युध्द धार्मिक ठरल्याने अकुशल कर्मपथ उपयुक्त ठरले

यज्ञयागांतील हिंसा त्याज्य मानिली असती, तर यज्ञयाग करण्याचें कारणच राहिलें नसतें. आणि ते यज्ञयाग कशासाठी होते? तर युध्दांत जय मिळावा व जय मिळाल्यानंतर मिळविलेलें राज्य चिरस्थायी व्हांवे म्हणून. अर्थात युध्दातील हिंसा धार्मिक गणण्यांत आली नसती, तर वैदिक हिंसेचें कारणच राहिलें नसतें; आणि म्हणूनचे युध्दाला पावित्र्य देणें भाग पडलें.

श्रीकृष्ण म्हणतात -

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि।
धर्म्याद्वि युद्वाच्छेयोऽन्रूत्क्षत्रियस्रू न विद्यते॥

'आणि स्वधर्माचा विचार करून देखील, माघार घेणें तुला योग्य होणार नाही. क्षत्रियांना धर्म्य युध्दापेक्षा अधिक श्रेयस्कर असें दुसरें कांही नाहीं.'

यद्दच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारारभपावृतम्।
सुखिन: क्षत्रिया: पार्थ लभन्ते युद्वमीद्दशम्॥

'आणि, हे पार्था, सहज दैवगत्या उघडलेलें स्वर्गाचें द्वार असें हें युध्द भाग्यवान् क्षत्रियांना लाभतें.'

अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि।
तत: स्वधर्मं कीर्ति च हित्वा पापमवाप्स्यसि॥

'आणि जर हा धार्मिक संग्राम तूं करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ति गमावून पाप पावशील.' (गीता, अ २।३१-३३).

युध्द धार्मिक ठरल्याने सर्व अकुशल कर्मपथ धार्मिक होणें साहजिक होतें. म्हणजे युध्दावाचून इतर ठिकाणीं हिंसा करूं नये, युध्दावाचून लूटफाट करूं नये, युध्दावाचून व्यभिचार करू नये, त्याचप्रमाणे असत्य भाषण, चहाडी, ककर्श वचन हें युध्दाला ला उपयोगी असल्याशिवाय म्हणजे राजकारणावाचून उपयोगांत आणूं नये. परद्रव्याचा लोभ तर युध्दात फारच उपयोगी आहे. आपल्या सैन्यांत परक्यांविषयी द्वेष फैलावल्याशिवाय सैनिक युध्दाला तयार व्हावयाचेच नाहीत; आणि आपण स्वधर्मासाठी, स्वराष्ट्रासाठी, किंवा अशाच कोणत्यातरी काल्पनिक पवित्र कार्यासाठी भांडत आहोंत अशी तीव्र मिथ्याद्दष्टि उत्पन्न झाल्याशिवाय युध्दांत जय मिळणें शक्य नाही. तात्पर्य, एका युध्दासाठी सगळया कुशल कर्मांवर पाणी सोडणे पवित्र ठरते!

अश्वत्थामा मेला असें स्पष्ट खोटें बोलण्यास युधिष्ठिर तयार नव्हता, तेव्हा त्याला श्रीकृष्णाने 'नरो वा कुंजरो वा' (माणूस किंवा हत्ती मेला) असें म्हणावयास लावलें. आजकालचें राजकारण अशाच प्रकारचें असतें; अर्धवट खरें आणि अर्धवट खोटें. आणि आपल्या देशाचें घोडे पुढे घालतां आलें, तर कोणतेंही अकुशल कर्म अत्यंत पवित्र ठरूं शकतें!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel