दंग आज ताण्डवात, भीषण आलाप गात ।
नरसमिधा ग्रंथिज्वर, शोधतो घराघरात ॥१॥
पाला जणु नरजीवन, पवनाला करि घेउन ।
झाडितसे यम वसुधा उत्तर शिशिरासमान ॥२॥
खेची यम तात कुणी, कोणाची वा गृहिणी ।
पुत्र, बंधु, कन्या वा, ओढतो घशात झणी ॥३॥
एकामागून एक, एकदाचि वा अनेक ।
शय्येवरि सरणाच्या घटकेने होत खाक ॥४॥
भरले संसार आज, ध्वस्त करी धर्मराज ।
हास्य करी तो भेसूर घालुनिया मुंडसाज ॥५॥
आर्तस्वर आक्रंदन, ऐकूनिया बधिर कान ।
अटले जल नयनातिल गावांचे हो स्मशान ॥६॥
अर्भके अनाथ किती, दीन दिगंबर फिरती ।
एकचि आधार तयां भू खाली नभ वरती ॥७॥
पुरली ना पुण्यपुरी, गेला नासिक नगरी ।
वेढले भगूर तये जनतेचे प्राण हरी ॥८॥
धिंगाणा रोगाचा, अंत करी ताताचा ।
सावरकर बालकांसि आता कर काकाचा ॥९॥
हाय ! कोसळे अंबर ! तो आधाराचा कर ।
मृत्युच्या निजे मुखांत आणि पिले वा-यावर ॥१०॥
बाळ आणि बाबावर फिरवी जिव्हा कठोर ।
रुचि वाटे कडवट जणु सोडला तये विचार ॥११॥
पाण्यातचि पद्मपत्र, कोरडे ! किती विचित्र ।
ना शिवे विनायकासि कालाचे मृत्युपत्र ॥१२॥
विधिने अपुल्या मनात योजिले विनायकात ।
नायकत्व देशाचे करण्या भू शत्रुमुक्त ॥१३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel