वृध्द गुलाबचंद साधु कांही अंतरावर बसले होते ते तेथूनच आपल्या शिष्याला म्हणाले,''या गृहस्थाने दोन उतार्‍यांचा जो अर्थ लावला, तोच बरोबर आहे; आधुनिक टीकाकारांनी केलेले अर्थ ठीक नव्हता. ह्या दोन उतार्‍यांशिवाय आणखी बर्‍याच ठिकाणीं, जैन साधु मांसाहार करीत होते, याला आधार सापडतात.''

असें म्हणून त्यांनी जैन सूत्रांतील उतारे म्हणण्यास सुरवात केली. पण त्यांच्या विद्वान शिष्यांनी विषयांतर करून हा संवाद तसाच सोडून दिला. त्याच्या गुरूंनी सांगितलेले आधार कोणते, हें मी विचारलें नाही. तसें करणे मला अप्रस्तुत वाटलें

महावीरस्वामींच्या मासांहाराबद्दल वाद

खुद्द महावीरस्वामी मासांहार करीत होते यासंबंधीं सबळ पुरावा सध्या पुढे आला आहे. 'प्रस्थान' मासिकाच्या गेल्या कार्तिकाच्या अंकात (संवत १९९५ वर्ष १४ अंक १) श्रीयुत गोपाळदास जीवाभाई पटेल यांनी 'श्री महावीरस्वामीनो मांसाहार' नांवाचा लेख प्रासिध्द केला आहे. त्यापैकी प्रस्तुत विषयाला लागू पडणारी माहिती संक्षेपाने येथे देतों.

महावीरस्वामी श्रावस्ती नगरींत राहत होते. मक्खलि गोसाल देखील तेथे पोचला. आणि ते दोघे परस्परांच्या जिनत्वाविरूध्द कडक टीका करूं लागले. परिणामीं गोसालाने महावीरस्वामीला शाप दिला की, माझ्या तपोबलाने तूं  सहा महिन्यांत अन्ती पित्तज्वराने मरण पावशील. महावीरस्वामीने त्याला उलटा शाप दिला की, तूं सातव्या रात्री पित्तज्वराने पीडित होऊन मरण पावशील. त्याप्रमाणे गोसाल सातव्या रात्रीं मरण पावला. पण त्याच्या प्रभावाने महावीर स्वामीला अत्यंत दाह होऊन रक्ताचे झाडे सुरू झाले.

त्या वेळीं महावीरस्वामीने सिंह नावाच्या आपल्या शिष्याला सांगितले, '' तूं मेंढिक गावांत रेवती नांवाच्या बाईपाशीं जा. तिने माझ्यासाठी दोन कबुतरें शिजवून ठेवलीं आहेत, तीं मला नकोत. 'काल मांजराने मारलेल्या कोंबडीचें मांस तूं तयार केलें आहेतस, तेवढें दे,' असें तिला सांग.''

श्रीयुत गोपाळदास यांनी, मूळ भगवती सूत्रांतील उतारा आपल्या लेखांत दिला नाही. तो येथे देणें योग्य आहे-

''तं गच्छह णं तुमं सीहा, मेंढियगामं नगरं रेवतीए गाहावतिणीए गिहे तत्थ णं रेवतीए गाहावतिणीए ममं अट्ठाए दुवे कबोयसरीरा उवक्खडिया, तेहिं नो अट्ठो । अत्थि से अन्न पारियासिए मज्जारकडए कुक्कडमंसए तं आहराहि एएणं अट्ठो।''

ज्याला अर्धमागधीचें अल्पस्वल्प ज्ञान आहे, त्याने नि:पक्षपातीपणाने हा उतारा वाचला, तर तो म्हणेल की, श्री.गोपाळदास यांनी केलेला अर्थ बरोबर आहे. पण आजला* श्री गोपाळदास यांच्या विरूध्द अनेक जैन पंडितानी कडक टीका चालविली आहे!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel