श्रमणांचा उत्कर्ष

या देवतांच्या मागे पुराणें आणि पुजारी नसल्यामुळे त्यांना आजकाचलें धार्मिक स्वरूप आलें नव्हतें.  सर्व दर्जाचे लोक आपल्यावरची आपत्ति टाळण्यासाठी, किंवा आपण केलेल्या नवसाला देवता पावली म्हणून, तिला बलिदान देत.  पण हें कृत्य धार्मिक समजत नसत.  ब्राह्मणांच्या यज्ञयागांना वेदांची आणि वैदिक वाङ्‌मयाची पुष्टि मिळाल्यामुळे त्यांची गणना धार्मिक कृत्यांत होत होती.  पण हे यज्ञयाग फारच खर्चाचे असल्यामुळे, सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरचे होते.  त्यांत शेंकडो गाईबैल मारण्यांत येत.  शेतीला उपयोगी पडणारीं हीं जनावरें राजे आणि इतर प्रतिष्ठित लोकांना जबरदस्तीने हिरावून घ्यावीं लागल्यामुळे सामान्य जनतेला हे यज्ञयाग अत्यंत अप्रिय होत चालले होते.  याच्या उलट श्रमणांना सामान्य लोक आदरातिथ्याने वागवीत, चातुर्मासांत झोपड्या वगेरे बांधून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करीत आणि त्यांचा उपदेश ऐकण्याला तत्पर असत.  म्हणजे श्रमणसंघांची एकसारखी भरभराट होत चालली होती.

उपनिषत्कालीन ॠषि

सांप्रत अशी एक समजूत प्रचलित आहे की, वेदांपासून उपनिषदें आणि त्यांच्यापासून बौद्ध, जैन वगैरे धर्म निघाल्यामुळे ते देखील वैदिक धर्मच आहेत.  बौद्धांची आणि जैनांची परंपरा वेद किंवा उपनिषदें यांपासून निघाली नसून ती वेदकालापूर्वी मध्यहिंदुस्थानांत अस्तित्वांत असलेल्या ॠषिमुनींच्या परंपरेपासून निघाली, हें वरील विवेचनावरून स्पष्ट होईल असा भरवसा वाटतो.  तथापि उपनिषदांत वर्णिलेल्या ब्राह्मणांची बुद्धसमकालीं कशी स्थिती होती, याचा थोडक्यांत विचार करणें अप्रस्तुत होणार नाही.

आरण्यकें आणि उपनिषदें बुद्धकालानंतर बर्‍याच वर्षांनी रचण्यांत आलीं हें मी 'हिंदी संस्कृति आणि अहिंसा' या पुस्तकांत दाखवून दिलें आहे.  (पृ. ४८-५० पाहा.)  परंतु बुद्धसमकालीं उपनिषदांत वर्णिलेल्या ब्राह्मणांसारखे कांही ब्राह्मण आणि क्षत्रिय होते, असें समजण्यास मुळीच हरकत नाही.  पण त्यांपैकी बहुतेक होमहवनाचा धर्म सोडून शुद्ध श्रमण होत असत, असें जातकांतील पुष्कळशा गोष्टींवरून दिसून येतें.  उदाहरणार्थ, नंगुट्ठजातकाचा (नं. १४४) गोषवारा येथे देतों.

वाराणसींत ब्रह्मदत्त राज्य करीत असतां बोधिसत्त्व औदीच्य ब्राह्मणकुलांत जन्मला.  त्याच्या जन्मदिवशीं आईबापांनी जाताग्नि ठेवला.  आणि तो सोळा वर्षांचा झाल्यावर त्यांनी त्याला म्हटलें, ''बाबारे, तुझ्या जन्मदिवशीं हा अग्नि स्थापित केला आहे.  जर तुला गृहस्थ होऊन राहावयाचें असेल, तर तीन वेदांचें अध्ययन कर; पण जर ब्रह्मलोकपरायण होण्याची इच्छा असेल, तर हा अग्नि घेऊन अरण्यांत जा आणि त्याच्या सेवेने ब्रह्मदेवाची आराधना करून ब्रह्मलोकपरायण हो.''

बोधिसत्त्वाला गृहस्थाश्रम नको होता.  आपला जाताग्नि घेऊन तो अरण्यांत गेला आणि तेथें आश्रम बांधून त्या अग्नीची सेवा करीत राहिला.  एके दिवशीं बोधिसत्त्वाला एका शेतकर्‍याने दक्षिणेदाखल एक बैल दिला.  त्याचा बळी देऊन अग्निभगवंताची पूजा करण्याचा बोधिसत्त्वाचा विचार होता.  पण आश्रमांत मीठ शिल्लक नव्हतें.  तें आणण्यासाठी तो गांवात गेला असतां, इकडे कांही गुंड लोकांनी त्या बैलाला मारून अग्निहोत्रावर आपणाला पाहिजे तेवढें त्याचें मांस शिजवून खाल्लें व बाकीचें बरोबर नेलें.

ब्राह्मण मीठ घेऊन परत आला आणि पाहतो, तों बैलाचें कातडें, शेपून आणि हाडें तवढीं शिल्लक होतीं.  तो स्वतःशींच म्हणाला, ''हा अग्निभगवान् याच्या बलीचेंच रक्षण करूं शकत नाही; मग माझें रक्षण कसें करील ?''  असें म्हणून त्याने आपलें अग्निहोत्र पाण्यांत फेकून दिलें आणि ॠषिप्रव्रज्या घेतली.

बुद्धाचा उपदेश ऐकून उरुवेलकाश्यप, नदीकाश्यप आणि गयाकाश्यप या तिघां ब्राह्मणबंधूंनी आपलीं अग्निहोत्रें नदींत फेकून दिल्याची कथा बौद्धवाङ्‌मयांत प्रसिद्ध आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel