प्रत्येक विचारात, प्रत्येक कृतीत केवळ चांगुलपणा असून भागत नाही. चांगुलपणा तर पाहिजेच, परंतु तो तो विचार व ती ती कृती ही योग्यही असली पाहिजेत. आपण केवळ चांगले आहोत, सुस्वभावी आहोत, एवढ्याने भागत नाही. आपण कार्यक्षम आहोत की नाही, कार्याला लायक व समर्थ आहोत की नाही, हेही पाहिले पाहिजे. “मी जे करीन, जे जे बोलेन, ते योग्यच करीन, ते योग्यच असेल.” असे सनातन श्रध्देचे ध्येय असते. हिंदु धर्माची इतर गोंष्टीबरोबर अशी ही एक निक्षून आज्ञा आहे की, अर्धवट काहीही नको. अर्धवटपणा हा हानिकारक आहे. विचार असो, ज्ञान असो. त्याला परिपक्व करा. बुध्दीची पूर्ण वाढ करा, तिचा चांगला विकास करा. प्रार्थनेइतकेच ज्ञानही पवित्र आहे. पावित्र्य व ज्ञान यांमुळे पात्रता येते. केवळ चांगुलपणामुळेच पात्रता येत नाही, केवळ ज्ञानानेही ती येत नाही. हृदय व बुध्दी दोघांच्या संयुक्त विकासात पात्रतेचा जन्म होत असतो.

जगात एक हिंदुधर्मच असा आहे की, ज्याचे सत्याजवळ भांडण नाही मग ते सत्य प्रयोगशाळेत दिसलेले असो वा तपोवनात स्फुरलेले असो. ज्ञान कोठेही मिळो, कुठलेही असो, ते पवित्रच आहे. दुसरे धर्म प्रयोगशाळेतील सत्याला लाजत खाजत जवळ घेतील, परंतु हिंदुधर्म ती आवश्यक गोष्ट म्हणून सांगत आहे. गायत्रीमंत्र म्हणजे काय ? खोल झर्‍यामधून जसे स्वच्छ पाणी उसळत असते, त्याप्रमाणे सद्गुरुची, ऋषीची, विचारद्रष्टयाची दृष्टी असली पाहिजे, असे हिंदुधर्म सांगत आहे.

परंतु अरेरे ! हिंदुस्थानात सत्याला विरोध नसल्यामुळेच सत्य मेले ! सत्यावर कोणी हल्ले चढविले नाहीत, म्हणूनच सत्यसंशोधनाची वृत्ती मेली ! सत्याचा वटवृक्ष झगडयांतूनच फोफावतो. युरोपमध्ये मोठमोठे शास्त्रज्ञ, मोठेमोठे गाढे पंडित, त्या त्या शास्त्रात आजन्म संशोधन करणारे संशोधक किती तरी आहेत. हिंदुस्थानात बोटांवर मोजण्याइतके तरी आहेत का ? परंतु दोन्ही ठिकाणचा फरक पहा, युरोपमध्ये चार्लिस डार्विनवर वीस वर्षे सारी भटभिक्षुक मंडळी, सारे पाद्री सारखे भुंकत असत. केवळ पाद्रीच नाहीत, तर इतरही लोक टीकांचा पाऊस पाडीत होते, त्याला चावावयास बघत होते. आज या घटकेसही एखादा धर्मोदेशक व्यासपीठावरून बकल व लेकी यांच्यासारख्या महापंडीतांवर ताशेरा झाडीत असेल. बंधने न मानणारा इतिहासकार व टीकाकार, बंधने न मानणारा शास्त्रसंशोधक हे आपल्या मार्गांतील शत्रू आहेत, आपल्या कार्याला मारक आहेत असे प्रत्येक पंड्या-बडव्यास वाटत असते. मनातल्या मनात तो जळफळत असतो.

युरोपमध्ये सत्यावर हल्ले चढविले गेल्यामुळेच सत्याच्या संरक्षणासाठी नवजवान एकत्र येऊ लागले, ‘सत्याच्या झेंड्याखाली जमा’ अशी एकच गर्जना करण्यात आली. रिडले व लॅटिमर जिवंत जळले जात असताना म्हणाले, “आज आपण अशी मेणबत्ती पेटवू की, जी कधीही विझणार नाही.” ते मेले, परंतु सत्याचा प्रकाश वाढतच गेला, शास्त्रे वाढतच गेली. “पुढील अटीवर तह करता येईल; कबूल असतील तर शरण या.” असा निरोप हसन व हुसेन यांच्याकडे शत्रुपक्षाकडून एका सरदाराबरोबर पाठविण्यात आला. त्या सरदाराबरोबर आणखी तेहतीस शिपाई होते. तो निरोप व त्या अटी हसन-हुसेनास कळविल्यानंतर, ते पहिले कर्तव्य बजाविल्यानंतर, तो सरदार आपल्या तेहतीस अनुयायांसह वर्तमान हसन हुसेनांच्या झेंड्याखाली येऊन उभा राहिला. ते त्यांना येऊन मिळाले. उघड उघड मरणच पत्करणे ते होते, तरी त्यांनी पर्वा केली नाही. सर्व काळात हा एकच अनुभव दिसून येईल. सत्यच आपला आपण प्रचार करीत असते. त्याला ताशेनौबती वाजवाव्या लागत नाहीत. सत्याचा सूर्य दुसर्‍यावर विसंबत नाही. सत्यदेवाचा दरवाजा सदैव उघडा आहे. वाटेल त्या व्यक्तीने तेथे जावे व सत्याची पूजा करावी. जे आपणास सत्य म्हणून वाटते, त्याला आपण कसे सोडू ? त्याला आपण मिठीच मारणार, त्याला आलिंगन देणार- मग फासावर जावे लागो की जिवंत जाळून घ्यावे लागो. काहीही नशिबी असो. हाल, छळ, अपमान, यातना. मरण-सर्वांसाठी सत्यपूजकाची व सत्यसंशोधकाची तयारी असली पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel