बाळासाहेबांच्या मनात काही तरी चिलबिचल झाली होती खास. त्या ओव्या, तो आवाज ! हृदयाची एक जुनी तार छेडली गेली ! विस्मृत गीत पुनः जिवंत झाले ! बाळासाहेब मुद्दाम खाली गेले, पाळण्याजवळ गेले. राधाबाई दूर उभ्या राहिल्या. गाय वासरापासून दूर उभी राहिली ! बाईसाहेबांनी राधाबाईंकडे नीट पाहिले व त्यांनी विचारले, “तुमचे दुसरे कोणी नाही का ? तुम्ही एकट्याच आहात ? तुम्ही पगार का घेतला नाही !” राधाबाई म्हणाल्या, “पगार घेऊन मला कोणाला पाठवायचा ? मला कोणी नाही. येथे जेवायला तर मिळतेच. काही लागले तर माझे घरच आहे. बाईसाहेब मला कशालाही नाही म्हणत नाहीत. लुगड्याचा किती आग्रह करतात ! परंतु मीच म्हटले, की अजून दोन महिने यावर जातील. पगारीसाठी मी थोडेच करते ? या मुलांचे करताना मला किती आनंद होतो ! हा आनंद मिळतो, आणखी पगार कशाला ? तो पहा उठला दिनेश. थांबा, त्याला काढूनच घेते.” असे म्हणून राधाबाई काढून घेतले.

बाईसाहेब जरा गंभार होऊन दिवाणखान्यात गेले. ते जरा अस्वस्थ दिसू लागले. दिवसेंदिवस ते अधिकच सचिंत व खिन्न दिसू लागले. ते फार हसत ना, बोलत ना. मालतीच्या लक्षात ती गोष्ट आली. शेवटी तिने एके दिवशी विचारले, “तुम्ही  अलीकडे खिन्न का दिसता ? मला सांगा, माझ्यापासून तुम्ही काहीतरी लपवीत आहा. तुम्हाला काही तरी दुःख होत आहे खास.”
बाळासाहेब म्हणाले, “अगं, देशात हा गांधीची चळवळ सुरू होणार, तीत लहान मुले-मुली भाग घेणार, त्यांना शिक्षा देण्याचे आमच्या नशिबी येणार, यामुळे मी संचित होतो.”

मालती गंभीरपणे व प्रेमळपणे म्हणाली, “मग द्या सोडून नोकरी एखाद्या खाजगी संस्थेत राहा, प्रोफेसर व्हा. नाही तर मी करीन कन्याशाळेत किंवा कोठे तरी नोकरी. मनाला फार त्रास होत असेल, तर काय करायची नोकरी ? सारे सुखासाठीच ना करायचे ?”
बाळासाहेब म्हणाले, “नोकरी सोडल्यावर हे भाग्य कसे राहणार ? गाडीघोडे, मोटार, गडीमाणसे, राधाबाईंसारख्या मातेप्रमाणे चाकरी करणा-या बाया- हे सारे कोठे मिळणार ? मग तुझे कसे होईल? तुला स्वतः माझी धोतरे धुवावी लागतील, एक वेळ समज, माझी नाही धुवावी लागली, तरी स्वतःची लुगडी तुला धुवावी लागतील, नरेश-दिनेश यांचे कपडे तुला धुवावे लागतील, स्वयंपाक करावा लागेल, सारे काम करावे लागेल. तुझ्याने हे कसे होईल ? दोन दिवसांत तू कोमेजून जाशील !”

“काही नाही कोमेजून जात. सीतादेवींपेक्षा का मी कोमल न् सुकुमार आहे ?” मालतीने विचारले.

“अगं, सीतेच्या गोष्टी कशाला ? तू सीता नाहीस आणि मी राम नाही. आपण साधी संसारी माणसे!” बाळासाहेब म्हणाले.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel