''मी त्याचे श्रम वायां जाऊं देणार नाहीं. प्रसंग सारे रंगवून होईपर्यंत मी त्यांना महिना दोनशें रुपये देईन. आणि सर्व भिंती रंगवून झाल्यावर कांही तरी प्रेमभेट देईन.''

''तुम्ही त्याला स्वातंत्र्य द्याल ना ? तुम्ही तुमच्या कल्पना, इच्छा त्याला सांगा. परंतु प्रसंग कोणते रंगवायचे हें शेवटीं त्याला ठरवूं दे. त्याच्या प्रतिभेला, कल्पनेला बंधनें नका घालूं.''

''कलावंताला कोण बांधील आई ?''
''आजकाल तर सारे बांधतात व कलावानहि अगतिक होऊन बध्द होतात.''

''मी तसा नाहीं. दुधगांवचें हें मंदीर सुंदर होवो. तेथील प्रत्येक वस्तु स्फूर्ति देणारी होवो. माझ्या मनांत अनेक गोष्टी येतात. परंतु आज नाहीं बोलत. माझे विचार समजणार तरी कोणाला असें कधीं मनांत येतें.''

''रंगाला समजतील. तो फार उदार व थोर मनाचा मुलगा आहे.''
''त्याला बोलवा येथें. असा ध्येयवादी चित्रकार आम्हांला लाभला तर आणखी काय हवें ? मी त्यांचे श्रम वायां नाहीं जाऊं देणार.''
''लिहितें.''

तो श्रीमंत मनुष्य निघून गेला. कोठला तो, कोठून आला ? दुधगांवचाच का ? असे कसे त्याचे विचार ? तो भांडवलदार नव्हता वाटतें ? परंतु भांडवलदार का मंदीरें बांधित नाहींत ? दिल्लीला बिर्लांचे सुंदर मंदीर आहे. भांडवलदार कामगारांजवळ नसतील नीट वागत. त्यांना तें कळतच नाहीं. श्रमणार्‍याचा संपत्तीच्या उत्पादनांत केवढा भाग असतो तें समजण्याइतपत त्यांच्या बुध्दीची व हृदयाची वाढ झालेली नसते. ते लाखों रुपयांच्या देणग्या देतील, धर्मशाळा बांधतील, मंदीरें उभारतील. सोन्याचे कळस बांधतील. सारेच भांडवलदार चंगीभंगी नसतात. परंतु त्यांचे सारे वैभव ज्याच्या घामांतून निर्माण होतें त्याला ते विसरतात. कामगारांना सुंदर चाळी बांधून देणें, त्यांच्या जीवनांत आनंद येईल असें करणें, ही गोष्ट मंदीर बांधण्याहूनहि पवित्र आहे. तेथें हजारों कामगार, हीं देवाची चैतन्यमय रुपें, देवाच्या प्रत्यक्ष मूर्ति आनंदानें नांदतील ही कल्पनाच त्यांना येत नाहीं. कामगारांच्या चाळींतून अंधार आणि ज्ञानस्वरुप परमेश्वराच्या मूर्तीजवळ त्या मंदिरांत विजेच्या दिव्यांचा झगमगाट. इकडे श्रमणार्‍यांना खायला नाहीं तर देवासमोर अन्नकोट रचले जातात ! असो. शेवटीं अज्ञानाचा हा परिणाम आहे सर्वांचा विकास सारखाच होतो असें नाहीं. कोणाची कशी वाढ, कोणाची कशी. कोणाच्या या वृत्तीचा विकास, कोणाच्या त्या. कोणी कोणास नांवे ठेवावीं ? मंदिर बांधणार्‍यासहि वाटत असेल तेथें हजारों लोक येतील, क्षणभर प्रभुसमोर उभे राहतील, विनम्र होतील, थोडा प्रकाश नि आनंद जीवनांत घेऊन जातील. चाळी बांधून जीवनांत थोडें सुख आणतां येईल. परंतु शेवटीं ज्याला आंतरिक विकास म्हणतात, एक थोर नैतिक वा विश्वव्यापक सहानुभूतीची भावना म्हणतात, ती कोठून येणार, कोठें मिळणार ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel