आज भारतवर्षात राष्ट्रभावना निर्माण झाली आहे. या भावनेसाठी हिंदुस्थान काय करणार आहे ? या नवीन भावनेस अनुरूप काय काय केले जाईल ? काय केले जाईल याबद्दल वाद नको. हिंदुस्थान या नवीन भावनेसाठी त्याग करणार, सर्वस्व ओतणार. राष्ट्राचे ध्येय एकदा नीट प्रज्वलित होऊ दे, विचारवन्ही नीट पेटू दे, म्हणजे त्यासाठी लागणारा त्याग पुरेपूर पुढे आल्याशिवाय राहणार नाही. राम दिसताच त्याच्याबरोबर मरावयास कोटयावधी वानर तयार होतच असतात. सीता मुक्त करायची आहे व सीता तेथे आहे हे नक्की कळण्याचाच अवकाश असतो. दिव्य व स्पष्ट ध्येय दाखवा म्हणजे त्या ध्येयार्थ त्याग करणारे आपोआप पुढे येतील. जो दिव्य संन्यास, जे दिव्य वैराग्य हिंदुधर्माचे परमोच्च ध्येय आहे, ते ध्येय आपणास हळूहळू गेल्यानेच प्राप्त होईल. प्रथम गावासाठी, मग प्रांतासाठी, मग राष्ट्रासाठी, मग विश्वासाठी अशा रीतीने त्यागविद्यालयात उत्तरोत्तर शिकून गेल्यानेच ते परमोच्च वैराग्य प्राप्त होईल. जो शहरातील म्युनिसिपालिटीचे काम चोख बजावताना नि:स्वार्थ राहील, तोच उद्या राष्ट्राचीही सेवा उत्कृष्ट बजावील. आजचा ग्रामसंन्यासी उद्या राष्ट्राचा संन्यासी होईल. आज ग्रामपंचायतीत उत्कृष्ट काम करणारा उद्या जिल्हा बोर्डात चांगले काम करील. अशा रीतीने उत्तरोत्तर वाढत गेल्याने, ग्रामसेवा, प्रांतसेवा, राष्ट्रसेवा अशा मार्गाने गेल्याने, चित्तशुध्दी होऊन मळ सारा झडून जाईल व मगच ज्ञान, भक्ती किंवा निरपेक्ष कर्मयोग यांच्या द्वारा जीवनात प्रकट होणारा परम संन्यास मनुष्याला प्राप्त होईल.

हा जो आज आत्मोध्दार करावयाचा आहे, राष्ट्रोध्दार करावयाचा आहे, त्याच्यासाठी अनेकांचे त्याग पाहिजे आहेत. आपल्या मुलाबाळांनी मामलेदार, मुन्सफ, वकील, बॅरिस्टर, कलेक्टर व्हावे, अशा आईबापांच्या ज्या आकांक्षा असतात, त्या आईबापांनी सोडून दिल्या पाहिजेत; एकदा सूनमुख बघू दे. नातवंडे खेळवू दे, असल्या इच्छा आईबापांनी फेकून दिल्या पाहिजेत; आपण अधिकारी होऊ, मोटार उडवू, पैसा कमवू, असल्या क्षुद्र इच्छा तरुणांनीही झुगारून दिल्या पाहिजेत; आणि हे नवीन संन्यासी, हे नवीन सेवाव्रती, हे सेवकराम भगवी वस्त्रे परिधान करून हिंडणार नाहीत, ते नाना कामे करतील, ते वर्तमानपत्रे चालवतील, कारखाने काढतील, संघटना काढतील, संस्था स्थापतील, संस्थांचे सभासद करतील; शाळा काढतील मजुरांची संघटना मोठ्या प्रमाणावर कशी करावी, शेतकर्‍याची स्थिती कशाने सुधारेल, शिक्षण कसे असावे, इत्यादी नानाविध राष्ट्रीय प्रश्नांचा रात्रंदिवस विचार करतील, मेहनत घेतील; किंबहुना, कुटुंबातही राहतील परंतु ‘उत्कृष्ट कुटुंबसेवा म्हणजे राष्ट्राचीच खरी सेवा’ या श्रध्देने ती कुटुंबसेवा करतील. त्या कुटुंबसेवेसाठी राष्ट्रहितावर आग ओतणार नाहीत व जेथे कुटुंबसेवा व राष्ट्रहित यांच्यात विरोध येईल त्या वेळेस कुटुंबाचा बळी देतील. कुटुंबही नीट दक्षतेने पाळावयाचे व वाढवावयाचे, परंतु पुढे ते राष्ट्राच्या कामाला यावे यासाठी वाढवावयाचे. वेळ आली म्हणजे कुटुंबाची होळी करावयाची. असा हा नवीन संन्यासी राष्ट्रास अर्पण करता यावे म्हणून लहान चिलयेही वाढवील. हिंदुस्थानच्या वतीने कुटुंबाची सेवा तो करीत राहील. कुटुंबासाठी म्हणून कुटुंबाची सेवा नाही, तर राष्ट्रासाठी म्हणून कुटुंबसेवा अशा अर्थाने व वृत्तीने कुटुंबातही राहतील, कुटुंबीही होतील.

श्रीगीता सांगते, “ज्याला भय नाही व इच्छा नाही असा जो निरिच्छ, नि:स्पृह, निर्भय पुरुष, तोच संन्यासी.” संन्याशाच्या वेशाने नटलेला, गेरूचा रंग दिलेला, भगवा पोषाख केलेला नव्हे; तर अंतरी त्यागाने रंगलेला संन्यासी वेषाचा नव्हे, तर संन्यस्तवृत्तीचा. ज्याला भय नाही. आशा-कामना नाहीत; जरूर पडली तर समाजासाठी पोराबाळांची उपासमार जो उघड्या डोळ्यांनी पाहील; आपल्या आजच्या पराजयांतूनही भावी पिढीला दिव्य विजय मिळेल या आशेने व श्रध्देने आजचे पराजयही स्वीकारावयास सज्ज असलेला; स्वत:च्या कामावाचून दुसरे ज्याला घर नाही; नि:स्वार्थ हेतूशिवाय अन्य ज्याची मालमत्ता नाही; जे ध्येय त्याला स्वत:ला दिसत असते व ज्याच्यासाठी तो स्वत:चे रक्त सांडीत असतो, जिवाचे रान करीत असतो, ‘ते ध्येय माझ्या इतर बंधूंच्याही दृष्टिपथात मी आणीन, त्यांनाही ते अनुभवयास व पूजावयास लावीन,’ या विचाराशिवाय, या आशेशिवाय ज्याला अन्य कसली आशा नसते; असे संन्यस्त वृत्तीचे तरुण आजच्या छात्रवृंदात, तरुणांत दिसू लागले आहेत. या तरुणांना, त्यांच्या आईबापांना, त्यांच्या आप्तमित्रांना आम्ही असे सांगण्याचे धाडस करितो की, “जी उदात्त ध्येये, ज्या थोर आशा, जी महनीय व स्पृहणीय स्वप्ने तरुणांच्या हृदयात आज उसळत आहेत व दृष्टीस दिसत आहेत; त्यांना खोटी मानू नका; तो भ्रम समजू नका. त्या स्वप्नांसाठी सर्वस्व पणास लावा. स्वत:वर श्रध्दा ठेवा. पुढे येणार्‍या पिढीवर श्रध्दा ठेवा. पुढील पिढी तुमचे काम पुढे चालवील, ही खात्री बाळगा. मनात उचंबळणार्‍या ह्या उदात्त भावना खर्‍या माना व त्यांच्यासाठी सर्व अर्पण करा, प्राण द्या. व्हा, पुढे व्हा. हं ! चला पुढे चला. जेवढे दिसते आहे, तेथे पाऊल भक्कम रोवा त्याच्या पुढच्या पावलासाठी मातेवर विश्वास ठेवा. जो नवभारत आज निर्माण व्हावयाचा आहे तो तुमच्या हृदयांमधून, मनोवृत्तींतून, जीवनातून, प्रयत्नांतून, उद्योगांतूनच, स्वप्नांतून, ध्येयांतून निर्माण व्हावयाचा आहे. तो नवभारत आज तुम्हांला दिसत नसताही, त्या दूर दिसणार्‍या ध्येयरूप भारतासाठी आशेने व श्रध्देने श्रम करणारे व मरावयासही सिध्द होणारे जे तुम्ही- ते धन्य आहात ! म्हणा ‘भारत माता की जय !’ , ‘म्हणा वंदे मातरम् !’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel