ज्या दिवशी हेमंत त्या खेडेगावाला न्याय द्यायला जाणार होता. त्या दिवशी त्या गावाला रंगरावच आधी घोडयाच्या गाडीतून गेले. चावडीवर जाऊन बसले. काही लोक जमले.

''तुम्ही कशाला? हेमंतदादा येणार होते ना?'' एकाने विचारले.

''हेमंतला काम आहे म्हणून मीच आलो. बोलवा ज्यांची भानगड मिटवायची आहे त्यांना.''

परंतु कोणी जात ना, कोणी येत. रंगराव तेथे माशा मारीत बसले. इतक्यांत आले, आले, हेमंतदादा आले, असे शब्द कानांत आले. खरेच एका टांग्यांतून हेमंत आला. त्याच्याभोवती किती गर्दी. हेमंत चावडीवर आला. तेथे रंगरावांना पाहून तो चकितच झाला.

''तुम्ही येणार हे मला माहीतही नव्हते. तुम्ही तसे काल बोललेत सुध्दा नाही. मी आलो नसतो.'' हेमंत प्रेमाने म्हणाला.

''हे लोक तुझी वाट पाहात आहेत. तू न्यायमूर्ती, धर्मराजा. दे बाबा न्याय.'' रंगराव म्हणाले.

हेमंतने सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. पंचांना त्याने माहिती विचारली. इतरही काही लोकांना प्रश्न विचारून त्याने नीट समजून घेतले. मग त्याने निकाल दिला. सर्वांच्या शंका त्याने फेडल्या. सर्वांचे समाधान झाले.नंतर गावकर्‍यांनी रंगराव नि हेमंत यांना अल्पोपहार दिला, हारतुरे दिले.

''हेमंतदादा, मळा बघायला येता का?'' एकाने प्रेमाने विचारले.

''जवळ असेल तर चला.'' हेमंत म्हणाला.

''मला वेळ नाही. मी पुढे जातो.'' असे म्हणून रंगराव निघून गेले. हेमंत मागून मळा वगैरे बघून गेला.

दिवसेंदिवस रंगराव नि हेमंत यांचे संबंध दुरावत चालले. रंगराव आता त्याच्याशी गोड बोलत नसे. कधी प्रेमाने त्याला घरी बोलावीत नसे. हेमंत मात्र जपून होता. त्याला वाटे की रंगरावांची ही लहर असेल. ती लहर जाईल. परंतु ही लहर अधिकाअधिक जहरी होईल अशी त्याला कल्पना नव्हती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel