''नयना, तूं येथेंच जेवशील ? माझ्या हातचें पंढरीला आवडायचें. तो तिकडे दूर पेशावरकडे आहे. बोल लौकर. म्हणजे मूठभर आणखी तांदूळ घेतों.''

''एका अटीवर.''
''तूं आली नाहींस तों अटी कसल्या घालतेस ग.''
''हें जग म्हणजे सामना, अटीतटीचा सामना.''

''तुझा माझा तसा सामना नाहीं. तें आधण आलें आहे. बोल पटकन्. जेव नि जा. किती वर्षांनी भेटलीस. आई गेल्यापासून आजच भेट.''

रंगाला आईची आठवण आली. तो सद्गदित झाला. वातावरण जरा गंभीर झालें.

''रंगा मी जेवेन. परंतु मलाच सारें करुंदे. मी करतें भांत. कणीक, पीठ आहे का ? पोळी भाकरीहि करीन. तूं येथें बस, बोल. कित्येक वर्षांतील हकीगती सांग.''

''तुला का कोळशांत हात भरायला लावूं ? रंगाला संवय आहे.''
''काळा रंग का रंगा वाईट ? कृष्ण काळा, आकाशहि काळें सांवळें.''

''म्हणून का कोळसा तोंडाला पचंसायचा ? काळे झालेले हात धुवावेच लागतात. ते का कपड्यांना पुसायचे ? नयना, तूं वेडी आहेस.''

.'म्हणून तर येथें आलें या लहानशा जगांत, या लहानशा खोलींत, या चुलीजवळ स्वयंपाक करायला. आण ते तांदुळ. मी सारें करीन. तूं बस.''

तिनें त्याच्या हातांतून ताट घेतलें. तिनें ते तांदुळ निवडले. सारे एक करुन धुवून आधणांत ओइरले. भात खतखतूं लागला.

''नयना, मी दहीं घेऊन येतों. दहीं भात खाऊं.''
''लौकर ये. आणखी कांही आणित नको बसूं.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel