वेदपुरुष : विचार तुमच्या राष्ट्रांत मेलेला आहे. वृत्तापत्रें, साप्ताहिकें या गोष्टीकडे कधीं लक्ष देत नसतात. चिवडे, चिरूट, चहा, चिमटे, चर्चा हेंच त्यांतून येत असतें. राष्ट्र धुळीस मिळत आहे इकडे त्यांचे लक्ष नसतें. एका वर्षांत पांच पांचदा परीक्षा घेऊन लाखों रुपये उकळण्याचें अमानुष काम विद्यापीठें करीत आहेत. परंतु कोण हांक फोडून उठतो! कोण पेटतो, कोण जळतो ?

वसंता : मुलांनीं तरी पुन:पुन्हा परीक्षेस कां बसावें ?

वेदपुरुष : अगतिक मुले काय करतील ? आशा कुणाला सुटली आहे का ? दारूचे गुत्तो घालून दारू बंद होत नसते. गुत्तो घातलेत कीं लोक यांवयाचेच! तुम्हीं परिक्षा पुन:पुन्हा ठेवलयात तर मुलें येणारच. परंतु चार चार पांच पांच वेळां नापांस होणार्‍या मुलाच्या जीवनांत शेवटीं किती निराशा, केवढा अंधार भरलेला असेल ?

वसंता : दहादहा हजार विद्यार्थ्यांतून दोन हजारहि मुलें पास होत नाहीत, याचा अर्थ काय ? हिदुस्थानांत बुध्दि उरलींच नाहीं का ?

वेदपुरुष : याला अनेक कारणें आहेत. पोटभर खायला मिळत नाहीं; स्मृति त्यामुळे तेजस्वी रहात नाहीं. परंतु मुख्य कारण म्हणजे इंग्रजींतून शिक्षण! आणि इंग्रजीला महत्त्व! इंग्रजीला म्हणें शेंकडा चाळीस मार्क पाहिजेत, मराठीमध्यें तीसपस्तीस पुरेत! असला चावटपणा जगांत कोठें असेल का ? शाळा तपासणारे येतात, ते मुलांना अमुक उच्चार चूक, तमुक उच्चार चूक असें म्हणून सतावतात. शाळेला शेरा देतात ''इंग्रजी नीट शिकविलें जात नाहीं !'' काय ही हमाली व गुलामी! परंतु तुम्हांला चीड येत नाही !

वसंता : मराठी विद्यापीठ स्थापण्यासाठीं प्रयत्न होत आहेत.

वेदपुरुष : या प्रयत्‍नांना कोण विचारतो ? दरवर्षी महाराष्ट्रांत हजारों मुंजी लागतात. परंतु मुलाला मायभाषेंतून ज्ञान मिळण्याची सोय आहे कीं नाहीं कोणी पहात नाहीं. मुलाची खरीखुरी मुंज करणारा आधीं मराठी विद्यापीठाला मदत करील. गायत्री मंत्र मुलाला देऊन बाकीचा सारा होणारा खर्च त्यानें त्या मराठी विद्यापीठास द्यावा. एखाद्या ज्ञानमंदिरात मुलाला उभें करावें. सभोंवतीं ज्ञानांत भर घालणार्‍या महर्षीचीं चित्रें असावींत. एखाद्या थोर आचार्याला बोलवावें. त्यानें मुलाला म्हणावें, ''बाळ, आजपासून या ज्ञानमंदिरांत तूं प्रवेश करीत आहेस. तूं ज्ञान मिळव, नवीन ज्ञान जगाला दे. ज्ञान जीवनांत आण !'' झाली मुंज, पित्यानें तेथें शक्तीप्रमाणें ज्ञानप्रसाराला देणगी द्यावी. हजारों मुंजी लागत आहेत, परंतु ज्ञान मरत आहे. कारण स्वभाषेचें विद्यापीठ नाहीं, त्याला मदत नाहीं, देणगी नाहीं !

वसंता : ते इंग्रजी शब्द घोकतां घोकतां मुलें कंटाळतात !

वेदपुरुष : अरे कंटाळून आत्महत्या करितात! इंग्रजींत मिळतात तीन मार्क! मग बाप रागावतो, मास्तर रागावतात, हुशार मुलें हंसतात, त्रस्त झालेला मुलगा विहिरींत उडी घेतो !

वसंता : किती शोकजनक स्थिति !

वेदपुरुष : मागें पुण्याला एक गृहस्थ होते. ते होते डॉक्टर. त्यांचा मुलगा पुस्तकी ज्ञानांत होता ढ. त्याला इंग्रजींत तीन मार्क मिळत. इंग्रजींतून घातलेल्या गणितांच्या प्रश्नांचा त्याला अर्थच समजत नसे. तो नेहमी नापास होई. शेवटीं त्यानें अफू खाऊन आत्महत्या केली! सोन्यामारुतींची अशी ही हत्या होत आहे! देहापेक्षां मनाचें मोल अधिक! भारतांतील लाखों मनें मारलीं जात आहेत.

वसंता
: शाळेंतील विषयांतहि प्रत्यक्ष जीवनाशीं कधींच संबंध येत नाहीं. जवळच्या नदीचें नांव माहीत नसतें, परंतु अमेरिकेंतील नद्यांची लांबीरूंदी पाठ!

वेदपुरुष : देशांतील जिवंत महापुरुषांचीं नांवें माहीत नसतात, परंतु तैमूरलंग व आठवा हेन्‍री यांची नावें मुलें विसरत नाहींत! अकबराची कारकीर्दं शिकवतात, परंतु महात्माजींची वा जवाहरलालजींची कारकीर्द शिकवण्यांत येत नसते. एवढेंच नव्हे तर यांची नांवे उच्चारण्याचीहि भीति असते. तीं नावें उच्चारली तर सार्‍या प्रचंड दगडी इमारती गडप होतील असें सर्वांस वाटतें!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel