वसंत, मोहन आणि प्रकाश आता मोहनच्या बंगल्यावर एकत्र राहू लागले होते. राजकारण सोडल्यापासून मोहन पुन्हा वसंतबरोबर आपल्या व्यापारात लक्ष देऊ लागला होता. त्या दोघांनी आपले लक्ष व्यापारात गुंतवल्याने  कामाच्या गडबडीत त्यांचा दिवस कधी संपून जायचा? हे त्यांचे त्यांनाच समजेनासे झाले होते. कित्येक वर्षांनी ते दोघे आता पुन्हा असे एकत्र काम करू लागले होते. त्यामुळे ते दोघेही आता पूर्वीपेक्षा जास्त उत्साही वाटत होते. आणि तसेही प्रकाश आणि मोहनशिवाय वसंतला आता कोणाचीच साथ उरली नव्हती. त्याच्या भावाची, संदीपचीही काही वर्षांपूर्वीच दुसऱ्या राज्यात बदली झाली होती. त्यामुळे तो सुद्धा आता वर्षातून केव्हातरी त्याला भेटायला येत असे.

मोहनची दोन मुले (दुसऱ्या पत्नीची) आता परदेशातील नागरिकत्व मिळवून तिथेच स्थायिक झाली होत. त्यामुळे ते आता, पुन्हा भारतात परतणे मोहनला शक्य वाटत नव्हते. तशीही ती फक्त नावापुरतीच त्याची मुले होती. प्रकाशची आई वारल्यावर त्याने ज्या स्त्रीशी विवाह केला तिची तिच्या पतीपासून झालेली ती मुले होती. त्यांची आई वारल्यापासून त्यांनी मोहनशी फारसे संबंध ठेवले नव्हते. तसेही त्यांची आई जिवंत असतानाच ते जेव्हा परदेशात शिक्षणासाठी गेले, त्यावेळेपासूनच त्यांचा आणि मोहनचा संबंध संपुष्टात आला होता. आणि आता तर त्यांची आई वारल्याने त्यांचे भारतात परतणे जवळजवळ अशक्य होते.

वसंतला आणि मोहनला मित्र म्हणून एकमेकांचा आधार तर होताच, पण मुलगा म्हणून त्या दोघांनाही प्रकाशचा आधार होता. प्रकाशच्या सानिध्यात ते दोघेही समाधानाने आपले जीवन कंठत होते. वसंत एक सामान्य मनुष्य  असल्याने मोहनने आणि प्रकाशने त्यांच्या जीवनाची रहस्ये त्याच्यापासून आजवर लपवून ठेवली होती आणि पुढेही लपवूनच ठेवणार होते.

प्रकाश आता पूर्वीप्रमाणे एखाद्या सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे नोकरी करू लागला होता. त्यानिमित्ताने तरी त्याची दिवसभर मोठी करमणूक होत असे. आताचा प्रकाश, पूर्वीचा सामान्य मनुष्य राहिला नव्हता. तो आता अंतर्बाह्य संपूर्ण बदलून गेला होता. तो वावरणाऱ्या, मनुष्यांचे जग जरी पूर्वीसारखेच असले, तरी त्याला आता त्या जगाचेही विविध अनुभव येऊ लागले होते. पूर्वी तो छोट्या छोट्या कारणांसाठीही, सामान्य मनुष्यासारखा दुःखी होत असे, तसेच शुल्लकशा कारणावरून क्रोधीत होते असे; पण आता मात्र त्याच्या बाबतीत तसे काहीच घडत नव्हते. त्याच्या शरीरातील सप्तचक्रांमधील शक्ती जागृत झाल्यापासून तो आता प्रत्येक परिस्थितीत आनंदात राहू लागला होता. त्यामुळे आता त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच एक प्रकारचे विलक्षण समाधान सदैव झळकत असे. कुठल्याही स्थितीत त्याची आता पूर्वीप्रमाणे चिडचिड होत नसे किंवा त्याला आता पटकन रागच येत नसे. जणू त्याला आता जीवनातील प्रत्येक परिस्थितीतुन योग्य मार्ग काढण्याची कला अवगत झाली होती. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे आता त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली होती. त्याचप्रमाणे त्याला आता भविष्याची सुद्धा चाहूल लागत असे. सप्तचक्रे जागृत झाल्यापासून त्याने त्याच्या प्रत्येक इंद्रियांवर विजय मिळवला होता. त्याने जर ठरवले, तर आता तो कित्येक दिवस बिना अन्नपाणी आणि निद्रेशिवाय ध्यानात बसू शकत होता. त्याशिवाय त्याने आता पंचतत्ववरही विजय मिळवला होता. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध कार्य करणे, अग्नितत्वावर विजय मिळविल्याने अग्नीचा त्याच्या शरीरावर कोणताही परिणाम न होणे, जलतत्वावर विजय मिळविल्याने पाण्यावरही चालणे, त्याचप्रमाणे आकाशतत्वावर विजय मिळवल्याने अवकाशात भ्रमण करणे यासारख्या कितीतरी सिद्धी त्याला अवगत झाल्या होत्या. हिमालयात असताना त्याला त्याच्या शक्तींच्या बळावर, पृथ्वीवर गुप्तपणे वास करणाऱ्या अदृश्य शक्तींना बघण्याचे, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रशिक्षण मिळाले होते.

प्रकाशला इतरांच्या मनातील भाव सहज ओळखता येत असल्याने, कित्येकदा त्याला माणसाची कीव येत असे. ही माणसे मनात एक आणि मुखात एक असे का वागतात? हा प्रश्न त्याला नेहमीच चिंतीत करून सोडी. माणसे मनातून वेगळी आणि बाह्य जगात वेगळी असतात. पण ती खरोखरच जशी असतात तशी मात्र कधीच नसतात. आपल्या विचारांना आपल्या मनात बंदिस्त करून, ही माणसे एकमेकांशी नेहमीच लपंडाव खेळत असतात. अनेकदा, असे खेळ खेळताना ते स्वतःच्या खऱ्या भावनाच हरवून बसतात. कदाचित माणसे एकमेकांच्या मनातील भाव सहजरीत्या जाणून घेण्यास असमर्थ असतात. म्हणूनच ते आपल्या चेहऱ्यावर विशिष्ट वृत्तीचे खोटे मुखवटे लावून जगत असतात. ह्या माणसांनी स्वतःचे ठराविक असे कायदे, नियम आणि विचार निर्माण केलेले असतात. त्यामुळे त्यांच्या चौकटीतच ते वागू लागतात. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या चौकटीच्या बाहेर दुसरे विश्व असू शकते याची त्यांना जाणीवच नसते. जगातील बहुतेक माणसे आत्मकेंद्री असतात. सर्वप्रथम त्यांना स्वतःची चिंता असते आणि मग इतरांची. त्यातील बहुतेकांचे आयुष्य एकमेकांना फसवण्यामध्येच निघून जाते. आणि या फसवाफसवीमध्ये त्यांचे खरे जीवन जगायचेच राहून जाते. त्यामुळे किती कृत्रिम प्रकारचे आयुष्य जगत असतात ही माणसे? देव, दैत्य, नाग, भूत-पिशाच यांच्यासारख्या जीवांच्या प्रवृत्ती नैसर्गिक असल्याने त्या सहज आणि स्पष्ट असतात. त्यामुळे त्या लपून राहू शकत नाही, पण मनुष्याचे मात्र तसे नसते. जन्माला आल्यापासून त्याच्या मृत्युपर्यंत कित्येक गोष्टी त्याने आपल्या मनात लपून ठेवलेल्या असतात. ज्या फक्त त्यालाच ठाऊक असतात. पण हे सर्व करून तो आपल्या जीवनात काय मिळवतो? आपली एक खोटी ओळख? खोटा आनंद? असे कितीतरी प्रश्न आणि विचार आता प्रकाशच्या मनात दररोज थैमान घालू लागले होते. कारण त्याला आता कोणाच्या मनात काय दडलेले आहे, कोणाची खरी ओळख काय आहे, हे त्यांना बघताचक्षणी त्याच्या लक्षात येत असे. त्यामुळे, कुठल्याही मनुष्याच्याच काय, प्राण्याच्या मनातील गोष्टी तो आता अगदी सहज जाणू शकत होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel