आनंद म्हणाला,'' भदंत, सारिपुत्त आणि मोग्गलान यांजबरोबर आलेल्या भिक्षूंच्या गोष्टी चालल्या आहेत. त्यांच्या राहण्याच्या आणि पात्रचीवरें ठेवण्याच्या जागेसंबधाने गडबड होत आहे.;

भगवंताने आनंदाला पाठवून सारिपुत्त मोग्गलानाल व त्या भिक्षूंना बोलावून आणलें, आणि त्यांनी आपल्याजवळ न राहतां तेथून निघून जावे असा दंड केला. ते सर्व वरमले, आणि बुध्दाला नमस्कार करून तेथून जावयास निघाले. चातुर्मेंतील शाक्य त्या वेळीं आपल्या संस्थागारात कांही कामानिमित्त जमले होते. आजच आलेले भिक्षु परत जात आहेत, हें पाहून त्यांना आश्चर्य वाटलें, आणि ते का जातात यांची त्यांनी विचारपूस केली. बुध्द भगवंताने आम्हास दंड केल्यामुळे आम्ही येथून जात आहोंत, ' असें त्या भिक्षूंनी शाक्यांना सागितलें तेव्हा चातुमेंतील शाक्यांनी त्या भिक्षूस तेथेच राहावयास सांगितलें, आणि बौध्द भगवंताला विनंती करून त्यांना क्षमा करीवली.

धार्मिक संवाद किंवा आर्यमौन

सदोदीत मौन धारण करून राहणारे मुनि बुध्दसमकालीं पुष्कळ होते. मुनि शब्दावरूनचे मौन शब्द साधला आहे. ही तपश्चर्या बुध्दाला पसंत नव्हती. ''अविद्वान् अडाणी मनुष्य मौन धारणाने मुनि होत नाही.''* तथापि कांही प्रसंगीं मौन धारण करणें योग्य आहे, असें भगवंताचें म्हणणें होतें. अरियपरियेसन सुत्तांत (मज्झिमनिकाय नं.२६) भगवान म्हणतो,'' भिक्षुहो, एक तर तुम्ही धार्मिक चर्चा करावी, किंवा आर्य मौन धरावें.''

शांततेचा दाखला

जेव्हा बुध्द भगवान् भिक्षुसंघाला उपदेश करीत नसे, तेव्हा सर्व भिक्षु अत्यंत शांततेने वागत; गडबड मुळीच होत नसे. याचा एक उत्कृष्ट नमुना दीघनिकायांतील सामञ्ञफलसुत्तांत सापडतो. तो प्रसंग असा-
भगवान बुध्द राजगृह येथे जीवक कौमारभृत्याच्या आम्रवनांत मोठया भिक्षुसंघासह राहत होता. त्या समयी कार्तिकी पोर्णिमेच्या रात्रीं अजातशत्रू राजा आपल्या अमात्यांसहवर्तमान प्रासादाच्या वरच्या मजल्यावर बसला होता. तो उद्वारला,'' किती सुंदर रात्र आहे ही! असा कोणी श्रमण किंवा ब्राह्मण येथे आहे काय, की जो आपल्या उपदेशाने आमचें चित्त प्रसन्न करील?'' त्या वेळीं पूरण कस्सप, मक्खलि गोसाल, अजित केसकंबल, पकुध कच्चायन, संजय बेलट्ठपुत्त आणि निगण्ठ नाथपुत्त हे प्रसिध्द श्रमण आपापल्या संघासह राजगृहाच्या आसपास राहत होते. अजातशत्रूच्या अमात्यांनी अनुक्रमें त्याची स्तुति करून त्यांच्या भेटीला जाण्यासंबधाने राजाचें मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु अजातशत्रू कांही न बोलता चुप्प राहीला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel