तो ते दगड बोलू लागले. ते कठीण कठोर दिसणारे दगड अमृताप्रमाणे बोलू लागले. त्या दगडांना जणू शेकडो जिभा फुटल्या.

‘अरे अरे जयंता, आमच्यावर रागावू नको, रुसू नको. जरा तुझ्या पायाला लागले, म्हणून शिव्याशाप नको देऊ. अरे तुझा केवढा चिरेबंदी चौसोपी वाडा आहे. आमचेच भाऊबंद त्या घरात चिणून ठार केले आहेत. तुझ्या वाड्याच्या पायात आमचे लाखो भाऊबंद पुरलेले आहेत. का आम्हाला नावे ठेवतोस? दगड तुम्हा मानवाच्या पदोपदी कामी येतात. दगडधोंडे रस्त्यावर तुम्ही पसरता आणि रस्ते तयार करता. दगडधोंड्यांनी तुम्ही पूल बांधता. आमची हाडे तुम्ही भरडता. खडी करता. रस्त्यावर पसरता. तुमचे गडगे, तुमचे बांध बांधताना तुम्हाला दगड लागतात. तुमची घरेदारे, तुमच्या विहिरी, तळी, पुष्करिणी बांधताना दगड हवेत. दगडांशिवाय तुमचे चालणार नाही. का नावे ठेवतोस? तुम्ही माणसे बुडता, परंतु दगडही रामनामाने तरतो. अरे, पाण्यावर गती देऊन आम्हास फेकता. दगड उड्या मारीत जातात. तुम्ही भाकरीचा खेळ नाही का खेळत?

आणि आमची तपश्चर्या बघ. रात्रंदिवस आम्ही दिगंबर राहून तपश्चर्या करीत आहोत. ऊन असो, थंडी असो, वारा असो. आम्ही सारे सहन करीत आहोत. तुम्हाला आम्हाला लवकर फोडता यावे म्हणून उन्हात तापून आम्ही आमच्या अंगाला भेगा पाडून घेतो. तुम्ही मग आमचे मोगरीने तुकडे करता. किती तुला सांगू?’

दगडाची वाणी ऐकून जयंता लाजला. त्याने त्या पाषाणांना प्रणाम केला आणि मग तो म्हणाला, ‘दगडांनो, तुमचे म्हणणे खरे आहे. तुमचे अपार उपकार आहेत. तुम्ही असे उघडेबोडके, उन्हातान्हात, पावसापाण्यात, थंडीवा-यात जगासाठी तप करीत असता. तुम्ही थोर ऋषी मुनी आहांत. मी तुम्हाला काय देऊ? माझ्याजवळ काय आहे? परंतु हे कापड आहे. तुमच्या अंगाखांद्यावर हे कापड मी घालतो. जणू तुम्ही देवाच्या मूर्तीच आहांत. हा सुंदर सुंदर माल मी तुम्हाला देतो.’

असे म्हणून जयंताने ते दगड शोभवले. कोणाला धोतर नेसवले, कोणाला लुगडे. कोणाच्या अंगावर उपरणे दिले, कोणाला घोंगडी दिली. एकाच्या डोक्याला पागोटे बांधले. मजाच मजा; परंतु ते एका गाठोड्यातील कापड कितीसे पुरे पडणार?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel