केवळ वाड्.मयवर्णन हा राजवाडे यांच्या लिहिण्याचा हेतु नाहीं. लेखणीचा विलास दाखविणें हें त्यांचे जीवित ध्येय नव्हतें. त्यांनी सर्व लिहिलें तें मराठीत लिहिलें. मराठीचा त्यांस फार अभिमान होता. इंग्रजीत एकही ओळ लिहिणार नाही ही त्यांची प्रतिज्ञा होती. मराठी भाषेसंबंधी ते ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेंत लिहितात 'शिष्ट मराठीत सात आठशें वर्षापासूनची ग्रंथरचना असून, ती महाराष्ट्रांतील सर्व प्रांतांतल्या व बडोदें, इंदूर, ग्वाल्हेर, बुंदेलखंड, तंजावर, गुत्ती, बल्लारी वगैरे संस्थानांतल्या मराठी लोकांना आदरणीय झालेली आहे. ज्या भाषेंत मुकुंदराज, ज्ञानेश्वर, सूर्य ज्योतिषि, एकनाथ, तुकाराम, रामदास, चिपळूणकर वगैरे प्रासादिक ग्रंथकारांनीं ग्रंथरचना केली ती शिष्ट भाषा महाराष्ट्रांतील सर्व प्रांतातील व जातीतील लोकांस सारखीच मान्य व्हावी यांत आश्चर्य नाही. प्रांतिक बोलणे प्रांतापुरते व जातीक बोलणें जातीपुरतें. परंतु ग्रंथिक बोलणें व लिहिणें सर्व महाराष्ट्रांकरितां आहे. प्रांतिक पोटभाषांच्या लहानसान लकवा आणि जातिक भाषणांतले बालिश अपभ्रंश ग्रंथिक राजभाषेच्या शिष्ट दरबारांत लुप्त होतात व एकच एक निर्भेळ अशी मराठयांची मायभाषा देशांतील सर्व लोकांच्या अभिमानाच्या, कौतुकाच्या व सहजप्रेमाचा विषय होते; मराठयांना स्वभाषेचा इतका अभिमान जो वाटतो तो फुकाचा नाही. मराठी भाषेंतल्या शब्द प्राचुर्याची बरोबरी पृथ्वीवरील कोणत्याही भाषेला करतां यावयाची नाही. तसेच कोणताही गूढ किंवा सूक्ष्म अर्थ नानात-हांनी यथेष्ट व्यक्त करण्याची तिची शक्ती अप्रतिम आहे. शिवाय अनेक थोर प्रासादिक ग्रंथकारांनी तिला आपल्या उदात्त, गंभीर, ललित व रम्य विचारांचें निवेदन केलें असल्यामुळें तिच्यावरील महाराष्ट्रीयांची भक्ति शुक्लेंदुवत् उत्तरोत्तर वर्धमान स्थितीत आहे.'

मराठीचा हा राजवाडे यांचा अभिमान दासोपंतांनी संस्कृतपेक्षां मराठी कशी श्रेष्ठ आहे हें दाखविलें त्याप्रमाणेंच जाज्वल्य आहे. मराठी संबंधी अशी अलौकिक भक्ति असली तरी मराठीतील नामांकित ग्रंथकार या नात्यानें त्यांस प्रसिध्द व्हावयाचें नव्हतें. राजवाडे हे वाड्.मयसेवक, महान् सारस्वत सेवक असले तरी प्रथमदर्शनी ते सिध्दांत संस्थापक आहेत. समर्थांचे काव्य महत्वाचें नसून त्या काव्यांतील तत्वें महत्वाची आहेत. He is first a philosopher and then a poet. हे जसें रामदासासंबंधी म्हणतां येईल, त्याप्रमाणेंच राजवाडे यांचे आहे. मुक्तेश्वरादि कवि, किंवा चिपळूणकर हे वाड्.मयाचे सेवक आहेत. वाणीस सजवावें कसें, उपमा दृष्टान्तादि अलंकार ठिकठिकाणी योजून सर्वांस कसें मोहून टाकावें, हें ते जाणतात. मुक्तेश्वरांची वाग्देवी अनेकलंकारांनी नटलेली आहे. चिपळूणकर आपल्या वाग्गंगेत आम्हांस स्वैर विहार करावयास लावतात; राजवाडे यांचे तसें नाही. येथें गंगाकाठी विहार करणारे निरनिराळे पक्षी, चक्रवाक्, मयूर, कोकिळादिकांचे कलरव, भृगांचे गुंजगान, पद्मांचे फुलणें, सुगंधाची लयलूट हें कांही आढळणार नाही. येथें विलास, लालित्य नाही, येथे काय आहे ? राजवाडे यांची भाषा सडेतोडे व जोरदार आहे. मृदुत्व तिला खपत नाही. येथें कौमुदीचें सुकुमारत्व, संभगत्व, शीतलत्व हें कांहीएक नसून, सूर्यप्रभेची प्रखरता व प्रज्वलता आहे. जोरकस रीतीनें सिध्दांत कसा मांडावा हेंच ते पहात असत. भाषेकडे त्यांचें लक्ष असे तथापि अर्थाकडे, सिध्दांताकडे जास्त असे. सिध्दांतस्वरुपी त्यांचे लिहिणे आहे. येथे गुळमुळितपणा नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel