ऐतिहासिक कसोटी

यश आणि इतर ५४ तरुण भिक्षु झाले या कथेपासून येथपर्यंत कथन केलेला मजकूर हा महावग्गांतून सारांशरूपाने घेतलेला आहे.*  आता या कथेला ऐतिहासिक कसोटी लावून पाहिली पाहिजे.  बोधिसत्त्वाने उरुवेला येथे तपश्चर्या केली आणि तत्त्वबोध प्राप्‍त करून घेतला.  अर्थात् बुद्ध भगवंताला उरुवेलेच्या प्रदेशाची चांगली माहिती असली पाहिजे.  उरुवेलकाश्यप आणि त्याचे दोघे धाकटे बंधु हजार जटाधारी शिष्यांसहवर्तमान त्याच प्रदेशांत राहत होते.  त्यांना अद्‍भुत चमत्कार दाखवून जर भगवंताला आपले शिष्य करावयाचें होतें, तर त्यांना सोडून भगवान् काशीपर्यंत कां गेला ?  आपला धर्म पंचवर्गीयांशिवाय दुसरे कोणी जाणणार नाहीत, असें त्याला कां वाटलें ?  त्या वेळीं त्याला अद्‍भुत चमत्कार दाखविण्याची शक्ति नव्हती, आणि काशीला जाऊन पंचवर्गीयांना उपदेश केल्यानंतर ती शक्ति मिळाली, असें समजावें की काय ?
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  'बुद्धलीलासारसंग्रह', पृ. १६०-१६५, आणि 'बौद्धसंघाच परिचय' पृ. ७-८ पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ॠषिपत्तनांत पंचवर्गीयांशिवाय जे पंचावन्न भिक्षु बुद्धाला मिळाले, त्यांपैकी फक्त पांचांचींच नांवें महावग्गांत दिलीं आहेत; बाकी पन्नासांपैकी एकाचें देखील नांव नाही.  तेव्हा भिक्षूंची संख्या फुगविण्यासाठी पन्नासांची भर घातली असावी असें वाटतें.

वाटेंत तीस तरुण पुरुष स्त्रियांसह क्रीडा करीत असतां चुटकीसारशीं बुद्ध भगवंताने त्यांना भिक्षु बनविलें, हें संभवत नाही.  तसें करावयाचें होतें, तर उरुवेलेहून काशीला जाण्याचे त्याने प्रयास कां केले ?  उरुवेलेच्या आसपास मौजमजा करणारे कोणी तरुण त्याला सापडले नसते काय ?  मध्येच या तीस तरुणांची गोष्ट कां घुसडून दिली, हें समजत नाही.

बुद्ध भगवान् एक हजार तीन जटिलांना भिक्षु करून आणि बरोबर घेऊन राजगृहाला आला, त्या वेळीं सर्व राजगृह उचंबळून गेलें असतां सारिपुत्ताला बुद्ध कोण आहे याची बिलकूल माहिती नव्हती, हें कसें ?  अस्सजि पंचवर्गीयांपैकी एक.  त्याला इतर पंचवर्गीयांबरोबर काशीच्या आसपास धर्मोपदेश करण्याला पाठवून भगवान् उरुवेलेला व तेथून राजगृहाला आला; असें असतां हा अस्सजि एकाएकी राजगृहाला कसा पोचला ?  तात्पर्य, पंचवर्गीयांना, यशाला आणि त्याच्या चार साथ्यांना भिक्षुसंघांत दाखल करून घेतल्यानंतर काशीहून राजगृहापर्यंत भगवंताच्या प्रवासाची महावग्गांत आलेली हकीगत बहुतांशीं दंतकथात्मक आहे, असें म्हणावें लागतें.

ललितविस्तरांतील यादी

खरा प्रकार काय घडला हें जरी निश्चित सांगतां आलें नाही, तरी ललितविस्तराच्या आरंभीं जी भिक्षूंची यादी दिली आहे, तिच्यावरून भिक्षुसंघाची प्राथमिक माहिती अल्प प्रमाणांत जुळवितां येण्याजोगी असल्यामुळे ती यादी येथे देण्यांत येत आहे ः-

१.  ज्ञानकौण्डिन्य (अञ्ञाकोण्डञ्ञ)  २. अश्वजित् (अस्सजि)  ३. वाष्प (वप्प)  ४. महानाम  ५. भद्रिक (भद्दिय)  ६. यशोदेव (यस)  ७. विमल  ८. सुबाहु  ९. पूर्ण (पुण्णजि)  १०. गवाम्पति  (गवम्पति)  ११. उरुवेलकाश्यप (उरुवेलकस्सप)  १२. नदीकाश्यप  १३. गयाकाश्यप  १४. शारिपुत्र (सारिपुत्त)  १५. महामौद्गल्यायन (महामोग्गल्लान) १६. महाकाश्यप (महाकस्सप)  १७. महाकात्यायन (महाकच्चान)  १८. कफिल (?)  १९. कौण्डिन्य (?)  २०. चुनन्द (चुन्द)  २१. पूर्ण मैत्रायणीपुत्र (पुण्ण मन्ताणिपुत्त)  २२. अनिरुद्ध (अनुरुद्ध)  २३. नन्दिक (नन्दक)  २४. कस्फिल (कप्पिन)  २५. सुभूति  २६. रेवत  २७. खदिरवनिक  २८. अमोघराज (मोघराज)  २९. महापारणिक (?)  ३०. वक्कुल (बक्कुल)  ३१. नन्द  ३२. राहुल  ३३. स्वागत (सागत)  ३४. आनन्द.

महावग्गांत दिलेल्या नांव नसलेल्या भिक्षूंची संख्या वगळली तर ह्या यादींतील पंधरा भिक्षूंच्या परंपरेचा आणि महावग्गाच्या कथेचा मेळ बसतो; आणि त्यावरून असें अनुमान करतां येतें की, पंचवर्गीयांनंतर भगवंताला यश आणि त्याचे चार मित्र मिळाले.  ह्या दहांना बरोबर घेऊन भगवान उरुवेलेला गेला.  आणि तेथे त्याच्या संघांत तिघे काश्यपबंधु सामील झाले.  या तेरा शिष्यांसहवर्तमान भगवान राजगृहाला गेला.  तेथे संजयाच्या शिष्यांपैकी सारिपुत्त व मोग्गल्लान संजयाचा पंथ सोडून बुद्ध भगवंताचे शिष्य झाले.  ह्या दोघांच्या आगमनामुळे भिक्षुसंघाची महती फार वाढली.  कां की राजगृहांत त्यांची बरीच प्रसिद्धि होती.  बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा ह्या दोघांनीही कसा विकास केला, याची साक्ष सुत्ता आणि विनयपिटक देत आहेत.  बहुतेक अभिधम्मपिटक तर सारिपुत्तानेच उपदेशिला असें समजण्यात येतें.

यानंतर आलेल्या २९ भिक्षूंची परंपरा मात्र ऐतिहासिक दिसत नाही.  आनंद आणि अनुरुद्ध एकाच वेळीं भिक्षु झाले, असें चुल्लवग्गांत (भा. ७) सांगितलें असतां येथे अनुरुद्धाचा नंबर २२, व आनन्दाचा ३४ दिला आहे.  यांच्या बरोबर उपालि न्हाव्याने प्रव्रज्या घेतली, आणि तो पुढे विनयधर झाला, असें असतां ह्या यादींत त्याचें नांव सापडत नाही.  येथे दिलेल्या बहुतेक भिक्षूंचीं चरित्रें 'बौद्धसंघाचा परिचय' या पुस्तकाच्या तिसर्‍या भागांत आली आहेत.  जिज्ञासु वाचकांनी तीं वाचावीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel