मुहंमदांचें सफल जीवन

जातिजमाती इस्लामी होत होत्या. अरबस्थानांतील विरोध मावळत होते. नवराष्ट्र निर्माण झालें. रक्तपात, सूड, भांडणें बंद पडलीं. तो उत्साह, तें शौर्य आतां धर्माकडे वळलीं. अजून काबाच्या मंदिरांत जे मूर्तिपूजक होते त्यांच्याविरुध्द पैगंबरांनीं फर्मा काढलें नव्हतें. ते लोक जुने परंपरागत धर्मविधि अद्याप करीतच होते. परंतु अत:पर या जुन्या गोंधळास आळा घालण्याचें मुहंमदांनीं ठरविलें. अद्याप जे नवधर्मांत अंत:करणपूर्वक सामील झाले नव्हते, त्यांचीं मनें पुन्हां मूर्तिपूजेकडे वळूं नयेत म्हणून सारे जुने अवशेष, खाणाखुणा नष्ट करणें प्राप्त होतें. नवव्या वर्षाच्या यात्रेच्या वेळेस पैगंबरांनीं अलीला मक्केंत एक शासनपत्र वाचायला सांगितलें. मूर्तिपूजेच्या मुळावर घाव घालणारें तें फर्मान होतें. मूर्तिपूजेसंबंधींच्या सर्व आचारांवर व विधींवर तो शेवटचा प्रहार होता. पुढें दिल्याप्रमाणें तें फर्मान होते :

"अत:पर कोणत्याहि मूर्तिपूजकास या यात्रेंत येतां येणार नाही. तसेंच काबाभोवतीं ज्या प्रदक्षिणा घालावयाच्या त्या दिगंबर होऊन घालतां कामा नयेत. पैगंबरांजवळ ज्यांचे ज्यांचे करार आहेत ते त्यांना मुदत संपेपर्यंत बंधनकारक आहेत. जे यात्रेकरु येतील त्यांनीं चार महिन्यांच्या आंत आपापल्या प्रान्तीं परत जावें. त्या मुदतीनंतर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पैगंबरांवर नाहीं. अर्थात् ज्यांच्या संरक्षणासंबंधी इतर तह व करारनामे असतील त्यांची गोष्ट निराळी.'

या जाहीरनाम्यास 'जबाबदाराची घोषणा' असें नांव आहे. मूर्तिपूजक व हे नवधर्मी जर यात्रेंत मिसळूं दिले असते तर मुहंमदांचे कार्य पुढें नष्टहि झालें असतें. त्या परंपरागत रुढींचा पगडा पुन्हा बसला असता. ख्रिस्ती व ज्यू धर्मांत शिरलेले प्रकार मुहंमदांनीं पाहिले होते. त्या धर्मातून मूर्तिपूजेचीं स्वरुपें शिरलीं. मारामा-या सुरु झाल्या. कत्तली सुरु झाल्या. रुढींचें साम्राज्य पुन्हां बळावलें. तसें होऊं नये म्हणून पैगंबरांनीं वर सांगितलेली दूरदर्शी योजना केली. यात्रेकरु नवीन जाहीरनामा ऐकून गेले व उरलेसुरले मूर्तिपूजकहि लौकरच मुसलमान झाले.

हिजरीचें दहावें वर्ष आलें. या दहाव्या वर्षी यमन व हिजाझ या भागांतील उरलेसुरले मुस्लिम झाले. तसेच हजरामूत व किन्दा वगैरे ठिकाणच्या जातिजमातीहि मुसलमान झाल्या. अरबस्थानांतून अनेकांची शिष्टमंडळें येत होतीं. पुढारी येत होते. आपापली निष्ठा प्रकट करीत होते. मुहंमद सर्वत्र प्रचारक पाठवीत होते. एके दिवशीं सकाळची प्रार्थना झाल्यावर मुहंमद म्हणाले, 'आतां प्रचार हवा. कोणी इकडे जा, कोणी तिकडे जा. सर्वत्र जा. लांब जा, दूर जा. ख्रिस्ताच्या प्रचारकांप्रमाणें नका होऊं. ते जवळच्या लोकांतच प्रचार करते झाले. तुम्ही दूरहि जा. त्या त्या लोकांच्या भाषा शिका. सर्वांजवळ सौम्यतेनें वागा. मानवजातीचें काम ज्याच्यावर सोंपविलें गेलें तो जर मानवांची सेवा न करील तर ईश्वर स्वर्गाचे दरवाजे त्याला बंद करील ! सर्वांजवळ प्रामाणिकपणानें वागा. कोणास फसवूं नका. कठोर नका होऊं. लोकांना प्रेरणा द्या, नवोत्साह द्या. त्यांना धिक्कारुं नका. ज्यांना पूर्वी ईश्वरी ग्रंथ मिळाले अशा ख्रिस्ती, ज्यू लोकांशींहि तुमच्या गांठी पडतात. ते विचारतील, 'स्वर्गाची किल्ली कशांत आहे ?' त्यांना सांगा, 'स्वर्गाची कसोटी ईश्वरी सत्याच्या पालनांत व सत्कर्म करण्यांत आहे.'

आणि प्रचारक जाऊं लागले. नवीन भाषा शिकूं लागले. एकदां दुस-या लोकांची भाषा शिकून जेव्हां कांहीं प्रचारक आले तेव्हां पैगंबरांस फार आनंद   झाला. ते म्हणाले, 'अत्यंत थोर कर्तव्यांपैकीं हें एक कर्तव्य तुम्ही बजावलेंत. ईश्वराला ज्या गोष्टींसाठीं पैगंबरांमुळें तुम्ही जबाबदार आहांत त्या गोष्टींतील दुस-यांची भाषा शिकणें ही फारच मोठी गोष्ट आहे.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel