जयंता हा लक्षाधीश सावकाराचा पुत्र होता. त्याच्या दिलाची सर्वत्र प्रसिद्धी होती. जयंताने तेथील सावकारांकडू कर्ज काढले आणि एक मोठा रसोडा त्याने उघडला. कोणीही यावे व जेवून जावे अशी पाटी रसोड्यावर लावण्यात आली. मग काय विचारता? हजारो लोकांच्या झुंडी त्या रसोड्याकडे चालल्या. पंगतीवर पंगती उठू लागल्या. जयंताला मुलाबाळांचे, गरीब आयाबायांचे आशीर्वाद मिळत होते. ‘अन्नदाता सुखी भव,’ असे हजारो लोक मनापासून म्हणत होते. त्या सुखी लोकांच्या तोंडावरचे समाधान पाहून जयंताला मोक्ष मिळाला असे वाटे. यात्रा संपली लोक परतले.

जयंता आपल्या घरी आला.

‘काय जयंता? सारा माल खपला वाटते?’

‘हो.’

‘पैसे?’

‘उधारीने सारा माल विकला.’

‘अरे, यात्रेत आलेले लोक त्यांचा का ठावठिकाणा असणार? दाही दिशांतून आलेले लोक. ते कोठे भेटणार? त्यांची ओळख कशी राहाणार? कसा तू मूर्ख?’

‘बाबा, तुमचे पैसे मी परत जेईन. जेव्हा लागतील तेव्हा सांगा.’

बाप बोलला नाही. सोन्याचे दगड आणून देणारा जयंता काय चमत्कार करील कोणी सांगावे? परंतु थोड्या दिवसांनी त्या तीर्थक्षेत्रीच्या सावकारांकडून पत्रे आली.

‘जयंता सावकारांकडून कशाला घेतलेस पैसे?’

‘लोकांना जेवू घालण्यासाठी. लोक उपाशी मरत होते. मला पाहावेना. जवळ पैसे नव्हते.’

‘अरे, तू मांडले आहेस तरी काय? या सावकारांची एक कवडीही मी देणार नाही.’

जयंतच्या वडिलांनी तसे त्या सावकारांस लिहिले. ते सावकार रागावले. ते जयंताच्या वडिलांकडे आले

‘अहो, तुमच्या पतीवर आम्ही तुमच्या मुलाला पैसे दिले. तुम्ही नाकाराल हे आम्हाला नव्हते माहीत.’ ते सावकार म्हणाले.

‘परंतु दुकानातील माल सर्वांना उधार वाटणारा पोरगा काय किंमतीचा दे तुम्हाला समजले पाहिजे होते. मी या कर्जाला जबाबदार नाही. तो जयंता व तुम्ही काय वाटेल ते करा.’

‘काय रे जयंता, पैसे दे आमचे.’ सावकार म्हणाले.

‘आणि-जयंता, उधारीचे पैसेही घेऊन ये. जा दाही दिशांत. शोध कोणाला कापड दिलेस ते. जा. हो चालता.’ बाप म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel