श्रमणांनी केलेलें मांसाहारचें सर्मथन

हें सुत्त फार प्राचीन आहे. पण तें खास काश्यप बुध्दाने उपदेशिलेलें होतें, असें समजण्याला बळकट आधार नाही. बुध्दसमकालीनल भिक्षु मांसहाराचें समर्थन येणेंप्रमाणें करीत, एवढेंच समजावें.

या सुत्तांत तपश्चर्या निरर्थक गणली आहे. हें मत जैन श्रमणांना पसंत पडलें नसतें. कां की, तें वारंवार तपश्चर्या करीत असत. तथापि मांसाहारेचें त्यानी अशाच प्रकारें समर्थन केलें असतें. कारण, ते पूर्वकालीन तपस्व्यांप्रमाणे जंगलांतील फळमुळावंर निर्वाह करून न राहतां लोकांनी दिलेल्या भिक्षेवर अवलंबून राहत; आणि त्या काळीं निर्मांसमत्स्य भिक्षा मिळणें अशक्य होतें. ब्राह्मण यज्ञांत हजारों प्राण्यांचा वध करून त्यांचे मांस आजूबाजूच्या लोकांना वाटीत. खेडयातील लोक देवतांना प्राण्यांचे बलिदान करून त्यांचे मांस खात. याशिवाय खाटीक लोक भर चौकांत गाईला मारून तिचे मांस विकावयास बसत. अशा परिस्थितींत पक्व अन्नाच्या भिक्षेवर अवलंबून राहणार्‍या श्रमणांना मांसाशिवाय भिक्षा मिळणें कसें शक्य होतें?

जैनांच्या समजुतीप्रमाणे पृथ्विकाय, अपकाय, वायुकाय, अग्निकाय, वनस्पतिकाय, आणि त्रसकाय असे सहा जीवभेद आहेत (पृ.५४) पृथ्वीकाय म्हणजे पृथ्वीपरमाणु, त्याचप्रमाणे जल, वायु आणि अग्नि यांचे परमाणु सजीव आहेत. वनस्पतिकाय म्हणजे वृक्षादिक वनस्पति. ते सजीव आहेत, हें सांगावयाला नकोच. त्रसकाय म्हणजे किडामुंगीपासून तहत हत्तीपर्यंत लहान मोठे सर्व प्राणी. या सहा कायांपैकी कोणत्याही प्राण्यांची हिंसा करणें जैन श्रमण पाप समजतात. म्हणून ते रात्रींचा दिवा लावीत नसत, थंड पाणी पीत नसत आणि पृथ्वीपरमाणुआदिकांचा संहार होऊ नये, याबद्दल फार काळजी घेत.

परंतु जैन उपासक शेत नांगरीत, धान्य पेरीत आणि तें शिजवून अन्न तयार करीत. या कृत्यांत पृथ्वी, अप्, तेज, वायु, वनस्पति आणि त्रस या सहाही प्रकारच्या जीवांचा संहार होत असे. पृथ्वी नांगरीत असतां पृथ्वीपरमाणुच नष्ट होतात असें नव्हे. तर किडे, मुंग्या इत्यादिक बारीकसारीक लाखो प्राणी मरतात. धान्य शिजवतांना वनस्पतिकाय, अपकाय, अग्निकाय व वायुकाय या सर्व प्राण्यांचा उच्छेद होता. असे असतां त्या अन्नाची भिक्षा जैन साधु घेतातच. तर मग एखाद्या जैन उपासकाने तयार केलेली मांसभिक्षा घेण्याला प्राचीन जैन श्रमणांना हरकत कोणती होती? आणि त्या कृत्याचे समर्थन त्यांनी आमगंधसुत्ताच्या धर्तीवरच केलें नसतें काय?

गोमांसाहाराविरूध्द चळवळ

आता मांसाहाराविरूध्द चळवळ कशी सुरू झाली याविषयीं थोडक्यात विचार करूं. सर्वांत प्रथम गोमांसाहाराच्या निषेधाबद्दल बौध्दांनीच चळवळ सुरू केली असावी. नवव्या प्रकरणांत (पृ.६२) गायींची योग्यता दर्शविणार्‍या ब्राह्मण -धम्मिक-सुत्तांतील दोन गाथा दिल्या आहेत; त्याशिवाय ह्या गाथा पाहा.

न पादा न विसाणेन नास्सु हिंसन्ति केनचि।
गावो एळकसमाना सोरता कुम्भदूहना।
ता विसाणे गहेत्वान राजा सत्थेन घातयि॥
ततो च देवा पितरो इन्दो असुररक्खसा।
अधम्मो इति पक्कन्दु यं सत्थं निपती गवे॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel