१८. शाठ्य सदांच साधत नसतें.

(बक जातक नं. ३८)

प्राचीनकाळीं बोधिसत्त्व एका सुंदर तलावाच्या काठीं असलेल्या वृक्षावर वृक्षदेवता होऊन रहात होता. त्या काळीं उन्हाळ्याच्या दिवसांत एका लहानशा तलावांतील पाणी आटत चाललें होतें; आणि त्यांत पुष्कळ मासे रहात असत. तेव्हां एक बगळा त्या तळ्याच्या काठीं येऊन चिंताग्रस्त स्थितींत बसला. तें पाहून तळ्यांतील मासे त्याला म्हणाले, ''हे आर्य, तूं कशाचा विचार करीत आहेस.''

बगळा म्हणाला, ''दुसरा कसला ? मी तुमच्या संबंधानेंच विचार करीत आहे. ह्या तळ्यांतील पाणी दिवसेंदिवस आटत चाललें आहे; खावयाला मिळण्याची मारामार, व उन्हाळा तर भयंकर ! तेव्हां हे बिचारे मासे आतां काय करतील ह्या विचारांत मी पडलों आहे,'' मासे म्हणाले, ''मग ह्यांतून सुटण्याला आम्हांला कोणता उपाय ?'' बगळा म्हणाला, ''जर माझा उपदेश ऐकाल तर तुम्हांपैकीं एकेकाला चोंचींत धरून एका मोठ्या सरोवरांत नेऊन सोडीन.''

पण माशांना ही गोष्ट पटेना. ते म्हणाले,''असें कधी झालें आहे काय ? जगाच्या आरंभापासून माशांवर प्रेम करणारा बगळा कोणी पाहिला आहे काय ? आमच्यापैकीं एकेकाला दूर नेऊन मारून खाण्याचा तुझा हेतु असला पाहिजे.''

बगळा म्हणाला, ''माशांस बगळे मारून खातात हें खरें आहे. परंतु विश्वासघाताचें पातक मी कसें करीन. माझ्यावर तुम्हीं विश्वास ठेवून तरी पहा. आतां दुसरा एकादा उत्तम तलाव नाहीं असे तुम्हांस वाटत असेल, तर माझ्याबरोबर तुमच्यापैकीं एकाद्याला पाठवा म्हणजे त्याला मी तो तलाव दाखवून आणतों. तेव्हां तरी तुमची खात्री होईल.''

माशांनीं खात्री करून घेण्यासाठीं आपणांपैकी एका मोठ्या काण्या माशाला त्याजबरोबर पाठविलें. त्यानें त्या माशाला मोठ्या सरोवरांत नेऊन सोडलें, व पुन्हां पूर्वस्थळी आणून पोहोचविलें. काण्या माशानें आपल्या भाऊबंधांसमोर नवीन तलावाचें रसभरीत वर्णन केलें. तेव्हां सर्व मासें तिकडे जाण्यास उत्सुक होऊन बगळ्यास म्हणाले, ''आर्य, आम्हाला नेऊन त्या ठिकाणीं पोहोंचविण्याची मेहरबानी कर.''

बगळ्यानें प्रथमतः त्या काण्या माशालाच तिकडे नेलें; व त्याला सरोवर दाखवून एका वृक्षाच्या फांद्यांच्या खांचींत दडपून मारून खाल्लें, व कांटे मुळांत टाकले; आणि पुन्हां माशांजवळ जाऊन, ''आपण त्याला सोडून आलों; आतां ज्याची मर्जी असेल त्याला येऊं द्या,'' असें म्हणून आणखी एका माशाला आणून आणखी पूर्वीप्रमाणेंच त्याची गत केली. ह्याप्रमाणें सर्व माशांना त्यानें मारून खाल्लें. एक तेवढा खेंकडा ह्या तळ्यांत शिल्लक राहिला. तेव्हां बगळा त्याला म्हणाला, ''बा खेंकड्या, तूं तरी तेथें कशाला राहातोस ? बाकी सर्व मासे सुखानें मोठ्या सरोवरांत संचार करीत आहेत. व तूं येथें एकटाच ह्या आटत जाणार्‍या डबक्यांत बसला आहेस. तेव्हां चल माझ्या बरोबर. मी तुला त्या सुंदर तलावांत नेऊन पोहोचवितों.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel