मग घरातल्या पडवीत बसूनच मुले खेळतात. पागोळ्या पडत असतात. त्यांच्याखाली मुले हात धरतात :

पाऊस पडतो             पागोळ्या पाणी गळे
माणीक दारीं खेळे             उषाताई

कोकणात कधी कधी सारखी आठवडा आठवडा संततधार लागते. सूर्यदर्शन होत नाही :

पाऊस पडतो             पडतो सारखा
सूर्य झालासे पारखा             चार दिवस

कधी कधी पर्जन्य येतो, त्या वेळेस विजांचा चमचमाट होतो. कडाड कडाड आवाज होतो. धरणीमायेचा पती पर्जन्य वाजतगाजत येतो :

झाडें झडाडती             विजा कडाडती
धरणी माये तुझा पति             येत आहे

लहान मुले असा कडकडाट व गडगडाट होऊ लागला म्हणजे भितात. आई त्यांना कुशीत घेऊन निजवते :

मेघ गरजतो             पाऊस वर्षतो
कुशींत निजतो                 तान्हेबाळ

पावसाळ्याचे असे मनोहर वर्णन आहे. तसेच थंडीचेही आहे. फार थंडी पडलेली असली म्हणजे फुलांच्या कळ्या नीट फुलत नाहीत. त्या आखडून जातात:

थंडी पडे भारी             फुलती ना कळ्या
आखडून गेल्या             झाडावर

थंडी इतकी पडली की पाणी अगदी गारगार झाले. आकाशातील तारेही थंडीने थरथरू लागले :

थंडी पडे भारी             तारे थरारती
करी तूं गुरंगुटी                 तान्हे बाळा

थंडी पडलेली असली म्हणजे ताटात किंवा शेगडीत निखारे घेऊन म्हातारी माणसे घरात शेकत बसतात :

थंडी आज भारी         ताटी निखारे भरून
देऊं शेकाया नेऊन            बाप्पाजींना

परंतु स्त्रियांनी उन्हाळ्याचे वर्णन केले आहे ते आता ऐका. ऊन इतके पडले आहे की दगडसुध्दा फुटून त्यांच्या लाह्या होतील :

दुपारचें ऊन             दगडाच्या झाल्या लाह्या
तोंड कोमेजे देसाया             भाईराया

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel