२६ जानेवारी स्वातंत्र्यदिन    ३०

आपली तुरुंगाची भीति गेली आतां मरणाची दवडूं या.

-- देशबंधु दास

ज्या एका शब्दानें कोटयवधि लोकांची हृदयें उचंबळतील असा कोणता बरें शब्द?  ज्या शब्दांसाठीं आजपर्यंत अनंत लोकांनी अमोल अशी स्वत:ची जीवनें हंसत हंसत अर्पण केलीं, तो कोणता बरें शब्द?  कोणत्या शब्दासाठी अशी कुर्बानी झाली, असें बलिदान झालें? कोणत्या शब्दासाठीं भविष्यकाळींहि असेच लाखों संसारांचे होम होतील?  तो शब्द म्हणजे स्वातंत्र्य.

स्वातंत्र्य कोणाला नको?  पशुपक्ष्यांनाहि स्वातंत्र्य आवडतें.  झाडें-माडेंहि स्वातंत्र्य इच्छितात.  दुस-याच्या छायेंत शेतें-भातें पिकत नाहींत, झाडेंमाडें फुलत फळत नाहींत.   स्वातंत्र्याशिवाय सुख नाहीं, विकास नाहीं, आत्म्याची भेट नाहीं.  स्वातंत्र्य, स्वातंत्र्य!  कोठें आहेतें स्वातंत्र्य? जगांत अद्याप खरें स्वातंत्र्य नाहीं.  ज्या वेळेस एक राष्ट्र दुस-याची, एक जात दुस-या जातीची, एक समाज दुस-या समाजाची,  एक वर्ग दुस-या वर्गाची जेव्हां पिळणूक करणार नाहीं, तेव्हां स्वातंत्र्याची प्रभात येईल. जेव्हां एक राष्ट्र दुस-या पिळवणूक करणा-या राष्ट्रांस कसलेंहि सहकार्य देणार नाहीं तेव्हां खरें स्वातंत्र्य येईल.  आज इंग्लंड स्वातंत्र्याचे अभिमानी नाहीं, कारण त्यानें ३५ कोटींना गुलाम ठेवलें आहे.  आज फ्रान्स स्वातंत्र्यप्रिय नाहीं.  कारण हिंदी राष्ट्राला गुलाम करणा-या इंग्लंडचें तें दोस्त आहे.  आज अमेरिका स्वातंत्र्यभक्त नाहीं;

चीनवर हल्ले करण्यासाठीं जपानला अमेरिका युध्दसामुग्री विकते.  इटली, जर्मनी यांनाहि दुस-याच्या वसाहती पाहिजे आहेत;  म्हणजे स्वत:साठीं दुस-याची पिळवणूक करावयाची आहें.  खरें स्वातंत्र्य अद्याप जन्मावयाचें आहे.

त्या स्वातंत्र्याचा जन्म कदाचित् पुरातन भारतवर्षांत होईल.  त्यासाठीं महान् भारत अद्याप उभा आहे.  जगाचे स्वातंत्र्याचे प्रयोग पाहून त्यांतून सार घेऊन, त्यांतून धडे घेऊन, भारत एक अभिनव प्रयोग करीत आहे.  हिंदुस्थान स्वतंत्र होऊ पहात आहे.  परंतु दुस-याला गुलाम करण्यासाठीं नाहीं.  जगांतील सारीं राष्ट्रें सुखाने नांदावींत, जगांत सर्वत्र सर्वांना विकासास अवकाश असावा असें भारत मानतो.  हा स्वातंत्र्याचा लढाहि अनत्याचारी मार्गांने हिंदी जनता लढत आहे. भारताची मान नम्र अभिमानानें आज उंच आहे.  हिमालयाप्रमाणें तो धैर्यानें उभा आहे, सागराप्रमाणें नव आशेनें उचंबळत आहे.

महात्मा गांधींसारखा युगपुरुष मिळाला आहे. भगवान् आद्य शंकराचार्यांनी तीन वस्तू दुर्लभ म्हणून सांगितल्या आहेत.  मनुष्यत्व, मुमुक्षुत्व व महापुरुषसंश्रय.  मनुष्य जन्म मिळणें कठीण, मुक्त होण्याची उत्कंठा लागणे दुर्मिळ व मुक्त होण्याचा मार्ग दाखविणारा महापुरुष भेटणें त्याहून कठीण.  परन्तु आज या तीन गोष्टी आपणांजवळ आहेत.  आपण निर्भय व स्वाभिमानी होऊन माणसें बनत आहोंत.  स्वातंत्र्य होण्याची तळमळ आपणां सर्वांस लागली आहे.  आणि स्वातंत्र्याचा पंथ दाखविण्यासाठीं सत्यावर, प्रेमावर, संयमावर, श्रध्देवर उभा राहणारा महात्मा लाभला आहे.  त्या महात्म्याच्या मार्गदर्शकत्वाखालीं आपण २० वर्षे अंधारांतून प्रकाशाकडे जात आहोत.  अद्याप प्रकाश दूर आहे.   परन्तु तांबडे फुटूं लागलें आहे.  आतां शेवटचे प्रयाण करूं या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel