‘जयंता, परमेश्वराची तुझ्यावर कृपा आहे. नाही तर समुद्रातून आपण कसे आलो असतो? ही सागरसंपत्ती समोर कशी दिसली असती? तुझी धन्य आहे जयंता. तू गरिबांची पूजा केलीस. दरिद्रीनारायणाची सेवा केलास. परमेश्वराला ते पावले. तू आमचे डोळे उघडलेस. चल, माघारी जाऊ. आजपासून संपत्तीचा उपयोग कसा करावा ते आम्ही शिकलो. आम्ही जनतेच्या संपत्तीचे विश्वस्त आहोत. आमच्याजवळची संपत्ती आमची नाही. ती श्रमणा-यांची आहे. ती दरिद्रीनारायणांची आहे. ती त्यांना आम्ही दिली पाहिजे. त्यांना सुखी केले पाहिजे. जयंता, तुझ्यामुळे आम्ही धन्य झालो. आम्ही माणसे झालो आज. जणू माकडे होतो. आज आम्हाला माणुसकी आली. चल बाळ.’ असे ते सावकार म्हणाले. पिता तर आनंदाश्रू ढाळीत होता. ते सारे निघाले. ते सावकार आपल्या तीर्थक्षेत्राला गेले. जयंता व त्याचे वडील आपल्या घरी आले. ती गोष्ट सर्वत्र पसरली. जयंताची किर्ती सर्वत्र गेली.

पुढे जयंता आणखी मोठा झाल्यावर सर्व संपत्तीचा मालक झाला. त्याचे वडील वारले. पुढे आईही वारली. जयंताने लग्न केले नाही. तो जगाचा संसार करीत होता. स्वार्थाऐवजीपरमार्थ साधीत होता. पित्याची सारी संपत्ती त्याने सेवेत खर्च केली. सर्वांची ददात त्याने दूर केली. ‘उदारांचा राणा’ असे लोक त्याला म्हणत. कोणी त्याला दीनबंधू म्हणत, प्रेमसिंधू म्हणत.

जयंता पुढे मरण पावला. सारी दुनिया हळहळली, पशुपक्षी हळहळले. दगडधोंडे रडले. जयंताच्या गोष्टी त्या प्रांतात अद्याप ऐकू येतात. त्याचे पोवाडे म्हटलेले ऐकण्यात येतात.

कितीतरी वर्षे झाली; परंतु जयंताची कीर्ती कायम आहे. त्याचे उदाहरण जगाला स्फूर्ती देत आहे, मार्ग दाखवीत आहे. जीवनाचे सोने कसे करावे याची जादू जयंताचे आदर्श जीवन शिकवीत आहे. जयंता उदारांचा राणा झाला. आपणही थोडेफार उदार होऊ या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel