ही मातृपूजा म्हणजे वीरांचा निर्भय वेदांत आहे. माता म्हणजे सर्वस्व, माता हीच आदिशक्ती, मूळ कारण. माता म्हणजेच अनंत शक्ती, अनंत ज्ञान. अशा या शक्तीशी एकरूप होणे म्हणजे समाधी. स्वत:ला पुसून टाकून स्वत:चे व्यक्तित्व विसरून, केवळ निरहंकारी होऊनच त्या दिव्य दृष्टीचा, त्या महान अनुभवाचा लाभ होणे शक्य आहे. श्रुती सांगते, “जेव्हा वासना मरते, सर्व संशय जेव्हा नष्ट होतात, सर्व वृत्ती जेव्हा विरून जातात, तेव्हाच मर्त्य अमर्त्य होतो, जीव शिव होतो.”

ज्याची शक्ती आपल्या शक्तीपेक्षा फारच मोठी असते, त्याचा आपण तिरस्कार करतो, बहुधा आपण त्याच्यावर प्रेम करीत नाही. नायगारा धबधब्याजवळील एका गुहेत एक बाई चुकून मागे राहिली. ती बाई परत आल्यावर सांगे, ‘त्या धबधब्याची प्रचंड गर्जना ऐकून मला त्याचा तिरस्कार वाटे, तिटकारा येई’  हा तिरस्कार म्हणजे तिच्या मनातील भीतीचेच ते प्रत्यक्ष सक्रिय स्वरूप होय. भीतीचे तिरस्कारात रूपांतर होते. मोठा पुरूष जवळ असला म्हणजे आपली पूजा येथे कशी होईल, अशी छोटयाला भीती वाटते. अशा भीतीतच अहंतेचा जन्म होतो. मध्यरात्रीचे आकाश आपणास फार सुंदर वाटते. कारण लाखो लहान लहान तारका तेथे लुकलुक करीत असतात, परंतु आपणास जर आकाशात जाता आले व त्या लहान तारकांऐवजी कोट्यवधी प्रचंड जळते गोल आपल्याभोवती जर दिसले, तर आपण त्यांचा मनात तिरस्कार करू. कारण त्या प्रचंड विराट समूहात आपण म्हणजे कोणीच नाही, असे आपणास वाटेल. आपला अहंकार दुखविला जाईल. कळत वा न कळत आपण पावलोपावली सभोवतालच्या चराचर जगाची स्वत:शी तुलना करीत असतो. त्या तुलनेत आपण जर मोठे ठरलो तर आपणास आनंद होतो, गुदगुदल्या होतात, तोंडावर हास्य खेळते. परंतु त्या तुलनेत जर आपण फारच कमी पडतो, हिणकस ठरतो असे दिसले, तर आपण चिडखोर, त्रासिक व तिरस्कार करणारे-थोडक्यात माणूसघाणे होतो. आपल्या सार्‍या भावनांचा उगम या तुलनेपासूनच होत असतो. ही तुलना आपले जीवन रंगवीत असते. आणि या तुलनेचा जन्म आपल्या अहंपूजेत असतो. जगात साक्षी होऊन राहण्यात जो दिव्य आनंद आहे, तो फारच थोड्या भाग्यवंतांना लाभत असतो व आईशी एकरूप होण्यातील, आईशी चिरयुक्त होण्यातील तो परमानंद चाखणारा तर या जगात नाहीच कोणी म्हणाना.

परंतु ज्यांना हा दिव्य आनंद चाखावयाचा आहे, त्यांनी मरणाचे उपासक झाले पाहिजे. दु:खाचा भरलेला पेला पटकन् पिऊन रिकामा करून तो मातेपुढे करा व म्हणा, “और लाव.”  बलवंताला माघार माहीत नसते. शूराला दु:खाची दरकार नसते, निश्चयी व निर्मळ नरसिंहाला निराशा कधी शिवत नाही, पश्चाताप करण्याची कधी पाळी येत नाही. काव्यांतून ज्या निराशेची वर्णने येतात, ती निराशा सामर्थ्यसंभव नसते, ती निराशा अहंकारोध्दव असते. आपणाला ज्या क्षणी अहंकार घेरतो, ज्या क्षणी स्वत:ची जाणीव होते, त्या क्षणीच आपण दुबळे आहोत असे आपणांस वाटू लागते. आपण एकटे आहोत, असे वाटू लागते. कारण आईपासून आपण त्या क्षणी दूर झालेले असतो. स्वत:ची स्मृती होताच माता दुरावते व आपणास आपला दुबळेपणा व अगतिकत्व यांची जाणीव होते. वीराला स्वत:ची जाणीवच नसते. स्वत:ची शुध्दच नसते. त्याचे देहभान हरपते. कड्यावरून बेधडक उड्या घेत सागराकडे जाणे एवढेच नदीला माहीत असते. स्वत:च्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या तरी तिला पर्वा नसते. पुढे काटे आहेत का दरी आहे काहीही ती पाहत नाही. वीराचे तसेच नाही. काटे असोत वा फुले असोत, तो आपल्याच नादात असतो. सारे तुडवीत पुढे जातो. फुलांना कवटाळण्यासाठी धावत नाही, काटे पाहून रडत बसत नाही. मार्गामधील सर्व द्वंद्वांना काटीत छाटीत तो पुढेच जातो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel