमाणे त्याचे प्रेमप्रकरण अद्याप झाले नव्हते. आयुष्यातील इतर कोणत्याही गोष्टींमध्ये मागे न राहणारा आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर प्रत्येक गोष्टींवर भाष्य करणारा, प्रकाश प्रेमप्रकरणाच्या बाबतीत, अनुभवाच्या अभावाने  अज्ञानीच ठरला होता. त्याच्या मते ह्या जगात प्रेम वगैरे असे काहीच नसते, जे काही असते, त्यात प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ दडलेला असतो. लहानपणापासून त्याला आपल्या भावना योग्य प्रकारे नियंत्रित करता येत असल्याने, तो सहजासहजी भावनांबरोबर वाहणारा नव्हता. बाह्यजगात इतरांसमोर अविचारी प्रकारचे वर्तन करणारा, प्रकाश त्याच्या जीवनाच्या बाबतीत फारच गंभीर होता. कुठल्या वयात, कोणत्या वेळी, काय करायचे? हे त्याने आधीच आपल्या मनात ठरवलेले असायचे, जणू प्रत्येक गोष्टींचा आद्यक्रम त्याच्या मनात ठरलेला असायचा. त्यामुळे भावनांच्या ओघात वाहून न जाता, तो त्याच्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींनाच  आद्याक्रम देत असे. त्याच्या आयुष्याच्या बाबतची त्याची गणिते सर्वसमान्य मुलांपेक्षा फारच वेगळी होती. 
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel