“परंतु इथं कसा दिगंबररायांचा मुलगा पडला?”

“त्या दिवशी गारांचा पाऊ, होता. गारांच्या मारानं ठेचला गेला असेल. काळोखात हा खळगा दिसला नसेल. पडला असेल खळग्यात वरून गारांचा मारा आणि खाली दगडावर आपटला असेल. हा खळगा त्याच रात्री कोसळला. दगड-माती अंगावर पडून ठकसेन पुरला गेला. गावातील सारा गाळही पाण्याबरोबर आला असेल व तो आणखी अंगावर साचला असेल. सृष्टीनं ठकसेनाला मूठमाती दिली.”

“आणि हा चाबूक?”

“त्या दिवशी तो घोडी विकायला गेला होता. घोडी तिकडे मरून पडली. मग पैशासाठी इकडे येऊन त्याने चोरी केली असेल. त्या वेळेस चाबूक हातात असेल. परंतु देवाच्या मनात निराळंच होतं.”

“एवढ्या मोठ्या घराण्यात असा कसा निपजला?”

“जगात असे अनेक प्रकार होतात.”

“मनूबाबाचे पैसे मिळाले. चांगलं झालं. म्हातारपणी आता काम करण्याची दगदग नको. मनूबाबांना त्यांच्या प्रामाणिकपणाचं, प्रेमाचं, उदारपणाचं देवानं बक्षीस दिलं.” लोक म्हणाले.

इतक्यात संपतराय तेथे आले. सारे लोक बाजूला झाले. त्यांनी तो मृत आकार पाहिला! इतर सर्व वस्तू पाहिल्या. ते गंभीरपणे उभे राहिले.

“माझाच भाऊ, देव त्याला क्षमा करो. मनूबाबा, तुम्हीही क्षमा करा.” संपतराय दु:खाने म्हणाले.

संपतरायांनी त्या अवशेषांस अग्नी दिला. सारे लोक परतले. संपतरायही घरी आले. गावात चाललेली गडबड इंदुमतीच्या कानी आली. परंतु सारा वृत्तान्त नीट तिला कळला नव्हता. संपतराय आले व आपल्या खोलीत खिन्नपणे बसून राहिले.


“काय आहे गडबड, काय आहे हकीगत? तुमचा चेहरा असा का काळवंडला? सांगा ना सारं.” इंदुमतीने आस्थेने विचारले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel