सबसे उँची प्रेम सगाई
प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद

तुझें पत्र नाही म्हणून काळजी वाटतें. पुन्हां आजारी तर नाहींना पडलास? तुझ्या वैनीची प्रकृतीहि बरी नव्हती. ती अधिक नाहींना बिघडली? तुला घरांत अधिक काम पडत असेल. स्वयंपाक करावा लागत असेल. वडिलांना साडेआठ वाजतांच कामावर जायचें. तुला पुन्हां लौकर शाळेत जायचें. वसंता, तूंहि माझ्याप्रमाणें लौकर मातृहीन झालास. आई नसणें म्हणजें संसारांतील, या जगांतील एका महान्  सुखाला आंचवणें होय ! असो, तू धैर्यानें सर्व कांही करीत असशील, अशी मी आशा राखतो. तुझ्या वैनीला लौकर आराम पडो, अशी मी देवाची प्रार्थना करतों. प्रार्थनेशिवाय दुसरे मी येथून काय करणार?

आज तुझ्या सेवादलांतील मुलांसाठी कोणता खाऊ पाठवूं ! कोणत्या विचारांचा मेवा पाठवूं? माझीं पत्रें त्यांना आवडतात असें तूं मागें लिहिलें होतेंस म्हणून मी ' खाऊ, मेवा ' असें शब्द वापरीत आहें, अहंकारानें नव्हें. आज मी अस्पृश्यतेंसंबंधीं थोडें लिहित आहे.

हिदूंत ही अस्पृश्यता कशी आली तें देव जाणें ! अस्पृश्य हे येथील मूळचे रहिवाशी असावेत, नाग जातीचे ते असावेत असें कोणी म्हणतात. परंतु अस्पृश्यांच्या तोंडावळयावरुन, डोळे-नाक वगैरेंवरुन ते आर्य असावेत असेंहि कोणी म्हणतात. या मूळच्या नाग लोकांस आर्यांनी जिंकलें. आर्य व नाग ह्या दोहोंचें रक्त अस्पृश्यांत असेल असें वाटतें. जेते लोक जितांविषयी कसा अस्पृश्यभाव दाखवितात तें सर्वंत्र दिसतें. प्रत्येक समाजात प्रत्येक संस्कृतीत असें लाजिरवाणे प्रकार आहे. ग्रीक लोकांची संस्कृति कळसास पोहोंचली होती. परंतु त्यांना गुलामाचा एक वर्ग राखला होता. हे गुलाम सदैव राबत. संस्कृतीसाठी फुरसत हवी. वरच्या वर्गांना संस्कृतिविकासासाठी वेळ मिळावा म्हणून हे गुलाम राबत असत ! या गुलामांना कलांची उपासना करतां येत नसे. त्यांना ज्ञानाचे दरवाचे बंद होते. त्यांनी सदैव वरच्यांची सेवा करावी. आपल्याकडहि तोच प्रकार. त्रैवर्णिकांची सदैव सेवा करणे हेंच अस्पृश्यांचे काम राहिले.

ही अस्पृश्यता कशीहि आली असो, ती नष्ट करणें हें एक काम आहे. आजच्या काळांत ती शोभत नाहीं. श्रेष्ठकनिष्ठपणाची थोतांडें फार प्राचीन काळापासून आहेत. या श्रेष्ठ-कनिष्ठपणाविरुध्द जर कोणी प्रथम उठला असेल तर तो श्रीकृष्ण होय. त्यांच्या काळांत ब्राम्हण व क्षत्रिय यांना फार प्राधान्य होतें. हे दोन वर्ण काय तें श्रेष्ठ, बाकीचे तुच्छ. स्त्रियांनाहि महत्त्वाचें स्थान नव्हतें. स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार नाहीं, असे म्हणूं लागले होते. स्त्रियांना गुलाम ठेवायचे असेल तर त्यांना ज्ञानहीन ठेवणे हाच मार्ग होता.

परंरंतु श्रीकृष्णाने, स्त्रिया, वैश्य, शुद्र सर्वाना मान्यता दिली. समाजसेवेचें कार्र्य करणारे सारे पवित्र आहेंत, असें त्यानें प्रतिपादलें. ज्यानें त्यानें आपल्या गुणधर्माप्रमाणे सेवा करावी. कोणी श्रेष्ठ नाही. कोणी कनिष्ठ नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel