सा.- महाराज, हा म्हातारा माणूस आहे.
वि.- मित्रा सारथे, म्हातारा म्हणजे काय?
सा.- म्हातारा म्हणजे त्याला फार दिवस जगावयाचें नाही.
वि.- मी देखील असा जराधर्मी आहें काय?
सा.- महाराज, आम्ही सर्वच जराधर्मी आहोंत.
वि.- तर मग सारथे, आता उद्यानाकडे जाणें नको. परंतु वाडयात जाऊं या.
सा.- ठीक महाराज.

असें म्हणून सारथ्याने अंत:पुराकडे रथ वळविला. तेथे विपस्सी कुमार दु:खी आणि उद्विग्न होऊन विचार करूं लागला की, ह्या जन्माला धिक्कार असो, ज्याच्यामुळे जरा उत्पन्न होते!

बंधुमा राजा सारथ्याला बोलावून म्हणाला,''कायरे मित्रा सारथे कुमार उद्यानात रमला काय? उद्यानात त्याला आनंद वाटला काय?
सा.- नाही, महाराज.
राजा- कां ? त्याने उद्यानाकडे जाताना काय पाहिले?
सारथ्याने घडलेले सर्व वर्तमान निवेदित केलें. तेव्हा बंधुमा राजाने विपस्सीकुमार परिव्राजक होऊं नये म्हणून त्याचीं पंचेद्रियांचीं सुखे अधिकच वाढविलीं आणि विपस्सी त्या सुखात गढून राहिला.

आणि,भिक्षुहो, शेंकडो हजारो वर्षानंतर विपस्सीकुमार पुन्हा उद्यानाकडे जाण्यास निघाला. वाटेंत रोगी, पीडित, फार आजारी, आपल्या मलमुत्रांत लोळणार्‍या, दुसर्‍याकडून उठविला जाणार्‍या आणि इतरांकडून वस्त्रें सावरली जाणार्‍या अशा एका माणसाला पाहून तो सारथ्याला म्हणाला,''याला काय झालें आहे? याचे डोळे काय, की स्वर काय, इतरांसारखा नाही!''

सा.- हा रोगी आहे.
वि.- रोगी म्हणजे काय?
सा.- रोगी म्हणजे या स्थितींत त्याला पूर्वीप्रमाणे वागतां येणें कठीण आहे.
वि.- मित्रा सारथे, याप्रमाणें मीदेखील व्याधिधर्मी आहें काय?
सा.- महाराज, आम्ही सगळेच व्याधिधर्मी आहोंत.
वि.- तर मग, आता उद्यानाकडे जाणें नको; अंत:पुराकडे रथ फिरव.

त्याप्रमाणें सांरथि रथ घेऊन अंत:पुराकडे आला. आणि तेथे विपस्सीकुमार दु:खी व उद्विग्न होऊन विचारांत पडला की, ज्यामुळे व्याधि प्राप्त होते, त्या जन्माला धिक्कार असो!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel