‘सावकारांनो, उद्या मी उत्तर देईन. तुमचे पैसे तरू देईन नाही तर माझे प्राण तरी देईन.’ असे म्हणून जयंता आपल्या खोलीत गेला. तो आपल्या अंथरूणावर रडत होता. काय करावे ते त्याला सुचेना. रात्र झाली तारी तो उठला नाही. जेवायला गेला नाही. त्याची आई त्याला हाका मारायला आली.

‘जयंता, चल ना रे जेवायला. दोन घास खा. ऊठ.’

‘नको जेवण. नको काही. बाबांचे पैसे देईन तेव्हा येथे खाईन. उगीच त्यांच्या पैशांतून कशाला खाऊ?’

‘हे रे काय? ऊठ. तू नाही आलास तर मीही उपाशी राहीन.’

जयंता उठला. खाली गेला. दोन घास खाऊन पुन्हा खोलीत अंथरुणावर पडला. त्याला झोप लागली आणि झोपेत एक स्वप्न पडले. कसले स्वप्न? सुंदर असे देवाचे स्वप्न. स्वप्नात एक तेजस्वी पुरुष त्याच्याकडे आला व त्याला म्हणाला, ‘जयंता, धीर नको सोडू. जो गरिबांना जवळ घेतो, त्याला देव जवळ घेतो, तू देवांचा लाडका झाला आहेस. सारी त्रिभुवनातील संपत्ती तो तुला देईल. उद्या सकाळी उठल्यावर तुझ्या वडिलांना व त्या सावकारांना तू सांग, ‘चला माझ्याबरोबर, देतो पैसे.’ ते निघतील तुझ्याबरोबर. समुद्राकाठी जा आणि समुद्रात शिरा. भिऊ नका. तुम्हाला खांद्याइतके पाणी होईल. पुढे पुढे या आणि मग एक मोठे तळे लागेल. मोतीपोवळेयांचे तळे. हिरेमाणकांचे तळे. त्यांना सांग, ‘न्या वाटेल तितकी संपत्ती.’ समजलास ना रडू नकोस.’ असे संबोधून व जयंताच्या लवलेल्या मस्तकावर हात ठेवून तो दिव्य पुरुष दिसेनासा झाला. स्वप्न भंगले व जयंता जागा झाला. केव्हा एकदा उजाडते याची तो वाट पाहात होता.

पहाट झाली. दूरच्या मंदिरातील चौघडा वाजू लागला. पाखरांचीही किलबिल सुरू झाली. जयंता उठला. त्याने शौचमुखमार्जन केले. स्नान केले. देवाचे चिंतन केले. आईच्या पाया पडला आणि पित्याकडे गेला.

‘बाबा, चला माझ्याबरोबर. त्रिभुवनातील संपत्ती तुमच्यासमोर ओततो. चला. ते सावकारही बरोबर घ्या. चला.’ जयंता म्हणाला.

‘चावट आहेस.’ पिता म्हणाला.

‘चावटपणा नाही. खरेच सांगतो. तुमचीच शपथ.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel