'मेंढरांप्रमाणे नम्र आणि घडाभर दूध देणार्‍या गाई पायाने, शिंगाने किंवा दुसर्‍या कोणत्याही अवयवाने कोणाचीही हिंसा करीत नाहीत. त्यांना (ब्राह्मणाच्या सांगण्यावरून) इक्ष्वाकु राजाने शिंगाना धरून ठार मारलें. तेव्हा गाईंवर शस्त्रप्रहार झाल्यामुळे देव, पितर,इंद्र, असुर आणि राक्षस अधर्म झाला म्हणून आक्रोश करते झाले!''

पुष्कळ काळ ब्राह्मणांनी गोमांस सोडलें नाही

बौध्दांच्या आणि जैनाच्या प्रयत्नाने गोमांसाहाराचा निषेध होत गेला, तरी ब्राह्मण लोकांत त्याची मनाई होण्यास बरीच शतकें लागली. प्रथमत: यज्ञासाठी दीक्षा घेतलेल्याने गोमांस खाऊं नये अशी एक शक्कल निघाली.

''य धेन्वै चानडुहश्च नाश्नीयात् । धेन्वनडुहौ वाऽइदं सर्व विभृतस्ते अब्रुवन् धेन्वनडुहौ वाऽइंद सर्वं विभृतो हन्त यदन्येषां वयसां वीर्य तद्वेन्वनडुहयोर्दधामेति... तस्माद्वेन्वनडुहयोर्नाश्नीयात् तदु होवाच याज्ञवल्क्योऽश्नाम्येवाहं मांसलं चेद्भवतीति॥''

'गाई आणि बैल खाऊं नयेत. गाई आणि बैल हें सर्व धारण करतात. ते देव म्हणाले, गाई आणि बैल हें सर्व धारण करतात, अतएव दुसर्‍या जातीच्या पशुचें जे वीर्य तें गाई आणि बैलामध्ये घालू या ...म्हणून गाईबैल खाऊं नयेत. पण याज्ञवल्क्य म्हणतो, शरीर मांसल होतें, म्हणून मी (हे मांस) खाणारच.' (शतपथ ब्राह्मण३।१।२।२१).

हा वाद यज्ञशाळेपुरताच होता. कित्येकांचें म्हणणें होतें की, दीक्षिताने यज्ञशाळेत प्रवेश केल्यावर गोमांस खाऊं नये. परंतु याज्ञवल्क्याला हें मत पसंत नव्हते. शरीर पुष्ट होत आहे, म्हणून तें वर्ज करण्यास तो तयार नव्हता. इतर प्रसंगी गोमांसाहार करण्यासंबधाने ब्राह्मणांमध्ये वाद मुळीच नव्हता. इतकेंच नव्हे, तर कोणी तसाच प्रतिष्ठित पाहुणा आला असतां मोठा बैल मारून त्याचा आदरसत्कार करण्याची पध्दति फार प्रसिध्द होती. एक तेवढया गौतमसूत्रकाराने गोमांसाहाराचा निशेध केला आहे. पण त्याला देखील मधुपर्कविधि पसंत असावा. ब्राह्मणांमध्ये हा विधि भवभूतीच्या कालापर्यंत तुरळक चालू होता, असें वाटतें. उत्तररामचरिताच्या चौथ्या अंकाच्या आरंभी सौघातकि आणि दण्डायन यांचा संवाद आहे, त्यांपैकी थोडासा भाग असा-

सौधातिक - काय वसिष्ठ!

दण्डायन - मग काय?

सौ.- मला वाटले होतें की, हा कोणी तरी वाघासारखा असावा.
द.- काय म्हणतोस!

सौ.- त्याने आल्याबरोबर ती आमची बिचारी कपिल कालवड झट्दिशीं गट्ट करून टाकली!

द.- मधुपर्कविधि समांस असला पाहिजे, ह्या धर्मशास्त्राच्या आज्ञेचा बहुमान करून गृहस्थ लोक श्रोत्रिय पाहुणा आला असतां कालवड किंवा मोठा बैल मारून त्याचे मांस रांधतात. कारण धर्मसूत्रकारांनी तसाच उपदेश केला आहे.

भवभूतीचा काळ सातव्या शतकांत गणला जातो. त्या काळीं आजच्या सारखा गोमांसभक्षणाचा अत्यंत निषेध असता, तर वसिष्ठाने कालवड खाऊन टाकल्याचा उल्लेख त्याला आपल्या नाटकांत करतां आला नसता. आजला असा संवाद नाटकांत घातला, तर तें नाटक हिंदुसमाजाला कितीसें प्रिय होईल?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel