आपल्या वर्गातील मुले घेऊन गुरूजी त्या दिवशी वनभोजनासाठी गेले होते. मुलांना खूप आनंद होत होता. आज मोकळेपणा होता. हसणे खेळणे चालले होते. प्रत्येकाने बरोबर शिदोरी आणली होती. काव्यशास्त्रविनोद करीत गुरूजी व विद्यार्थी जात होते.
पावसाळा संपत आला होता. हस्ताचे नक्षत्र सुरू होते. 'हस्ताचे पाणी। मुबलक पीक आणी।' अशी म्हण आहे. हस्ताचा पाऊसही पडला होता. शेतेभाते सुंदर दिसत होती. शेतकरी आनंदला होता.

'सार्‍या जगात चांगलं पाणी कोणतं? पवित्र पाणी कोणतं? मोलवान पाणी कोणतं?' गुरूजींनी प्रश्र केला.
'गंगेचं पाणी सर्वांत पवित्र.' सदू म्हणाला.
'पावसाचं पाणी सर्वांत महत्त्वाचं.? विनू म्हणाला.

'सिंहगडचं देवटाक्यातील पाणी फार चांगलं' शंकर म्हणाला.

'पश्चात्तापामुळं डोळयांतून पाणी येते ते सर्वांत थोर.' विचार करणारा लक्ष्मण म्हणाला.

'प्रेमासाठी मनुष्य रडतो, ते पाणी खरं.' प्रेमळ नामदेव म्हणाला.

मुले अशी उत्तरे देत होती; परंतु त्या उत्तारांनी गुरूजींचे समाधान झाले नाही. 'कुणाचं उत्तर बरोबर?' उत्तर न देणार्‍या मधूने विचारले. 'माझ्या मनातील उत्तर कुणीच दिलं नाही.' गुरूजी म्हणाले.

'म्हणूनच मी उत्तर दिलं नाही. उगीच कशाला सांगा.' हसत मधू म्हणाला. 'तुमच्या मनात कोणतं आहे उत्तर?' मुलांनी विचारले.
'मी एक गोष्ट सांगतो. त्यावरून कळेल.' गुरूजी म्हणाले. मुलांना गोष्टीहून अधिक प्रिय काय आहे? गोष्ट सांगतो म्हणातच सारे विद्यार्थी जवळ आले. मधू मागे रेंगाळत होता. तो गर्दी करून गुरूजींच्या अगदी जवळ येऊन चालू लागला. गोष्टीला आरंभ झाला--

राम व लक्ष्मण सीतेचा शोध करीत वनातून जात होते. वाटेत त्यांना भिल्लीण भेटली, शबरी भेटली. रामासाठी ती वाट पाहात होती. रामासाठी तिने गोड फळे आणून ठेवली होती. शबरीने रामाची पूजा केली. त्यांच्यापुढे ती फळे ठेवली.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel