जैन संघाने जातिभेद स्वीकारला

इतर श्रमणसंघापैकी एक तेवढया निर्ग्रंन्थ संघाची अल्पस्वल्प माहिती आजला उपलब्ध आहे. ह्या श्रमणसंघाने जातिभेदाला अशोकापूर्वीच महत्त्व देण्याला सुरवात केली, असें आचारांगसूत्राच्या निरूक्तीवरून दिसून येतें. ही निरूक्ति भद्रबाहूने रचली आणि तो चंद्रगुप्ताचा गुरू होता अशी समजूंत जैन लोकांत प्रचलित आहे. ह्या निरूक्तीच्या आरंभीच जातिभेदाविषयी जो मजकूर सापडतो, त्याचा सांराश असा- ' चार वर्णांच्या संयोगाने सोळा वर्ण उत्पन्न झाले. ब्राह्मण पुरूष आणि क्षत्रिय स्त्री यांजपासून प्रधान क्षत्रिय किंवा संकर क्षत्रिय उत्पन्न होतो. क्षत्रिय पुरूष आणि वैश्य स्त्री यांजपासून प्रधान वैश्य किंवा संकर वैश्य उत्पन्न होतो. वैश्य पुरूष व शूद्र स्त्री यांजपासून प्रधान शूद्र किंवा संकर शूद्र उत्पन्न होतो. ह्याप्रमाणें सात वर्ण होतात. आती हीं नववर्णान्तरे - (१) ब्राह्मण पुरूष व वैश्य स्त्री यांजपासून अम्बष्ठ ; (२) क्षत्रिय पुरूष आणि शूद्र स्त्री यांजपासून उग्र ; (३) ब्राह्मण पुरूष आणि शूद्र स्त्री यांजपासून निषाद;(४) शूद्र पुरूष आणि वैश्य स्त्री यांजपासून अयोगव; (५) वैश्य पुरूष आणि क्षत्रिय स्त्री यांजपासून मागध; (६) क्षत्रिय पुरूष व ब्राह्मण स्त्री यांजपासून सूत; (७) शूद्र पुरूष आणि क्षत्रिय स्त्री यांजपासून क्षत्ता ; (८) वैश्य पुरूष आणि ब्राह्मण स्त्री यांजपासून वैदेह; (९) शूद्र पुरूष आणि ब्राह्मण स्त्री यांजपासून चांडाल उत्पन्न होतो.'

(आचारांग निर्युक्ति अ.१, गाथा २१ ते २७)

आजला अस्तित्वांत असलेली मनुस्मृति ह्मा निर्युक्तीपेक्षा फारच अर्वाचीन आहे. तथापि ह्मा नियुक्तिसमकालीं ब्राह्मण लोक मनुस्मृतींतील अनुलोम प्रतिलोम जातींची अशाच प्रकारें व्युत्पत्ति लावण्याचा प्रयत्न करीत होते, असें अनुमान करण्यास मुळीच हरकत नाही. आणि जैनांनी ही व्युत्पत्ति ब्राह्मणांकडूनच घेतली असावी, अशी बळकट शंका येते. कांही असो, निर्ग्रंन्थ श्रमणांनी जातिभेदाला पूर्ण संमति दिल्याचा हा एक उत्तम दाखला आहे.

हीनजातीयांना जैन साधुसंघांत घेण्याची मनाई


बाले वुङ्ढे नपुंसें य कीवे जड्डे य वाहिए।
तेणे रायावगारी य उम्मत्ते य अदंसणे॥
दासे दुट्ठे य मूढे य अणत्ते जुंगिए इ य।
उबध्दए च भयए सेहनिप्फेडिया इ य॥

(१) बाल, (२) वृध्द, (३) नपुसंक, (४) क्लीब, (५) जड, (६) व्यधित, (७) चोर, (८) राजापराधी, (९) उन्मत्त, (१०) अदर्शन (?) (११) दास, (१२) दुष्ट, (१३) मूढ, (१४) ऋणार्त, (१५) जुंगित, (१६) कैदी, (१७) भयार्त, आणि (१८) पळवून आणलेला शिष्य, या अठरांना जैन साधुसंघांत घेण्याची मनाई आहे. यांच्यापैकी बर्‍याच व्यक्तींना बौध्द भिक्षुसंघात देखील घेता येत नाही. ह्या दोन संघातील प्रवेशविधींची (उपसंपदांची) तुलना अत्यंत उपयुक्त होईल.* पण तो या प्रकरणाचा विषय नव्हे. वर दिलेल्या अठरा असामींपैकी पंधराव्याचा तेवढा विचार आवश्यक आहे. त्या शब्दावरची टीका अशी -
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel