आपण आपल्या मित्रांच्या डोळ्यांसमोरही उदात्त ध्येय ठेवले पाहिजे. आपणच फक्त उदात्त ध्येयाचे पूजक न बनता आपल्या मित्रांनाही केले पाहिजे. क्षुद्र गोष्टीत रंगणार्‍यांची संगत नका. संन्यासी असो वा गृहस्थ असो- मनुष्याने धुतल्या तांदळाप्रमाणे राहण्याची खटपट केली पाहिजे. उदात्त जीवनाची पूजा त्याने चालविली पाहिजे. ब्राह्मण असो वा शूद्र असो; प्रत्येकाने स्वाभिमानी राहून दुसर्‍यासही स्वाभिमानी राहावयास शिकविले पाहिजे. स्वत:ची मान वर ठेवून इतरांची मान वर राहील, स्वत:च्या दुबळेपणामुळे आणि समाजाच्या उर्मटपणामुळे व अनियंत्रितपणामुळे ती खाली होणार नाही म्हणून झटले पाहिजे. दुसर्‍यास पशूसमान जेथे लेखले जाते, तेथे कोणाचेही हित करता येत नसते. आपल्या औदासीन्याने आपल्या जवळच्या बंधूस पशुस्थितीत जर आपण राहू दिले, त्यास पशूप्रमाणे इतर वागवीत आहेत हे जर उघड्या डोळ्यांनी पाहून, त्वेषाने आपण उठलो नाही, तर आपण काय पराक्रम करणार, कोणती सेवा करणार ?

शाळेमध्ये त्या त्या वर्गात शिकविण्यासाठी क्रमिक पुस्तके तयार केलेली असतात. परंतु त्या सर्व पुस्तकांमिळून शिक्षण पुरे होत असते. प्रत्येक धड्याला महत्त्व आहे. प्रत्येक धड्याकडे शाळेचे चालक लक्ष देतात. संस्कृतीचेही तसेच आहे. उद्योगधंद्यांतील माणसाची सचोटी संन्याशाच्या वैराग्याइतकीच पवित्र वस्तू आहे. संन्याशाचा त्याग प्रभुचरणावर अर्पण करण्यास जितका योग्य, तितकीच व्यापार्‍याची ती सचोटीही योग्य आहे. जगात प्रामाणिक सांसारिक नसतील, प्रामाणिक कर्मयोगी नसतील, तर खरा संन्यास टिकणार नाही. उत्कृष्ट प्रपंच असेल तरच संन्याससंस्था टिकेल, नाही तर तिचा अध:पात होईल व ती धुळीस मिळेल. संन्यासाचे महत्त्व ज्याला वाटत असेल, त्याने आधी समाज सुसंघटित व संपन्न आहे की नाही हे पाहिले पाहिजे.

व्यावहारिक अशा गोष्टीचे महत्त्व आज हिंदुधर्माने ओळखले पाहिजे. फार व्यापक न होता आज जरा कमी व्यापक व्हावयास शिकले पाहिजे. मोक्षनगराकडे डोळे न लावता पायाजवळच्या दीन संसाराकडे पाहिले पाहिजे. विरूध्द वाटणार्‍या अशा ध्येयांचा आज हिंदुधर्माने समन्वय केला पाहिजे. नवविकासाला अनुरूप व अनुकूल असे विचारखाद्य आपल्या अपार भांडारगृहांतून हिंदुधर्माने पुरविले पाहिजे, काढले पाहिजे, वाढले पाहिजे. व्यवहारातील जीवन व्यवहारांशी जोडले जाऊ दे. अति अ-कर्मी अतिकर्माशी मिळू दे. संन्यास व कर्मयोग यांचा योग्य सहकार होऊ दे. कर्मयोगाच्या निरोगी व सुंदर झाडाला संन्यासाचे फळ येते. कर्मयोगाच्या खांद्यावर संन्यास उभा असतो. जेथे उत्कृष्ट कर्मयोग नाही, तेथे संन्यास पडेल, मरेल. संन्यास व कर्मयोग यांच्या परस्पर मर्यादा नीट ठरल्या पाहिजेत; यांचे परस्पर संबंध नीट जोडले पाहिजेत, ओळखले पाहिजेत. रानावनातील संन्याशालाच मोक्ष मिळतो असे नाही, तर घरात दळणकांडण करणारी, सर्वांची सेवाचाकरी करणारी जी कष्टमूर्ती स्त्री तिला किंवा शहरातील खाटिक सजन कसाई त्यालाही मोक्षाचा तितकाच अधिकार असतो व तो मोक्ष त्यांना मिळतोही, मिळालाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel