राजाने रोजनिशी वाचली. त्याने त्या मुलीकडे पाहिले.

‘तुझे नाव काय?’

‘कळी’

‘तुझा बाप काय करतो?’

‘ते तुरूंगाचे अधिकारी आहेत.’

‘कोणत्या तुरूंगावर?’’

‘समुद्रकाठच्या.’

‘ज्यांची मुलगी आजारी होती व ज्यांनी समुद्रकाठी बदली मागितली होती, त्यांचीच का तू मुलगी?’

‘होय महाराज.’

‘त्या तुरुंगात कोण आहे?’

‘ते एक राजकीय कैदी आहेत. त्यांना फुलांचे वेड. ते शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या सांगण्यावरुन हा प्रयोग मी केला. ते सारे श्रेय त्यांचे आहे. मी निमित्तामात्र.’

‘राजधानीच्या तुरुंगातून तो कैदी अन्यत्र पाठवताच तू आजारी पडलीस. होय ना?’’

‘होय’

‘काय होत होते तुला, बेटा?’

‘तसे काही नाही. मी काय सांगू महाराज?’

‘प्रेमाच्या पिशाच्चाची बाधा तर नव्हती?’

‘आपण सर्वज्ञ आहात.’

‘बरे, ज्या. उद्या प्रदर्शन-मंडपात माझ्या शेजारी बैस आणि हे कपडे उद्या काढ. नवीन सुंदर पोषाख तुला देण्यात येईल तो घाल आणि दोन सुंदर दागिने देईन ते अंगावर घाल. समजलीस ना? जा बेटा. काळजी नको करू.’

कळीची कळी फुलली. ती निघून गेली. दुसरा दिवस उजाडला. हजारो लोक येत होते. खेडयापाडयांतून, शहरा & शहरांतून स्त्री & पुरूषांच्या झुंडी येत होत्या. तिसरे प्रहरी बक्षीस समारंभ होणार होता. मंडप कधीच भरुन गेला. सुंदर व्यासपीठ केलेले होते. तेथे छताखाली ती कुंडी ठेवण्यात आली होती. अनुपम सौदंर्याने युक्त असे ते फूल तेथे डोलत होते. राजासाठी चांदी-सोन्याचे सिंहासन होते. त्याच्या दोन बाजूंस अनेक सुंदर आसने मांडण्यात आली होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel