भांड्यात धार वाजली. भरभर दूध निघू लागले. भांड्यात दुधाच्या धारा भरत होत्या आणि वामनभटजींच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुटत होत्या. भांडे भरले!

‘दुसरे भांडे आणा पिलंभटजी, दुसरे आणा.’ मुले ओरडली.

दुसरे भांडे आले. तेही भरले आणि ‘पुरे हो सावळ्ये, पोट भरले,’ असे म्हणून वामनभटजी उठले.

‘खरी कामधेनू आहे.’ आयाबाया म्हणाल्या.

‘गाईगुरेही प्रेम ओळखतात.’ लोक म्हणाले.

‘पिलंभटजी, फुकट तू!’ कोणी उपहासाने म्हणाले.

वामनभटजींनी सावळीचे दावे सोडले.

‘चल सावळ्ये’ ते म्हणाले व निघाले. सावळी पाठोपाठ आली. आपल्या पहिल्या घरी ती आली. वामनभटजींनी तिला चारा घातला, पाणी पाजले. वेदमंत्र म्हणत किती तरी वेळ तिच्या अंगावरून ते हात फिरवीत उभे होते, मानेखालची पोळी खाजवीत होते.

वामनभटजी व त्यांची गाय म्हणजे पालगड गावाची एक कौतुकाची वस्तू होऊन राहिली आहे!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel