दश कुशल कर्मपथांत ब्राह्माणांनी केलेला फेरफार

बरेच आढेवेढे घेऊंन वैदिक ग्रन्थकारांना वर निर्देशिलेल्या कुशल आणि अकुशल कर्मपथांना मान्यता द्यावी लागली. पण त्यांत त्यांनी आपल्या हक्कावर गदा येऊं नये अशी खबरदारी घेतली. मनुस्मृतींत हे दहा अकुशल कर्मपथ कशा प्रकारें स्वीकारले आहेत तें पाहा.

स तानुवाच धर्मात्मा महर्षीन्मानवो भृगु:।
अस्य सर्वस्य शृणत कर्मयोगस्य निर्णयम् ॥

'तो मनुकुलोत्पन्न धर्मात्मा भृगु त्या महर्षीना म्हणाला, ह्या सर्व कर्मयोगाचा निर्णय ऐका.'

परद्रव्येष्वभिध्यानं मनसानिष्टचिंतनम्।
वितथाभिनिवेशश्च त्रिविधं कर्म मानसम्॥

'परद्रव्याचा अभिलाष धरणें, दुसर्‍याचें वाईट चिंतणें आणि भलत्याच मार्गाला लागणें (नास्तिकता), हीं तीन मानसिक (पाप) कर्मे जाणावीं.'

पारूष्यमनृतं चैव पैशुन्यं चापि सर्वश:।
असंबध्दप्रलापश्च वाडम:यं स्याच्चतुर्विधम्॥

'कठोर भाषण, असत्य भाषण, सर्व प्रकारची चहाडी आणि वृथा बडबड, हीं चार वाचिक पापकर्मे होत.'

अदत्तानामुपादानं हिंसा चैवाविधानत: ।
परदारोपसेवा च शारीरं त्रिविधं स्मृतम्॥

'अदत्तादान (चोरी), वेदविहित नसलेली हिंसा व परदारीगमन, हीं तीन कायिक पापकर्मे होत.'

त्रिविध च शरीरेण वाचा चैव चतुविधम् ।
मनसा त्रिविधं कर्म दश कर्मपंथास्त्यजेत्॥

'(याप्रमाणे) त्रिविध कायिक, चतुर्विध वाचसिक आणि त्रिविध मानसिक असे दहा (अकुशल) कर्मपथ त्यजावे.'(मनु.१२।५-९)

यांपैकी पाहिल्या श्लोकांत 'कर्मयोग' हा शब्द फार उपयुक्त आहे. मनुस्मृतीच्या कर्त्याला बुध्दाने उपदेशिलेला कर्मयोग पसंत होत खरा, तरी त्याने त्यांत एक अपवाद ठेवून दिला. तो हा की, हिंसा वेदविहित नसली तरच ती करावयाची नाही, वेदाच्या आधारे केलेली हिंसा, हिंसा नव्हे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel