तथापि काही काही गोष्टी अगदी स्पष्ट आहेत व त्या ध्यानात धरणे अगत्याचे आहे. ज्या देशांनी आतापर्यंत त्यागाच्या तत्त्वाज्ञानाचा- त्यागाच्या धर्माचा उपदेश केला, ‘दारिद्रय पत्करा, दीनदरिद्र्याची सेवा करा, नम्र व्हा, अहंकार सोडा, सर्वांनी सामुदायिक उपभोग घ्या, भावाभावांप्रमाणे वागून बंधूभाव वाढवा’ असा उपदेश केला, तीच राष्ट्रे जर एकाएकी दुसर्‍यांची रीतसर उघड उघड लूट करू लागली, राजकीय, व्यापारी व आर्थिकदृष्ट्या दुसर्‍यांना कायदेशीर गुलाम करू लागली, तर त्या वेळेस आपण डोळे उघडून व कान टवकारून नीट विचार केला पाहिजे. आचार व उच्चार यांच्यामध्ये जेथे उघड उघड विरोध दिसून येतो, धर्म एक व कर्म निराळेच असे जेव्हा दिसते, तेव्हा आपण उठून बसले पाहिजे व काय प्रकार आहे ते स्पष्ट सांगितले पाहिजे, जाहिर केले पाहिजे.

केवळ एखादे मोठे नीतितत्त्व आपल्याजवळ आहे एवढ्याने काम भागत नसते. घरात अन्न पुष्कळ आहे परंतु आपण जर खात नसू व आपणांस जर ते पचत नसेल किंवा रूचत नसेल तर त्या अन्नाचा काय उपयोग ? मोठमोठे मोह जेव्हा समोर उभे असतात, अशा वेळी महान् नीतितत्त्वाचे शब्दोच्चार आपला बचाव करू शकणार नाहीत. आपले नीतितत्त्व बरोबर असो की चुकीचे असो- या तत्त्वांशी आपला स्वभाव किती मिळून गेला आहे, ते तत्त्व आपल्या जीवनात किती उतरले आहे, त्या तत्त्वाकडे आपला किती आंतरिक ओढा आहे- ही गोष्ट महत्त्वाची आहे. धर्म जर राष्ट्राच्या रोमरोमी भरलेला नसेल, तो रक्तात एकजीव झालेला नसेल, स्वार्थाचे प्रसंग येताच, मोहक आसक्तीचे प्रसंग येताच, ते धर्माचे पांघरुण बिनदिक्कत फेकून देऊन, त्या स्वार्थाला व त्या मोहाला आपण धावत जाऊन मिठी मारू ! हाच संस्कृतीचा र्‍हास, हाच धर्माचा पराजय. जे वेळी उपयोगी पडत नाही, ते असून नसल्यासारखे आहे.

अशा वेळी दुसरीही एक गोष्ट लक्षात येते व ती म्हणजे निरनिराळ्या धर्मांतील विचारांच्या मर्यादा, बुध्दीच्या मर्यादा ही होय. ज्या धार्मिक आज्ञांशी, ज्या धार्मिक विचारांशी व नीतितत्त्वांशी आपल्या बुध्दीचा यत्किंचितही विरोध येत नाही, ज्यांना आपली बुध्दी कुरकुर न करता संमती देऊ शकते, तोच धर्म आपणास लगाम घालू शकतो, आपणास मोहापासून आवरू शकतो; आणि याच्या उलट, जो धर्म आजीबाईंच्या गोष्टींप्रमाणे आपणास केवळ भोळसटपणा व पोरकटपणा वाटतो, तो धर्म आपल्या आचारविचारांवर कधीही हुकमत चालवू शकणार नाही. म्हणून धर्म हा सदैव बुध्दीच्या कसोटीला टिकला पाहिजे. जो धर्म अशा रीतीने टिकतो, त्याचे महत्त्व किती आहे ते सांगण्याची जरूरी नाही. तो धर्म मनुष्याच्या जीवनावर सत्ता गाजवीलच गाजवील. ख्रिस्ती धर्म बौध्दिक कसोटीत न टिकल्यामुळे या विसाव्या शतकात त्याचे वास्तविक महत्त्व उरले नाही. शास्त्राने, विज्ञानाने नानाप्रकारचे शोध लावून ख्रिस्ती लोकांसाठी नवीन जग निर्माण केले आहे, नवीन संसार थाटून दिला आहे. परंतु याच विज्ञानाने जीवनाला वळण देणार्‍या बंधुप्रेम, दीनसेवा, दारिद्र्यातील भाग्य, सामुदायिक समान उपभोग इत्यादी गोष्टी शिकविणार्‍या ख्रिस्ती धर्माला गचांडी दिली आहे. ख्रिस्ती धर्माशिवाय असणारा ख्रिश्चन म्हणजे पिस्तुल, बंदुक व बाँब घेऊन जगाला लुटणारा खुनी डाकूच होण्याचा संभव आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel