श्रीरामकृष्ण दोन शेतकर्‍यांची गोष्ट सांगत. एक-दोन वर्षे पीक नीट आले नाही; दुष्काळच पडला, म्हणून एका पांढरपेशा शेतकर्‍याने शेती करणेच सोडून दिले. त्याची शेते ओसाड पडली. परंतु दुसरा जो खरा हाडाचा शेतकरी होता, त्याने तिसर्‍या वर्षीही जमीन नीट नांगरून ठेवली. खत वगैरे घालून तयार करून ठेवली. तो म्हणे, “पाऊस येवो वा न येवो, पीक मिळो वा न मिळो, माझ्या हातात जेवढे आहे तेवढे मी करून ठेवले पाहिजे. मी अंगचोरपणा केला, कुचराई केली, असे होता कामा नये.”  या दुसर्‍या शेतकर्‍याप्रमाणे, या खर्‍या कर्मयोगी ध्येयवाद्याप्रमाणे आपण सर्वांनी वागले पाहिजे. आपले काम कितीही लहान व क्षुद्र का असेना- परंतु भावना ही वरच्याप्रमाणे पाहिजे. पुन: पुन:, पुन: पुन: अश्रांत श्रम केले पाहिजेत. ‘फिरून यत्न करून पहा’ हे आपले ब्रीदवाक्य असले पाहिजे. मरेपर्यंत धडपडू. धडपडीतच जीवनाची शेवटची पूर्णाहुती पडू दे. फुटलेल्या गलबतांतून समुद्रात पडलेला मनुष्य दूर जमीन दिसताना, तिला गाठण्यासाठी जसा लाटांतून सारखा अदम्यपणे पुढे जात राहील किंवा वरती उंच चमकणारे बर्फाच्छादित शिखर पाहून पर्वत चढणारा जसा सारखा चढत राहील- त्याप्रमाणे आपणही आपल्या लहान- मोठ्या गोष्टींत परतीर गाठण्याची, वरचे टोक गाठण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

स्कॉटलंडमधील हुशार व व्यवहारचतुर लहान लहान दुकानदारांच्या मधूनच आजचे सर्व जगाशी व्यापार करणारे कोटयावधी व्यापारी निर्माण झाले आहेत. त्या छोटया व्यापार्‍यांतूनच ऍडम स्मिथ याचा राष्ट्राची संपत्ती हा अर्थशास्त्रावरील ग्रंथ निर्माण झाला. साध्या व लहानसान गोष्टींतच मोठ्या गोष्टींची बीजे असतात. आपापली लहान लहान कामे नीट मन लावून करणारे लाखो लोक जेथे असतात, तेथेच महाकाव्ये लिहिणारे कवी, महान् शास्त्रे शोधणारे शास्त्रज्ञ, नवविचार देणारे ऋषी जन्मास येत असतात. राष्ट्रातील सर्व लहान माणसांनी आपल्या कामात उत्कृष्टता प्रकट करावी, म्हणजे सारे राष्ट्र मोठे होईल. ‘जे जे तुझ्या हातात करता येण्यासारखे असेल ते कर, त्यात आत्मा ओतून ते कर. तुझे कमळ तू फुलव.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel