सामान्य नागाचे रुप घेऊन, कधी नागांच्या तर कधी मनुष्याच्या हिताच्या गोष्टी करणारा, तो रहस्यमयी नाग प्रकाश असल्याचे धनंजयला स्वतः  प्रकाशकडूनच समजले होते. ज्यावेळी तो बोलण्यासाठी मंचाजवळ आला त्याचवेळी त्याने धनंजयला संमोहित केले होते. ज्यामुळे धनंजय कुठलीही प्रतिक्रिया न देता शांतपणे त्याचे बोलणे ऐकू लागला. त्यानंतर आपले बोलणे संपेपर्यंत प्रकाशने आपल्या भाषणातून धनंजय सहित अनेक नागांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळवले. भाषण संपल्यावर प्रकाशने स्वतःच धनंजयला तो अनंताचा नातू असलेला, अर्धनागमनुष्य असल्याची कबूली दिली. पण खरेतर प्रकाशने आपल्या भाषणामार्फत धनंजयसहित तेथे उपस्थित असलेल्या नागांना आपल्या दिव्य शक्तींद्वारे वशीभूत करून टाकले होते. त्यामुळे सत्य समजल्यावरही धनंजयने प्रकाशचा विरोध केला नाही. याउलट त्यानेच प्रकाशला पृथ्वीवर न येण्याचे वचन दिले.

पृथ्वीवर परतल्यावर प्रकाशने नागलोकात घडलेली सर्व हकीकत मोहनला सांगितली. मनुष्य प्रजातीवरील फार मोठे संकट प्रकाशने आपल्या बुद्धीचातुर्याने रोखल्याने, मोहनला फारच आनंद झाला होता. काही वर्षापूर्वी प्रकाशला जे भयानक स्वप्न पडले होते, ते विधिलिखित असल्याचे नागतपस्वींनी त्यावेळी सांगितले होते. त्यामुळे प्रकाशने खरोखरच भाविष्यात घटीत होणाऱ्या घटना रोखल्या आहेत. यावर मोहनचा चटकन विश्वासच बसत नव्हता. त्यावेळी प्रकाशने ज्या भयानक स्वप्नाचे वर्णन केले होते, ते स्वप्न मोहनला आठवू लागले. आणि तो आपल्या मनातच त्याचा अर्थ लावू लागला. पृथ्वीलोक आणि नागलोक यांना जोडणाऱ्या मार्गातील नदी आटणे, म्हणजेच गुप्तमार्ग सर्वांसाठी खुला होऊन सर्वच नागांचा पृथ्वीवरील प्रवेश शक्य झाला असता. प्रकाशच्या स्वप्नातील ती भयानक प्रयोगशाळा कदाचित पृथ्वीवरच कुठेतरी उभारण्यात आली असती. आणि माणसांच्या शरीराचे विविध भाग वेगळे करुन, त्यांना नागांसाठी उपयोगी बनवण्याचे कामही गुलाम बनवलेल्या, मनुष्यावर सोपवण्यात आले असते. त्याचप्रमाणे प्रकाशला जी डोळे, कान, नाक,तोंड नसलेली विचित्र माणसे दिसली होती, ते यमदुतांचे प्रतिक असल्याचे त्यावेळी नागतपस्वींनी सांगितले होते. हे सुद्धा त्याला आठवत होते. त्याचबरोबर प्रकाशला स्वप्नात यमाचे वाहन असलेले, हजारोंच्या संख्येने धावणारे रेडे सुद्धा दिसले होते. त्यावरुन भविष्यात नागांच्या अत्याचाराला कंटाळून, मनुष्यातील हिंसक प्रवूत्तीची वाढ होऊन, मनुष्यानेच यमदूतांमध्ये प्रचंड सैन्यासह नागलोकावर आक्रमण केले असते. या तर्कालाही पुष्टी मिळाली.

सुदैवाने प्रकाशने हा सर्व घटना क्रम सुरु होण्याआधीच त्यामागचे मूळ कारण नष्ट केले होते. तरीही विधिलिखित असलेली घटना बदलता येते, यावर मोहनचा अजुनही विश्वास बसला नव्हता. म्हणून त्याने या सर्व गोष्टींमागचे रहस्य प्रकाशला विचारले असता प्रकाशने काही गोष्टी त्याच्यासमोर स्पष्ट केल्या.

"मी कधीच भविष्य बदलण्याचा प्रयत्न केला नाही. कारण ते अशक्य आहे. मी तर फक्त मानसिकता बदलली आहे. प्रत्येक क्रियेचा परिणाम प्रतिक्रियेच्या स्वरुपात बघायला मिळतो. त्यामुळे क्रिया बदलली की, प्रतिक्रिया आपोआपच बदलते. मी नागांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणले त्यामुळे त्यांच्याकडून आता, मानवाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. त्याचा अर्थ असा नाही की, मी भविष्य बदलले आहे, मी तर फक्त त्याचे स्वरुप बदलले आहे." प्रकाशचे बोलणे ऐकुन मोहनला आश्चर्य वाटले आणि भयसुद्धा. पण प्रकाशच्या बोलण्याचा रोख त्याच्या अद्याप लक्षात आला नव्हता. "म्हणजे, नेमके सत्य काय आहे?" मोहनने गांभिर्याने विचारले.

"पिंडी ते ब्रम्हांडी, या संस्कृत वचनानुसार पिंडात बदल केल्याने, ब्रम्हांडात आपोआपच बदल घडून येतात. त्यामुळे मी नागांच्या विचारात आपल्या वशीकरण शक्तीने परिवर्तन घडवून आणल्याने त्याचे परिणाम आपोआपच ब्रम्हांडातील शक्तींवर झाले. त्यामुळे मला जरी भविष्य बदलता आले नसले तरी त्याचे स्वरुप मात्र मला नक्कीच बदलता आले आहे. अर्थात मनुष्याचा काय....आणि नागांचा काय....सर्वनाश हा अटळच आहे. परंतू विचारप्रवृत्ती बदलल्याने त्याचे स्वरुप मात्र बदलणार आहे. शेवटी परीवर्तन हेच जीवनाचे रहस्य आहे..."
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel