प्रकाश हिमालयातून परतून आता जवळपास वीस वर्षे झाली होती. ह्या वीस वर्षांमध्ये प्रकाशचे आयुष्य पूर्वीपेक्षा फारच बदलले होते. प्रकाश आता जवळपास पंचेचाळीस वर्षाचा झाला होता. पण तो अजूनही वीस-पंचवीस वर्षांचाच वाटत होता. आता पृथ्वीवरील कालचक्राचा त्याच्या शरीरावर कोणताही परिणाम होत नव्हता. पण मोहन मात्र पूर्वीपेक्षा थोडा प्रौढ दिसू लागला होता. अर्थातच ते त्याचे खरे रूप नव्हते, तो नागांच्या वयोमानानुसार आजही खूप तरुण होता. पाच वर्षांपूर्वीच वसंतचा एका जीवघेण्या आजाराने मृत्यू झाला होता. प्रकाश आणि मोहनने त्याचा जीव वाचवण्यासाठी सामान्य मनुष्याप्रमाणे बरेच प्रयत्न केले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ते आपल्या दिव्य शक्तींनी त्याचा मृत्यू पुढे ढकलू शकले असते, पण मृत्यूला टाळता येणे मात्र तत्यांनाही शक्य नव्हते. त्याशिवाय असे करणेही निसर्गनियमांच्या विरुद्ध झाले असते, म्हणून त्यांनी तसे काहीही केले नाही.

प्रकाश आणि मोहनला वसंतचा मृत्यू तात्पुरता टाळता आला असता पण कालांतराने ती वेळ पुन्हा आली असती. त्यामुळे त्यांनी जर आपल्या दिव्य शक्तीचा वापर करून वसंतचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर त्याचे परिणाम वसंतच्या आत्म्याच्या पुढील गतीवर झाले असते. ज्याचा दोष प्रकाश आणि मोहनच्याही आत्म्याला लागला असता. शेवटी त्याची वेळ आली होती हेच खरे!

वसंतच्या जाण्यामुळे दोघांनाही फार दुःख झाले होते, पण त्यांनी ते दुःख धैर्याने पचवले होते. प्रकाशने आपली नोकरी सोडली होती. कारण फार काळ त्याला त्याच-त्याच माणसांच्या सहवासात राहणे शक्य नव्हते. अशाने त्याची खरी ओळख लपवून ठेवणे त्याला अवघड झाले असते. त्यामुळे आता प्रकाश आणि मोहन एकत्रपणे, त्यांचा व्यवसाय सांभाळू लागले. तसे बघायला गेलो तर, त्या इच्छाधारी नागांना असे सामान्य मनुष्याप्रमाणे जीवन जगण्याची गरज नव्हती आणि तसेही मोहनने आजवर बराच पैसा कमवून ठेवला होता. ते फक्त एक विरंगुळा म्हणून हे सर्व करत होते. त्याचबरोबर व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवेची आवड असणाऱ्या प्रकाश आणि मोहनने कित्येक गरजवंतांना मदत करून, आजवर फार मोठे समाजकार्य केले होते, त्यांनी व्यवसाय करणे हा त्यांचा समाजसेवा करण्यासाठीचा एक बहाणाच होता.

प्रकाशची सप्तचक्रे जागृत झाल्यापासून, त्याने आपल्या भूक-तहान, झोप यासारख्या गरजांवर नियंत्रण मिळवले होते. त्यामुळे सकाळी मोहनबरोबर सामान्य माणसासारखे काम करणे आणि रात्री ध्यानधारणा करणे असा त्याचा हल्लीचा दिनक्रम चालत असे. पण मोहन मात्र सामान्य माणसासारखा निद्रेच्या अधीन होत असे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel