बोधिसत्त्वाच्या समाधीचा विषय

बोधिसत्त्वाच्या ध्यानाचा विषय कोणता, हें सांगणें सोपें नाही.  प्रथमध्यान ज्यावर साधतें, असे एकंदरींत सव्वीस विषय* आहेत.  त्यांपैकी बोधिसत्त्वाच्या ध्यानाचा विषय कोणता हें नक्की सांगता येणें जरी कठीण आहे, तरी मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या चार विषयांपैकी एखाद्या विषयावर तो ध्यान करीत असावा, असें अनुमान अप्रस्तुत होणार नाही.  कां की, तें त्याच्या प्रेमळ स्वभावाला अनुसरून होतें.  आणि त्याला एक दुसरा आधार सापडतो तो असा-

''बुद्ध भगवान् कोलिय देशांत हरिद्रवसन नांवाच्या कोलियांच्या शहराजवळ राहत असतां कांही भिक्षु सकाळच्या प्रहरीं भिक्षाटण करण्यापूर्वी इतर परिव्राजकांच्या आरामांत गेले.  तेव्हा ते परिव्राजक त्यांना म्हणाले, 'आम्ही आमच्या श्रावकांना उपदेश करतों की मित्रहो, चित्ताचे उपक्लेश आणि चित्ताला दुर्बल करणारीं जीं पाच नीवरणें आहेत,** तीं सोडून तुम्ही मैत्रीसहगत चित्ताने एक दिशा भरून टाका, दुसरी, तिसरी व चौथी भरून टाका.  त्याचप्रमाणे वर खाली व चोहोबाजूला सर्व जगत् विपुल, श्रेष्ठ निस्सीम, अवैर व द्वेषरहित मैत्रीसहगत चित्ताने भरून टाका, करुणासहगतचित्ताने .... मुदितासहगतचित्ताने.... उपेक्षासहगतचित्ताने भरून टाका.  श्रमण गोतम देखील असाच उपदेश करतो.  मग त्याच्या आणि आमच्या उपदेशांत फरक कोणता ?' '' (बोज्झंगसंयुक्त, वग्ग ६, सुत्त ४)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* बुद्धघोषाचार्यांच्या आणि अभिधर्माच्या मतें पंचवीस विषय.  पण उपेक्षेवर देखील प्रथमध्यान साध्य होतें, असें गृहीत धरलें तर सव्वीस विषय.  समाधिमार्ग, पृ. ६८-६९ पाहा.
**  समाधिमार्ग, पृ. ३१-३५ पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शाक्य आणि कोलिय शेजारीं असून त्यांचा निकट संबंध होता, आणि कधी कधी रोहिणी नदीच्या पाण्यासंबंधाने त्यांच्यांत भांडणे उपस्थित होत, असा उल्लेख जातक अट्ठकथेंत आणि इतर अट्ठकथांतून पुष्कळ ठिकाणीं आला आहे.  त्या कोलियांच्या राज्यांत अन्य पंथांतील परिव्राजक बौद्ध संघांतील भिक्षूंना वरील प्रश्न विचारतात.  हे परिव्राजक तेथे बर्‍याच वर्षांपासून राहत असले पाहिजेत.  त्यांचा आश्रम बुद्धाने धर्मोपदेश करण्याला सुरवात केल्यानंतर स्थापन झाला नाही; तो पूर्वीपासूनच तेथे होता हें खास.  आणि हे परिव्राजक मैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षा ह्या चार ब्रह्मविहारांची पावना करावी, असा उपदेश करीत.*  तेव्हा ते कालामाच्याच पंथांतील होते, असें समजण्याला हरकत कोणती ?  निदान हे ब्रह्मविहार बोधिसत्त्वाला तरुणपणींच माहीत होते, आणि तो त्याजवर ध्यान करून प्रथमध्यान संपादीत असे, या विधानाला बाधा येत नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  ह्या ब्रह्मविहाराचें स्पष्टीकरण समाधिमार्गाच्या पांचव्या प्रकरणांत केलें आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel