भारताचा इतिहासदत्त प्रयोग

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.

आज सकाळी मी अंगणात फिरत होतों. एक लहानसें फुलपाखरूं पडलें होते ! फारच चिमुकले होतें तें. मी हातांत घेतलें. तें मेलेलें होतें. तरीहि त्याचे ते चिमणें पंख किती तजेलदार दिसत होते. चिवरेबावरें असे ते पंख सौंदर्यानें भरलेलें होते. ते पांखरूं किती दिवस जगलें असेल? कदाचित् चार दिवसहि तें नाचलेंबागडलें नसेल ! इतक्या क्षणभंगुर अशा जीवनांत सुष्टीनें किती सौंदर्य ओतलें होते, किती कला ओतली होती? मग मानवी आत्मा निर्मितांना किती कला ओतली गेली असेल? मानवी आत्म्यांत किती रंग भरलेले असतील?

परंतु हे रंग कधी प्रकट होणार? मानवी आत्म्याचे सुंदर रंग प्रकट व्हावे म्हणून कोण धडपडणार? इतकी खोल दृष्टि कोण घेणार? आपण तर एकमेकांस शिव्या देत आहोंत. मनुष्य मनुष्याला गुलाम करीत आहें, तुच्छ लेखीत आहे. इंग्लंडमधील थोर कवि वर्डस्वर्थ म्हणाला ____

Much was I grieved to think
What man has made of man


करी मानव हा काय मानवाचें
मनीं येऊन मज दु:ख होई साचें

वरड्स्वर्थ हे शब्द शंभर-दीडशे वर्षापूर्वी म्हणाला; परंतु आजहि ते खरे आहेत. या जगांत पूर्वी कधीं नव्हता इतका आज द्वेषांना ऊत आला आहे. मधूनमधून मानवी समुद्राला पोटांतील वडवानळी आग ओकण्याची अशीं संवयच आहे कीं काय न कळें?

हिंदुस्थानांत हा द्वेष जातीयवादावर आधारला आहे. मला कळत नाही हे द्वेष कां तें ! शेंकडों हिंदूंच्या घरी मुसलमान नोकरचाकर आहेत. प्रेमळ संबंध आहेंत. परंतु वर्तमानपत्रांतील गोष्टी वाचून बोंबा मारणारें आमचे द्वेषाळ लोक या गोष्टी बघतील तर ना? कावळा सडलेल्या भागाकडे दृष्टि देतो, त्याप्रमाणें हे द्वेंषी लोक नेमकें वाईट तेवढेंच बघतात. हजारों कुटुंबातून व खेडयांतून प्रेमळ संबंध आहेत, ही गोष्ट ते विसरतात. म्हणून माझ्यासारखा लहानसा लेखक त्यांना हें मांगल्य दाखवूं पहात असतो. अंधारांत एक किरण दाखविणेंहि पुण्यकारक आहे. माझी गीता सांगते, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ' -थोडें का सत्कर्म असेना तेंहि तारील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel