परंतु महायुध्दचे रंग पालटले. जर्मनी हरला. हिट्लर मेला. जपानचें काय होणार ? एक दिवस अणु बाँब पडला. अडीच लाख लोकांचे शहर क्षणांत मातींत गेलें, जळून गेलें. काय करणार जपान ? तेंहि शरण आलें ? आतां नेताजींचे काय होणार ? तें पहा आझाद लष्कर ! खायला नाहीं, प्यायला नाहीं. बैलगाड्यांतून रणगाड्यांबरोबर झुंजत आहेत. गवत खाऊन लढत आहेत. बारा बारा दिवसांत अन्न नाहीं. तरी लढत आहेत. नेताजी सांगत आहेत ''दिल्लीच्या रस्त्यानें चला. भारतमातेकडे जाणार्‍या रस्त्याचें चुंबन घेत मरुं. ते डोंगर, त्या नद्या हांका मारित आहेत. चला. त्यांच्या पलीकडे प्रिय भारतमाता. चला.'' ती दिव्य वाणी पेटवीत होती, मढ्यांना स्फूर्ति देत होती. परंतु संपली आशा. शेवटचा क्षण आला.

''तुम्ही महात्माजींकडे जा. ते वाचवतील. ते राष्ट्रतात. मी जातों. पुढील कामासाठीं जातों.''

त्यांच्या डोळ्यांत पाणी आलें. महापुरुष विमानांत चढला. परंतु तें विमान वर नेणारें ठरलें. देवाकडे नेण्यासाठीं जणुं तें विमान आलें. नेताजी गेले. आझादसेना कैद झाली. ब्रिटिश लष्करानें तिचे धिंडवडे मांडले. अनेकांना गोळ्या घातल्या. कांही वार्ता कळेना. निरनिराळ्या कँपांत त्यांना ठेवलें. गोळ्या घालीत, कत्तल करीत. परंतु काँग्रेसचे पुढारी सुटले. आझादसेनेच्या कथा प्रसिध्द होऊं लागल्या. सारे राष्ट्र उचंबळलें. राष्ट्रसभा सर्वांच्या बचावाला उभी राहिली. पंडित जवाहरलालांनी बॅरिस्टराचा झगा घातला. भुलाभाई ऐतिहासिक खटला चालवायला उभे राहिले. भारताच्या स्वातंत्र्ययुध्दंतील तें सुंदर कांड होतें. गुलाम राष्ट्रानें सशस्त्र युध्द पुकारणें न्याय्य आहे. नेताजीनीं स्वतंत्र सरकार स्थापलें. युध्दंतील कैद्यांचा नियमच तेथें लावला पाहिजे. कोणीहि मारला जातां कामा नये. भुलाभाईंची धीरोदात्त वाणी ! जगांतील महान् ऐतिहासिक खटला. लालकिल्यांतील. सार्‍या भारताचे डोळे तिकडे लागले. कॅपटन लक्ष्मीचें नांव घरोघर गेलें. ३६ तास बाँबवर्षावांत उभी राहून जखमी शिपायांची सेवा करणारी दिव्या विरांगना, सेवांगना ! आझादडायरी प्रसिध्द झाली. एकेक ऐकावें तों हृदय उचंबळे. परंतु नेताजी कोठें ? त्यांची शेवटची भावाला भेट-तें घड्याळ, तें घेऊन अखेरचे सांगाती आले. पंडितजी म्हणाले 'त्यांची आशा आतां नाहीं. ते गेले.'  पंडितजीनीं शरद्बाबूंना-नेताजींच्या बंधूना तें घड्याळ दिलें. ते रडले. त्यानीं जयहिन्द मंत्र उचलला. व्याख्यानाच्या अंतीं जयहिन्द ते म्हणूं लागले. त्यांचा नातू बापूजींना ''जयहिंन्द बापू'' करुं लागला. जयहिन्द मंत्र घरोघर गेला. पत्रांत वरतीं जयहिन्द लिहूं लागले. सातारकडे मुलांना जयहिन्द नांवे ठेवूं लागले. नेताजी राष्ट्राच्या जीवनाला व्यापून उरले.

ताई वर्तमानपत्रे किती कसोशींने वाची. पंढरीचें नांव दिसतें का कोठें पाही. तो ब्रह्मदेशांतच होता. तो का मारला गेला ? तो आझाद सेनेंत नव्हता का ? कोठें आहे पंढरी ? ब्रिटिशांनी कैद केल्यावरहि अनेकांना ठार केलें. त्यांत का तो होता ? कोठें आहे तो ?

भारताचें स्वातंत्र्य ? कोठें आहे ? वाटाघाटी सुरु झाल्या. महात्माजी, जिना, पंडितजी, सरदार, बोलणीं चाललीं होतीं. क्षणभर आशा चमके, पुन्हां अंधार. अजून शेंकडों कार्यकर्ते भूमिगत होते. जयप्रकाश लालकिल्ल्यांतच होते. सातारचे वीर अज्ञानतवासांत. अरुणा, अच्युत अज्ञातवासांत. उत्तम लीला अज्ञानतवासांत. स्वातंत्र्य, कोठें आहे स्वातंत्र्य ? विद्यार्थ्यांवर लाठीमार होत आहेत. मुंबईत खलाशांचे बंड होत आहे. मुंबईचें काय होणार ? सरदारांनी मध्यस्थी केली. शान्त झालें बंड. परंतु स्वातंत्र्य कोठें आहे ? हिंदी चलेजाव लढा, नेताजींचा संग्राम, खलाशांची बंडें, या खुणा आहेत. ब्रिटिशांना जावें लागणार. परंतु कधीं उचलणार चंबुगवाळें ? दीडशें वर्षांचा बाडबिस्तरा गोळा करायला वेळ लागणारच. आणि जातां जातां विष नको पेरुन जायला ? अडचणी निर्माण करुन जायला ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel