स्वातंत्र्य-दिन

२६ जानेवारीचा स्वातंत्र्यदिन हिंदुस्थानभर साजरा केला जाईल. या दिवशीं घरोघर तिरंगी झेंडे लावले जातील. प्रभातफेर्‍या निघतील. खादी खपली जाईल. रस्ते झाडले जातील. हरिजनांच्या भेटीगांठी घेतल्या जातील. हिंदुमुसलमान एकत्र येतील. सभा होतील, मिरवणुका निघतील. सारें वातावरण एका दिव्य भावनेनें भरून जाईल.

या दिवशीं स्वातंत्र्यार्थ झालेले सारे प्रयत्न डोळयांसमोर येऊन उभे राहतील. जगांतील आजपर्यंतचे स्वातंत्र्याचे झगडे आठवतील. स्वातंत्र्यासाठी जगाच्या आरंभापासून आतांपर्यंत किती बलिदान झालें असेल याची कोण गणती करील ? स्वातंत्र्यार्थ केलेल्या बलिदानाचें मोजमाप करावयाचें नसतें. स्वातंत्र्य हें अमोल आहे.

जगांतील व भारतांतील आजपर्यंतचे स्वातंत्र्यसंग्राम आठवले व आजचा भारतीय संग्राम डोळयांसमोर आणला म्हणजे एक नवीन गोष्ट दिसते. हिंदुस्थान आज अहिंसक मार्गानें स्वातंत्र्य मिळवूं पहात आहे. जगाच्या इतिहासांतील ही नवीन भर आहे. दहा हजार वर्षे एका मार्गानें गेल्यावर दुसरा एक मार्ग भारत तयार करीत आहे. शांतपणें उभे राहून भारतांतील स्त्रीपुरुष, लहान मुलें लाठीमार खात आहेत. गोळ्या झेलीत आहेत, घोड्याचे टापांखालीं, मोटारींखालीं देह फेंकीत आहेत, हा देखावा अपूर्व, अभूतपूर्व, आहे.

२६ जानेवारीच्या दिवशीं किती कितीतरी गोष्टी आठवतील. गेल्या २० वर्षांतील सारे हुतात्मे हृदयांत उभे राहतील. परन्तु अद्याप पूर्ण बलिदान झालें नाहीं. स्वातंत्र्यार्थ अजून अपार त्याग केला पाहिजे आहे. त्याची प्रतिज्ञा या दिवशीं सर्वांनीं केली पाहिजे.

२६ जानेवारीच्या या स्वातंत्र्यदिनांत सर्वांनीं सामील व्हावें. कारखान्यांना मालकांनीं सुटी द्यावी. शाळा बंद ठेवाव्या. सर्वांनीं स्वातंत्र्याचीं गीतें गात, इतर विधायक सेवा करीत हा दिवस दवडावा. शाळांना सुटी मिळेल का ? कारखानदार कामगारांना स्वातंत्र्याचा आनंद अनुभवूं देतील का ?

कांहीं शाळांतून या २६ तारखेस मुलांच्या परीक्षा ठेवण्यांत आल्याचें कळतें ! त्या शाळाचालकांच्या कृपण मतीची किंव येते. स्वातंत्र्याचा भव्य इतिहास आठवून आज नाचावयाचें. अशा वेळेस चार भिंतींच्या आंत मुलांना गणितें सोडवावयास लावणार ? तरुणांनों, स्वातंत्र्याच्या प्रेमाची परीक्षा द्यावयाची असेल तर शाळांत पेपर सोडवीत बसूं नका. तुमचें स्वातंत्र्यप्रेम किती बळकट आहे हें तुमच्या शाळाचालकांस पहावयाचें आहे. तुमचें उत्कट प्रेम दाखवून त्यांना समाधान द्या. शाळेंत दगडी भिंती, बाकें याशिवाय चालकांस या दिवशीं कांहीं न दिसो.

खानदेशांतील हा दिवस यंदा अभिनव रीतीनें साजरा होईल. सारी दु:खी जनता जळगांवला एकत्र येऊन तिरंगी झेंड्याखालीं उभी राहून हा दिवस साजरा करणार आहे. खानदेशांतील सारे विद्यार्थी, सारे कामगार, इतर जनता या शेतकर्‍यांच्या प्रचंड समुदायांत मिळून जातील व अभेद्या एकजूट तिरंगी झेंड्याखालीं करतील अशी आशा आहे.
२३ जानेवारी, १९३९.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel